पुणे, दि. ११ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर, ता. खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरूर) या शाळांमध्ये राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षण, तसेच लोकसहभागातून साधलेला शाळाविकास या बाबींची राज्य शासनाने दखल घेतली आहे. या उपक्रमांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला असून, या शैक्षणिक पॅटर्नची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने ‘टी४’ या जागतिक संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ मध्ये ‘कम्युनिटी चॉइस अवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वाधिक मते मिळवून जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून नाव कमावले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामस्थांसोबतच्या संवाद कार्यक्रमात श्री. भुसे बोलत होते.
यावेळी श्री. भुसे यांनी जालिंदरनगर शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी येथील शाळेलाही भेट दिली.
कार्यक्रमास आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, तसेच विविध जिल्ह्यांतील उपक्रमशील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या, सामाजिक संस्था, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, “शिक्षक दत्तात्रय वारे यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळा लोकसहभागातून विकसित केल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे या शाळेला राज्य, देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाला आहे. गावाने ठरवले तर शाळेचा चेहरामोहरा बदलू शकतो, याचे आदर्श उदाहरण ग्रामस्थांनी घालून दिले आहे. श्री. वारे यांचे कार्य सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येतील.”
शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीची ‘डेटा बँक’ तयार करण्याचे काम सुरू
राज्यातील विविध आदर्श, प्रतिभावान आणि उपक्रमशील शिक्षक समर्पित भावनेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर शाळेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करावे. राज्य शासन अशा शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांची ‘डेटा बँक’ तयार करत आहे. श्री. वारे यांनी या शिक्षकांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.
शिक्षण हा मुख्यमंत्र्यांचा जिव्हाळ्याचा विषय
“शिक्षण हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यावर्षीच्या ‘प्रवेशोत्सव’ दिवशी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करत होते,” असे श्री. भुसे म्हणाले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आनंददायी, आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न
“शिक्षण विभागाचा ‘राष्ट्र प्रथम’ हा संकल्प आहे. त्यामुळे राष्ट्रीयत्वाची जाणीव, आत्मनिर्भरता आणि कौशल्ययुक्त शिक्षणावर भर दिला जात आहे. शिक्षण विभाग शाळांचा पायाभूत विकास, शिक्षकांच्या मागण्या, विद्यार्थीहित आणि लोकसहभाग यावर आधारित विविध धोरणात्मक निर्णय घेत आहे. आगामी काळात त्याचे सकारात्मक प्रतिबिंब राज्यात दिसेल,” असेही श्री. भुसे म्हणाले.
“२६ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तिपर गीतावर कवायत करून विश्वविक्रम करण्याचा निर्धार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
आमदार काळे यांचे मत
“जालिंदरनगर शाळेत आधुनिक, पर्यावरणपूरक आणि अध्यात्मिक शिक्षण देण्याचे कार्य होत आहे. येथे संस्कारक्षम पिढी घडत आहे. राज्यातील सर्व उपक्रमशील शिक्षकांनी आपली शाळा जागतिक पातळीवर झळकवावी,” असे आमदार बाबाजी काळे म्हणाले.
शिक्षण आयुक्त सिंह यांचे मत
“वाबळेवाडी आणि जालिंदरनगरसारख्या शाळा उभारण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने निर्धार केला पाहिजे. ग्रामीण शाळांमध्ये लोकसहभागातून शहरांतील सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. यात श्री. वारे यांची जिद्द आणि तळमळ महत्त्वाची ठरली आहे,” असे सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले.
एम.एस.ई.आर.टी. संचालक रेखावार यांचे मत
“राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता अतिउच्च आहे. त्यांनी प्रेरित होऊन काम केल्यास प्रत्येक जिल्ह्यात जालिंदरनगरसारखी शाळा निर्माण होऊ शकते. परिषद आधुनिक तंत्रज्ञान, कोडिंग आणि रोबोटिक्सवर काम करत आहे. शिक्षकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे राहुल रेखावार म्हणाले.
सीईओ पाटील यांचे मत
“पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल स्कूल’ उभारणीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य पत्र, इस्रो-नासा भेटी यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘सृजन प्रयोगशाळे’चे उद्घाटन करण्यात आले. अशा २५ प्रयोगशाळा पुढील काळात मॉडेल शाळांमध्ये स्थापन होणार आहेत,” असे गजानन पाटील म्हणाले.
शिक्षक वारे यांचे मनोगत
“समाजात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप दुय्यम आहे. जालिंदरनगर शाळेने जागतिक पातळीवर मिळवलेले यश हे त्याला दिलेले ठोस उत्तर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता आहे. इच्छाशक्ती, दृढ संकल्प, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून आपण त्या जागतिक दर्जाच्या करू शकतो,” असे दत्तात्रय वारे म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांकडून राबविल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली आणि त्यांचे कौतुक केले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, शाळेसाठी जागा उपलब्ध करून देणारे दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. जागतिक बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला.
‘सृजन’ प्रयोगशाळा
जालिंदरनगर शाळेत काळाची गरज लक्षात घेऊन एआय टूल्सच्या साहाय्याने रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन यांसारख्या विषयांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे आधुनिक शिक्षण दिले जाणार आहे. ही प्रयोगशाळा सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज या संस्थेच्या सहाय्याने उभारण्यात आली आहे.
#जालिंदरनगरशाळा
#वाबळेवाडीशाळा
#दत्तात्रयवारे
#DattatrayWare
#लोकसहभागातूनशाळाविकास
#BestZPSchool
#ZPJalindarnagar
#T4WorldBestSchool
#CommunityChoiceAward
#SrujanLab
#AIinEducation
#NewAgeLearning
#SchoolInnovation
#MaharashtraEducation
#दादाजीभुसे
#शालेयशिक्षणमंत्री
#PuneEducationModel
#AdarshShala
#ModelSchool
#SkillBasedLearning
#TechnologyInEducation
#ZPMaharashtra
#ProudOfZPSchools
#InnovativeTeachers
#InspiringEducation
#ShikshanPrerna
#शिक्षणातीलक्रांती
#जिल्हापरिषदशाळांचाअभिमान
#LokSahabhag

