प्राचीन काळापासून शिक्षणाला भारतात अतिशय महत्वाचे व मानाचे स्थान आहे.भारतात शैक्षणिक कार्य हे पवित्र समजले जाते.याच पवित्र क्षेत्रात आज अपवित्र घटना घडत आहे.पूर्वी शिक्षणात चारित्र्य शिक्षणाला महत्व होते.आजही आधुनिक भारतामध्ये शिक्षणाला केवळ करिअरचा मार्ग मानले जात नाही,तर तो कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचा,सामाजिक प्रतिष्ठेचा,आर्थिक उन्नतीचा आणि चारित्र्याचा आधार मानला जातो.देशाची प्रगती होत राहीली तशी शिक्षण पद्धतीत,परीक्षा पद्धतीत बदल होत राहीले.विशेषतः नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आयोजित केली जाणारी नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्टरन्स टेस्ट (NEET) ही परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा आहे.डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे अनेक वर्षांच्या परिश्रमांची कसोटी असते.परंतु जेव्हा या परीक्षेवर पेपरफुटी,गैरव्यवहार,गुणफुगवटा आणि व्यवस्थेतील त्रुटींचे आरोप होतात,तेव्हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा राहत नाही;तो संपूर्ण शिक्षणव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा बनतो.शिक्षण व्यवस्थेवरचा समाजाचा,विद्यार्थ्यांचा विश्वास उडतो.नीट पेपरफुटीचा मुद्दा हा केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय विषय नाही.हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा,पालकांच्या आर्थिक त्यागाचा,आणि देशाच्या गुणवत्ताधारित शिक्षणव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.दोष कोणाचा आणि त्याची शिक्षा कोणाला मिळते,हा प्रश्न आज प्रत्येक घरात विचारला जात आहे. समाजात चर्चा एकच आहे.यात दोषी कोण ? कारण परीक्षेत गैरव्यवहार करणारे मोजके लोक असतात;पण त्याची किंमत आज लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांचे गरीब पालक यांना चुकवावी लागत आहे.
नीट परीक्षेचे महत्त्व किती आहे आणि त्यामागील संघर्ष कसा आहे हे फक्त ही परीक्षा देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाच माहिती आहे त्याची जानीव त्यांना आहे.NEET ही परीक्षा भारतातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यांच्यापैकी अनेक जण दोन-दोन,तीन-तीन वर्षे या परीक्षेची तयारी करतात.यात जास्त दुर्देवी आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी.कारण त्यांच्याकडील मर्यादित साधनांमध्ये त्यांना अभ्यास करावा लागतो.ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांचे पालक शेती विकतात,कर्ज काढतात किंवा इतर खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करतात.एका विद्यार्थ्याच्या यशामागे संपूर्ण कुटुंबाची झुंज असते.पालक सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अर्धपोटी राहून राबराब राबतात. तर त्यांचे पाल्यही सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास,कोचिंग,टेस्ट सिरीज,मानसिक ताण,समाजाच्या अपेक्षा हे सर्व सहन करत करत या एका परीक्षेकडे वाटचाल करतात.त्यामुळे परीक्षा घेणे व निष्पक्ष असणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही,तर ती सरकारची नैतिक बांधिलकी सुद्धा आहे.
पेपरफुटी म्हणजे काय?
पेपरफुटी म्हणजे प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही व्यक्तींपर्यंत पोहोचणे.पेपर फुटीचं महात्म्य म्हणजे ही माहिती पैशाच्या मोबदल्यात विकली जाते.यात दलाल,कोचिंग क्लासेस नेटवर्क, स्थानिक अधिकारी,काही भ्रष्ट कर्मचारी आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांचा सहभाग असू शकतो.पेपर फुटीमुळे मुठभर अप्रमाणिक विद्यार्थ्यांचे भलं होईल,मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पैशाने प्रश्नपत्रिका मिळवणाऱ्यांना अनुचित फायदा मिळतो. पेपरफुटी हा प्रकार गुणवत्ताधारित स्पर्धेच्या संकल्पनेलाच धक्का देतो.”मेहनत करा आणि यश मिळवा” हा मूलभूत विश्वास डळमळीत होतो.
पेपरफुटीमध्ये दोष कोणाचा? यात दोष आहे परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचा.परीक्षेचे नियोजन करणे,प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवणे,केंद्रांचे निरीक्षण करणे आणि निकाल प्रक्रिया राबविणे यांची अंतिम जबाबदारी संबंधित संस्थांवर असते. NTA वर परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याची जबाबदारी असते.अधिकृत माहिती,परीक्षा सुधारणा आणि धोरणांसाठी NTAची अधिकृत वेबसाइट उपयुक्त ठरते.जर प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यात त्रुटी राहिल्या तर ती संस्थात्मक जबाबदारी ठरते.एन टी ए बरोबरच भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यात दोषी आहेत.हे घरभेदी आहेत.या व्यक्ती गोपनीय माहिती पैशासाठी विकतात,हे भ्रष्ट लोक शिक्षणव्यवस्थेचा विश्वासघात करतात.अशा लोकांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होतो आहे.
