फुलवळ (धोंडीबा बोरगावे):
कंधार तालुक्यातील फुलवळ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हे यंदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित सुटल्याने या भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक महिला उमेदवार आता मोर्चेबांधणीला लागले आहेत. गाठीभेटी, चर्चा आणि नियोजन या सर्व प्रक्रियेत चैतन्य निर्माण झालं आहे.
“गाव मोठं, मतदार जास्त – पण आपला उमेदवार दुर्मिळच”
गेल्या दोन-तीन दशकांचा इतिहास पाहिला तर फुलवळसारख्या मोठ्या गावातून आजवर फारच कमी वेळा स्थानिक व्यक्ती जि.प. सदस्य म्हणून निवडून आली आहे.
आतापर्यंत निवडून आलेल्या बहुतेक सदस्यांचा गटाशी थेट संबंध नसून ते ‘गटाबाहेरील’ उमेदवार होते. त्यामुळे गावातील अनेक मतदारांमध्ये आता चर्चेचा विषय बनला आहे — “फुलवळसारख्या मोठ्या गावातून अजूनही आपला उमेदवार का निवडून येत नाही?”
राजकीय गटबाजीचा परिणाम?
फुलवळ गावात विविध राजकीय पक्षांचे आणि विचारधारांचे कार्यकर्ते असल्याने निवडणुकीच्या वेळी गावात गटबाजीचे वातावरण निर्माण होते. याच मतभेदांमुळे प्रत्येक वेळी स्थानिक उमेदवाराच्या संधीवर परिणाम झाल्याचं जाणकारांचे म्हणणं आहे.
तथापि, अनेक सुज्ञ नागरिक आता “गावाच्या एकतेला प्राधान्य द्यावं” अशी भावना व्यक्त करत आहेत.
सर्वसमावेशक गट – पण विजयी समीकरण गुंतागुंतीचं
फुलवळ जि. प. गट हा तालुक्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला आणि राजकीय दृष्ट्या सक्रीय गट आहे.
येथील मतदार विविध सामाजिक घटकांतून येत असल्याने कोणत्याही एका समुदायाचे वर्चस्व नाही. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला सर्व घटकांशी संवाद साधत समन्वय राखणं अत्यावश्यक असतं.
यावेळी गावकऱ्यांचा निर्धार – “आपला उमेदवार, आपला निर्णय”
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलवळ गावात काही तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
गावात सर्वानुमते बैठक घेऊन, मतभेद आणि पक्षभेद बाजूला ठेवत, एकच उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.“यावेळी गावातूनच उमेदवार उभा राहून निवडून यावा,” अशी भावना गावकऱ्यांमध्ये दिसून येते.
आता तरी बदलाची वेळ आली का?
फुलवळसारख्या राजकीय दृष्ट्या सक्षम गावातून आपला उमेदवार निवडून यावा,
गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकसंघपणे निर्णय घ्यावा — ही अपेक्षा वाढत चालली आहे.
गेल्या निवडणुकांप्रमाणे बाहेरील उमेदवारांचीच निवड पुन्हा होणार का,
की यावेळी फुलवळकर एकसंघ होऊन इतिहास घडवतील?
हे येणारा काळच ठरवेल.

