कंधार:(विश्वांबर बसवंते )
तालुक्यात दि.४ जून रोज गुरुवारी दुपारी ४:३० वाजताचे सुमारास अचानक वादळी वारा, जोराचा पाऊस त्यात विजांच्या तांडवाणे थैमान घालण्यास सुरुवात केली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली, विद्युत पोल मोडून पडले, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडे उनमळून पडले तर जंगमवाडी येथील नारायण सूर्यकांत वाडीकर या शेतकऱ्यांची एक सात वर्षाची दुभती म्हैस ठार झाली असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
येत्या काही दिवसांवर खरीप हंगाम हा तोंडावर येऊन ठेपला असून, शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकरी आपल्या जीवाची तमा न बाळगता उन्हाच्या तीव्र झळा सोसत शेती मशागत कामात व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी, वखारणे व इतर शेती कामे करण्यास वेग आला आहे. अवेळी पडणारा अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दि.४ जून रोज गुरुवारी कंधार तालुक्यातील जंगमवाडी येथील शेतकरी नारायण सूर्यकांत वाडीकर यांची दुपारी अंदाजे ४:३० वाजताचे सुमारास वादळी वाऱ्यामध्ये वीज कोसळून एक म्हैस जागीच ठार झाली असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी अमर बसवंते यांनी दिली असून, घटनास्थळ पंचनामा केला असल्याचे सांगितले. फुलवळ येथील रहिवासी धोंडीबा बाबाराव बाबाराव कानगुले यांचे राहते घरावरील टीन पत्रे उडून घरातील जीवन आवश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे गरीब परिस्थिती असलेले कानगुले कुटुंब उघड्यावर पडले असून, आर्थिक अडचणीत सापडले आहे. सदरच्या घराचा स्थळ पंचनामा ग्रामपंचायत अधिकारी बालाजी भायेगावे यांनी करून पुढील कार्यवाहीस्तव कंधार गटविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठवला असल्याचे सांगितले आहे.

