आबाल वृद्धापासून प्रत्येकाला कथा ऐकायला आवडतात. तिच्या वयोमाना प्रमाणे प्रत्येक कथेचे स्वरूप बदलेले तरी माणसाची आवड कमी होत नाही.आज सुद्धा ग्रामीण भागात आजीच्या भोवती सर्व नातू एकत्रित होऊन तल्लीनतेने कथा ऐकतात. तेव्हा नातू देहभान हरपून जातात.
आजीच्या मुखातून रसाळ कथा येतात. या कथा पराक्रमाच्या, दुःखाच्या, विरहाच्या,परीच्या असतात. तशाच प्रकारे
‘आम्ही काबाडाचे धनी’ ह्या कथा काव्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण समाज व्यवस्थेच्या भक्कम पार्श्वभूमीवर अतिशय प्रभावीपणे व्यक्त केले आहे-निसर्ग आणि माणसाची एकात्मता, खेड्यातील दुःखाची नाळ त्यांनी योग्यवेळी जोडली आहे. ग्रामीण भागात राबणाऱ्या कुटुंबाचा संघर्ष त्यांचे काबाडकष्ट त्यांनी त्यांच्या मेहनती तून केलेली हिरवीगार सृष्टी मांडली आहे.मातीशी जोडले गेलेले स्त्रीचे श्रम,मुलांसाठी केलेले अपार कष्ट, बापाची नैसर्गिक वाटणारी पुरुष सत्ता या कवितेतून व्यक्त होते,
मातीसाठी जगावं,मातीसाठीच मरावं,बाळा माती लय थोर,तिला कसं विसराव, ही आपल्या माती विषयांची लडिवाळ भूमिका त्यांनी घेतलेली आहे.जगण्यातला संघर्ष मातीशी जोडलेला आहे.कृषी संस्कृतीचा भाग घेऊन जगणारी माझी माय.लहाणपणी माहेरच्या घरासाठी,भावा- बहिणी साठी,संसाराचा गाडा ती ओढीत आहे. जगण्यातील सुख- दुःख भोगते,श्रीमंत-गरिबीचे दिवस पाहते.ओल्या कोरड्या दुष्काळाचे आघात झेलते.शेतात चरणारी हुंदडणारी, जनावरं पाहते.
तसेच डोळ्या देखत वाळणारी पिकं,खंगणारी गाय- वासरं, अकाली मरणारी लहान मोठी माणसं आहेत.तिच्या वाट्याला आलेला दुर्दैवाचा फेरा आहे.असे या कथा काव्यातून विशद करता येते.मानव जातीतील स्त्रीच्या सुखदुःखाचे भाव भावनाशी अतूट नातं सांगणारे
हे कथा काव्य आहे.या कथाकाव्यात गावातील कुटुंबातील रोषाचा,कौतुकाचा, निंदेचा विषय ही स्पष्टपणे मांडला आहे, मराठवाडा बोलीतील हे कथा काव्य व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. या कथाकाव्यात जगण्यासाठी धडपडणारी स्त्री प्रसंगी मृत्यू आला तरी न घाबरणारे आई-बहीण सांगितलेली आहेत. सबंध स्त्री जातीला अभिमान वाटावं असं कर्तृत्व करणारी मुलगी पत्नी, सून,वहिनी,सासू,मावशी आजी यांची नाते खरोखर वर्तना तून परिवर्तनाकडे जाणारे आहे, या कवीच्या चिंतनशीलतेचा परिपाक यामध्ये ओसंडून वाहत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचा जन्म वाड्या वस्तीवर कशा पद्धतीने होतो. काबाडकष्ट करून तो शेतीकडे पाहून कसे स्वप्न रंगवतो. त्यानंतर शेतीमालाला कवडीमोल भाव मिळतो.त्यातून त्याचे स्वप्न धुळीला मिळतात. हे सर्व दीर्घ काव्यातून स्पष्टपणे मांडले आहे. निसर्गाची वेगवेगळी रूपे त्यांनी सांगितले आहेत.कधी कधी तो कोपतो, कधी तो रौद्र रूप धारण करतो, कधी प्रसन्न होतो,कधी माती सहित वाहून नेतो, तो लहरी आहे.
