नांदेड : प्रतिनिधी
शहरातील श्रीनगर परिसरात लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण नांदेड शहर हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
अलीकडील काही दिवसांपासून नांदेड शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या सुमारे ७० तासांच्या कालावधीत पाच खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक असुरक्षिततेच्या छायेत जीवन जगत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीनगर परिसरातील ही हत्या अधिकच धक्कादायक ठरली आहे. सोनू कल्याणकर हे लिंगायत समाजातील सक्रिय, तरुण व लोकप्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करणे, गरजू नागरिकांना मदत करणे, विद्यार्थ्यांना सहकार्य करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांतून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे समाजात शोककळा पसरली असून राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
दरम्यान, या हत्येमागे संघटित गुन्हेगारीशी संबंधित घटकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ प्रा. मनोहर धोंडे, अॅड. अविनाश भोसीकर, रामदास पाटील सुमठाणकर, संजयअप्पा बेळगे,प्राध्यापक सूर्यकांत विश्वासराव, शिवाभाऊ नरंगले, बवनभाऊ बारसे, गंगाधरराव वडूरे, शंकर महाजन , वैजनाथ तोडसुरे, विठ्ठल ताकबिडे, रत्नाकर कुऱ्हाडे, अनिल माळगे ,एडवोकेट देलमाडे, सचिन पाटील, हनुमंत पटणे , प्रदीप जनकवाडे, पिंटू बोंबले, उमेश माळगे ,सतीश आनेराव ,संगमेश्वर पालीमकर,प्रमोद होळगे ,महादेवी मठपती , शिवरानी हंगरगेकर, हनुमंत कंधारकर, माधव स्वामी, आनंद कर्णे ,बालाजी खंकरे ,हरिभाऊ शेटे उमेश माळगे शंकर पाटील व मोठ्या प्रमाणात लिंगायत बांधव मान्यवरांनी मा .पोलिस महानिरीक्षक, नांदेड व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी प्रकरणाची विशेष दखल घेऊन फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा
पीडित कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे
खटला प्रभावीपणे लढण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी निवेदनात इशारा देण्यात आला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लिंगायत समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. यावेळी समाजातील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते ..