पेपर फुटी मध्ये दलाल तेवढेच दोषी आहेत आणि तेच गैरव्यवहाराचे जाळे विणतात.पेपरफुटी ही अनेकदा संघटित गुन्हेगारी स्वरूपात चालते. काही लोक पालकांच्या असुरक्षिततेचा फायदा घेतात आणि “निश्चित यश”ची खोटी हमी देतात.
आजकाल कोचिंगक्लेसेसचे पेव फुटले आहे. त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा दिसून येत आहे . अनैतिक कोचिंग संस्कृती वाढीस लागलेली आहे. यात सर्वच क्लासेसना दोषी ठरवता येणार नाही.
बहुतेक कोचिंग संस्था प्रामाणिक काम करतात; परंतु काही ठिकाणी निकालाच्या स्पर्धेत अनैतिक मार्गांचा अवलंब केला जातो.यामुळे संपूर्ण क्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे.
पेपरफुटीमध्ये राजकीय आणि प्रशासकीय निष्क्रियता ही दिसून येते.गैरव्यवहाराच्या घटनांनंतर थातुर मातूर चौकशी,अटक आणि निवेदने दिली जातात;पण दीर्घकालीन सुधारणा उशिरा होतात.जबाबदारी निश्चित न झाल्यास आश चुका पुन्हा पुन्ह घडतात.पेपर फुटीमध्ये समाजातील काही मोजक्या लोकांना “कसेही करून यश” मिळवणे ही मानसिकता दिसून येते.जेव्हा गुण आणि प्रतिष्ठेला प्रामाणिकपणापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते, तेव्हा गैरव्यवहाराला खतपाणी मिळते.
दोष विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आहे का?
बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक पूर्णपणे निर्दोष असतात.विद्यार्थी आणि पालक ते प्रामाणिकपणे अभ्यास,त्याग आणि संघर्ष करतात.उलट तेच या व्यवस्थेचे सर्वात मोठे बळी ठरत असतात.काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये कोणी गैरमार्ग स्वीकारत असेल;परंतु अशा काही घटनांवरून संपूर्ण विद्यार्थी-पालक,समाजाला दोष देणे अन्यायकारक आहे.पेपर फुटीमध्ये सर्वाधिक भरडले जातात प्रामाणिक विद्यार्थी.या विद्यार्थ्यांना अनेक पातळ्यांवर नुकसान सहन करावे लागते जसे की,विद्यार्थ्यांचा मेहनती वरचा विश्वास कमी होतो.त्यांचा मानसिक ताण वाढतो.त्याच्यात निकालाबाबत अनिश्चितता निर्माण होते.
पुनर्परीक्षेची शक्यता निर्माण होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढासळतो.काही विद्यार्थी नैराश्यात जातात.काही विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केवळ शैक्षणिक संधी नसून त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीची आशा असते. यामागे पालकांचा त्याग आणि वेदना दडलेल्या आहेत.पालक वर्षानुवर्षे मोठा खर्च करतात कोचिंग फी,वसतिगृह,पुस्तके,प्रवास,चाचण्या. अनेक कुटुंबे आर्थिक अडचणी सहन करतात. त्यांना अपेक्षा असते की किमान परीक्षा प्रामाणिक आणि निष्पक्ष असेल.जेव्हा पेपरफुटीची बातमी येते,तेव्हा पालकांना वाटते की त्यांच्या त्यागाचा आणि मुलांच्या कष्टांचा अपमान झाला आहे.पेपर फुटीचा परिणाम ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर जादा होतो.शहरी भागातील साधनसंपन्न विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांवर याचा अधिक परिणाम होतो.कारण त्यांच्यासाठी प्रत्येक प्रयत्न अत्यंत मौल्यवान असतो.पेपर फुटीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.मानसिक दृष्टीने पाहिले तर अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता,असुरक्षितता, निराशा आणि आत्मसंशय वाढू शकतो. “मी मेहनत करूनही मला न्याय मिळेल का?” हा प्रश्न त्यांच्या मनात सतत राहतो.यामुळे शिक्षणव्यवस्थेवर विश्वासाचे संकट निर्माण होत आहे.शिक्षणाचा पाया गुणवत्तेवर आणि समान संधीवर उभा असतो.पेपर फुटीमुळे हा पाया कमकुवत होत आहे.पेपर फुटीमुळे समाजात असा संदेश जात आहे की मेहनती पेक्षा पैशाला आणि संपर्काना जास्त महत्त्व आहे.आणि ही भावना लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना ही धक्का देत आहे.
