कंधार ; प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून कंधार नगर पालिकाचे राजकारण हे नळगे आणी चिखलीकर यांच्या दोघातच होत असते. गेल्या निवडणुकीत मुक्तेश्वर धोंडगे यांच्या माध्यमातून तिसरा लढा उभारला होता परंतु या लढाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. 2025 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा चिखलीकर – नळगे ही लढत होणार असली तरी या निवडणुकीत डॉ. संजय पवार हे उडी घेणार असल्याने या निवडणुकीला वेगळाच रंग येणार आहे.
लोहा कंधार मतदार संघाचे राजकारण हे विकासावर नव्हे तर पैशावर चालत असते. लोकनेते, विकास पुरुष, लोकनायक, लोकप्रिय असे कितीही ब्रिद वाक्य लावले असले तरी लोकशाही मार्गाने बिना पैशाची निवडणुक लढवली तर अनामत रक्कम जप्त होवु शकते हेच वास्तव आहे. आज पर्यंत कंधार शहराला तिसरा पर्याय मिळत नसल्याने या दोघा शिवाय तिसरा माणूस निवडून येत नव्हता परंतु डॉ. संजय पवार नविन राजकीय डाव आखत आहेत कंधार शहरातील जनतेला तिसरा पर्याय दिलेला आहे.
कै. शिवराम पवार यांचे राजकारणात वरिष्ठ नेत्यापाशी चांगले वजन व मतदार संघातही त्यांचा दबदबा होता. कंधार लोहा मतदार संघात अनेक ओबिसीचे सक्षम नेते होते परंतु या सक्षम नेत्यांना प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी राजकारणातून संपविण्याचे मोठे कटकारस्थान झाले.त्यामुळे या नेत्यांना विधानसभेपर्यंत जाण्याची संधी मिळाली नाही हे कटू असले तरी तेवढेच सत्य आहे.कै. शिवराम पवार यांच्या मुलांना म्हणावा असा राजकारणाचा छंद नसल्याने शिवराम पवार यांच्या निधनानंतर यांची राजकारणात पोकळी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीत संजय पवार यांनी राजकारणात इंट्री करण्याची तयारी सुरू केली परंतु एखाद्या पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली तरच विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने विधानसभा निवडणूक न लढवण्याचा संजय पवार यांनी निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत केलेले काम पाहून संजय पवार यांना आता राजकारणात वडिलांचा वारसा चालवायचा आहे असे सध्या तरी वाटत आहे.
कंधार नगरपालिकेची निवडणूक ही नळगे विरुद्ध चिखलीकर अशीच होत असते. काँग्रेस पक्षाला अशोकराव चव्हाण यांनी सोडचिट्टी देऊन भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी कंधार शहरात मात्र नळगे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व आहे हे नाकारता येणार नाही. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला सुटले असल्याने काँग्रेस पक्षाकडून शहाजी अरविंदराव नळगे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून स्वप्नील पाटील लुंगारे , माजी नगराध्यक्षा सौ अनुराधा चेतन केंद्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत चिखलीकर विरुद्ध नळगे असा सामना रंगणार असतानाच संजय पवार यांनी या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा चालू आहे.संजय पवार यांना अनेक पक्षाकडून ऑफर आली परंतु त्यांनी अपक्ष किंवा शरद पवारगटाच्या राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवणार असल्याचीही जोरदार चर्चा सध्या चालू आहे. कंधार शहराची निवडणुकी ही दोघातच होत असल्याने आज पर्यंत तिसरा पर्याय जनतेला मिळाला नाही. गेल्या निवडणुकीत भाजपच्या वतीने भाजपाने नगराध्यक्षासह इतर उमेदवार निवडणुकीत उभे करण्यात आले होते परंतु या निवडणुकीत त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. नांदेड जिल्ह्यात भाजप, अजित पवार गट, आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महायुती जवळपास राहणार नसण्याचे निश्चित झाले आहेत. एकनाथ पवार यांनी महायुती कुठे होईल किंवा न होईल परंतु लोहा कंधार मतदारसंघात होणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.त्यामुळे कंधार आणि लोहा नगरपालिका ही भाजप स्वबळावरच लढवणार असल्याचे चित्र दिसत आहेत. लोहा शहरात गजानन सूर्यवंशी यांच्या माध्यमातून भाजपाची चांगली पकड आहे परंतु कंधार शहरात भाजपची म्हणावी तशी ताकद नसल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी भाजपला नाकेनऊ येत आहे हे वास्तव आहे. ही सर्व तयारी चालत असताना गेल्या दोन महिन्यापासून संजय पवार यांनी कंधार नगरपालिका निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढवण्यासाठी गुप्त पद्धतीने तयारी चालू आहे.
कंधार शहरातील जनतेला विकासाच्या बाबतीत काहीही देणे घेणे नाही असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. या शहराची निवडणुकी जवळपास पैशावरच आहे हे नाकारता येणार नाही.त्यामुळे संजय पवार यांनी उमेदवार हा जो तिसरा पर्यायाचा प्रयोग चालू आहे तो उपयोग कितपत यशस्वी होऊ शकतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महाराष्ट्रामध्ये या प्रयोगाची वेगळीच चर्चा होणार असून संजय पवार हे चिखलीकर आणि नळगे यांची मात्र डोकेदुखी वाढवणार आहे हे मात्र नक्की.
डॉ. संजय पवार हे शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असून ते ग्रामीण शिक्षण प्रसार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे मराठवाड्यात जवळपास त्यांच्या मराठवाड्यात 35 संस्था आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास हजारो विद्यार्थी हे नऊ परीक्षा क्षेत्रात गेले आहेत.ते राजकारणातून अलिप्त असले तरी त्यांचे वडील कै शिवराम पवार यांनी मोठ्या कष्टातून कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना नवीन दिशा देण्याची संकल्पना तयार केली. खरेदी विक्री संघातही त्यांनी अनेक वर्ष अध्यक्षपदावर काम केले आहे. आज त्यांचे छोटे चिरंजीव हे राजकारणाच्या माध्यमातून वडिलांचा वारसा चालवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीतून पदार्पण करत आहेत त्यांचे सर्वच जाती-धर्माच्या लोकांसोबत जिवाळ्याचे संबंध आहेत. या निवडणुकीत हे पूर्ण ताकतीनशे उतरणार असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे.

