मुखेड: भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम (NPSE) राबविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती (NTAC) स्थापन केली असून, या समितीत मुखेड येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप पांडुरंगराव पुंडे यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, या गौरवपूर्ण निवडीच्या निमित्ताने नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते मुखेड येथे डॉ. पुंडे यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदारांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया रवींद्र चव्हाण, ॲड. बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) बाबुराव कदम, बालाजी पाटील बेटमोगरेकर, राजवंश रविंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच पुंडे हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉ. पुंडे यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. दिलीपराव पुंडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुंडे हॉस्पिटलच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण व सौ. सोनिया चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भागात अत्यंत मर्यादित साधनसामग्रीमध्ये काम करत असताना डॉ. दिलीप पुंडे यांनी सर्पदंशासारख्या गंभीर विषयावर केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील समितीत त्यांची निवड करून मुखेडच्या भूमीचा सन्मान केला आहे. ही केवळ डॉ. पुंडे यांची नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची अभिमानाची बाब आहे. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यासाठी अशा तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते. सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जनजागृती, तात्काळ उपचार व्यवस्था आणि संशोधन यामध्ये डॉ. पुंडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप पुंडे यांनी भारत सरकार, NCDC आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले. सर्पदंशामुळे ग्रामीण भागात अनेकांचे प्राण जातात. योग्य वेळी उपचार आणि जनजागृती यामुळे मृत्यूदर कमी करता येऊ शकतो. राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुभव देशपातळीवर मांडण्याची संधी मिळणार असून, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व अभिमानास्पद होते. उपस्थितांनी डॉ. पुंडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.