कंधार : (दिगांबर वाघमारे )
शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे आजच्या विद्यार्थ्यांचा निसर्गाशी असलेला संबंध कमी होत चालला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता यावा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कंधार येथील मनोविकास प्राथमिक शाळा यांच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव व चाकूर येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या सहलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. चाकूर येथे विद्यार्थ्यांनी हिरवळ, झाडे, मोकळे वातावरण यांचा आनंद घेत निसर्गभ्रमंती केली. निसर्ग निरीक्षणातून विविध वनस्पती, परिसरातील जैवविविधता यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे मुलांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षणही मिळाले.
या सहलीस मुख्याध्यापिका सौ. वरवंटकर सुनंदा यांनी परवानगी देऊन मार्गदर्शन केले.सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक विरभद्र बेलुरे, आनंदा सोनकांबळे,सौ.मीनाताई ढवळे,संभाजी पानपट्टे,स्वप्नील जोशी तसेच सेवक संजय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.या निसर्गसहलमुळे विद्यार्थ्यांच्या मनोविकासाबरोबरच त्यांच्यात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