या कथा काव्यातून लोकसंस्कृती, लोकरूढी,लोकपरंपरा,लोकलयी लोक समजुती,लोकवाद्ये असे अनेक संदर्भ सापडतात.तुझ्या गावाला तू दोस्ता गेला घेऊन, आम्हाला| काट्याकुट्याचाच रस्ता आला दावून आम्हाला| ,
तुझ्या गावात राबती सारे काबाडाचे धनी, |कष्ट पेरून काढती जगायला पीक पाणी||
या ओळीतून त्यांनी आपला गाव दोस्त,काटा कुटे सर्वकाही सहन करून पीक पाणी काढतो असे सांगितले आहे.
उगवतीला दिसतो नांदेडचा गुरुद्वार| माय गोदेच्या पाण्याने मळे झाले हिरवेगार| मावळतीला वाहते माय पुरना थिरानं| तिच्या पान्याच्या बळावं आम्ही जगतो धिरानं||कवी आपल्या कथा काव्यातून पूर्व दिशेला असणारा नांदेडचा गुरुद्वारा आम्हाला दिसतो आहे. गोदावरी नदीच्या काठी मळे हिरवेगार केले आहेत. मावळतीला वाहत जाणारी पूर्णा नदी आहे. तिच्या पाण्याच्या बळांना आम्ही जीवन जगतो असे सांगून नदीला मायेची उपमा दिली असून कृतज्ञता दाखविली आहे.
बाप बोले लेकी इख खाऊन नांदावं| पित्याच्या नावाचं जगी देऊळ बांधावं ||
कवी आपल्या या कथाकव्यातून मुलीला समजून सांगतात. मुलींनी सासरी राहावं,आईवडिलांचे नाव कुठे ही बदनाम होणार नाही.याची काळजी घ्यावी.शेवटी तुला विष खायची वेळ आली तरी तू ते खाऊन नांदावं.परंतु जन्मदात्या पित्याला कोणी बोलू नये.याची तू काळजी घ्यावी.असे वर्णन करून मुलीला सासरचं महत्व सांगितलेले आहे.’आम्ही काबाडाचे धनी’ हे कथाकाव्य वाचताना खरोखरच अंगावर शहारे येतात. डोळ्यातील अश्रूंना वाट करून द्यावी लागते. तेव्हा कुठेतरी मनाला समाधान वाटते. शेतकऱ्यांची काबाडकष्ट करून जीवन जगताना येणाऱ्या अडे अडचणी यांचा अतिशय समर्पक ओवीरूपाने या ठिकाणी शब्दबद्ध करणं, म्हणावं तेवढी सोपी गोष्ट नाही. हे कथाकाव्य सूचने म्हणजे येरा गबाळ्याचे काम नव्हे ,खरोखरच तेथे जातीवंत कवीच लागतात. असे मला शेवटी म्हणावे वाटते. हे कथा काव्य अकराव्या आवृत्तीच्या रूपाने संपूर्ण देशभर गाजत आहे.ते डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित केले आहे. त्यामुळे सर्व वाचकांनी आबाल वृद्धांनी, विद्यार्थी व प्राध्यापकांनी ‘आम्ही काबाडाचे धनी’ हा कथा काव्य आपल्या घरी संग्रही ठेवून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्यावे. या कथाकाव्यातून शेतकरी कुणबी आहे. त्याची ती असणारी सगुना डोळ्या पुढून कधी जात नाही.

प्रकाशक, आदित्य प्रकाशन विलास फुटाणे
अबोली अपार्टमेंट, फ्लॅट नं, 32, तिसरा मजला, क्रांती चौक, कलश मंगल कार्यालय जवळ,
न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद-
4310 05 मुद्रक
प्रिंटवेल, चिकलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद
कविवर्य इंद्रजीत भालेराव
एकनाथ नगर, परभणी 43 14 10, सुधारित अकरावी आवृत्ती, डिसेंबर 2022 मुखपृष्ठ /रेखाटन सरदार जाधव
अक्षर जुळणी, सौ अंजली डीटीपी सेंटर, मूल्य :150 रुपये पृष्ठे : 200 पुस्तक परीक्षण प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष :विठू माऊली :प्रतिष्ठान खैरकावाडी
ता.मुखेड जि.नांदेड
पिनकोड 43 17 1