पेपरफुटी चौकशीसाठी न्यायालये आणि चौकशी संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते . सुप्रीम कोर्ट,सी बी आय (CBI) आणि इतर चौकशी यंत्रणा अशा प्रकरणांत महत्त्वाची भूमिका बजावून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.पारदर्शक चौकशी ही सार्वजनिक विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.
पेपरफुटी भविष्यात होवू नये म्हणून काही सुधारणा करायला हव्यात.प्रश्नपत्रिका सुरक्षेसाठी अत्याधुनिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे .त्यात
डिजिटल एन्क्रिप्शन (विशिष्ट कोड भाषा ), वेळेवर नियंत्रित प्रवेश आणि बहुपातळी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.परीक्षेचे स्वतंत्र लेखापरीक्षण झाले पाहिजे.प्रत्येक मोठ्या परीक्षेनंतर स्वतंत्र सुरक्षा आणि प्रक्रिया ऑडिट झाले पाहिजे.
आपल्या येथील सरकारी यंत्रणा तहान लागली तर विहीर खोदनारी आहे.घटना घडली की तात्पुरती जुजबी चौकशी करण्याचं सोंग घेतात . येथे दोषी शोधुन त्या दोषींना कठोर शिक्षा देत नाहीत.खरं तर त्यांना आर्थिक दंड,दीर्घ कारावास झाले पाहिजे.आणि त्यांच्यावर सार्वजनिक जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
पेपर फुटीचा सर्वांत जादा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असते. त्यामुळे त्यांचे समुपदेशन होणे महत्वाचे आहे.मानसिक आधारासाठी शाळा आणि महाविद्यालयांत समुपदेशन सेवा निर्माण केली पाहिजे.परीक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करून
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावयास पाहिजे आणि केंद्रांचे रिअल-टाइम निरीक्षण करणे ही आवश्यक आहे.
क्षणिक फायद्यासाठी पालक प्रलोभनाला बळी पडतात.यासाठी पालकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.दलालांच्या खोट्या आश्वासनां पासून पालक विद्यार्थी सावध राहणे आवश्यक आहे.परीक्षा पेपर फुटीमध्ये माध्यमांची जबाबदारी ही महत्वाची आहे.भारतीय माध्यमाची भूमिका केवळ सनसनाटी निर्माण करणे नसून तथ्याधारित चर्चा घडवून आणणे ही आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून संतुलित वृत्तांकन करणे आवश्यक आहे.
पेपर फुटी हा व्यापक सामाजिक प्रश्न आहे.
पेपर फुटीचा मुद्दा आपल्याला विचारायला आणि विचार करण्यास भाग पाडतो, “आपण मुलांना प्रामाणिक परिश्रमाचे मूल्य शिकवत आहोत की कोणत्याही मार्गाने यश मिळवण्याची मानसिकता? “
सरकारी यंत्रणा आणि सरकारने केवळ तात्पुरती चौकशी करून थांबू नये.शासनाच्या शिक्षण विभागाने परीक्षा सुरक्षा,संस्थात्मक जबाबदारी आणि त्वरित दुरुस्ती यासाठी ठोस धोरणे राबवली पाहिजेत.अधिकृत माहिती आणि उपक्रमांसाठी शिक्षण मंत्रालय उपयुक्त आहे.
मला या लेखातून माझ्या विद्यार्थ्यांना संदेश द्यावयाचा आहे की , ” प्रामाणिक परिश्रमाचे मूल्य तात्पुरत्या अन्यायापेक्षा मोठे असते. व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध आवाज उठवणे आणि न्यायाची मागणी करणे हे लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्य आहे. “
नीट पेपर फुटीमध्ये दोष विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा नाही; दोष त्या व्यवस्थेचा आहे जी सुरक्षित,निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा घेण्यात अपयशी ठरते.दोष त्यांचा आहे जे पैशासाठी शिक्षणव्यवस्थेचा विश्वासघात करतात.आणि सर्वाधिक भरडले जातात ते लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक,ज्यांनी आपल्या स्वप्नांसाठी सर्वस्व पणाला लावलेले असते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न हे केवळ एका विद्यार्थ्याचे नसते; ते संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न असते.या स्वप्नावर पेपरफुटीचा डाग पडू देणे म्हणजे देशाच्या भवितव्याशी अन्याय करणे होय.
शिक्षणव्यवस्थेचा पाया विश्वासावर उभा असतो. हा विश्वास टिकवण्यासाठी कठोर कारवाई, तांत्रिक सुधारणा आणि नैतिक बांधिलकी आवश्यक आहे. अन्यथा प्रश्न कायम राहील दोष काहींचा ; पण शिक्षा लाखोंना का?राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड – ६
९९२२६५ २४०७ .

