कंधार : प्रतिनिधी
लोकशाहीर, साहित्य कोहिनूर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहादरपुरा (ता. कंधार) येथे शनिवारी (दि. १८) अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाभागातील लढे आणि लाल बावटा चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला यावेळी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे पदाधिकारी, अनुयायी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल गुंडाजी गायकवाड, उपाध्यक्ष विनोद दत्ता कांबळे, सचिव सतीश बालाजी गायकवाड, कोषाध्यक्ष जगदीश सूर्यकांत गायकवाड, सहकोषाध्यक्ष विलास भगवान भंडारे, सहसचिव विकास रमेश गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख विकास कळबा गायकवाड यांच्यासह विठ्ठल व्यंकटी गायकवाड, संजय गायकवाड, गेंदाजी गायकवाड, राजेश गायकवाड, दिगंबर गायकवाड, बालाजी सूर्यवंशी, साहेबराव निवघेकर, डॉ. प्रा. प्रकाश डोम्पले, निवृत्ती गायकवाड, शिवाजी गायकवाड, तुळशीराम गायकवाड, नागेश बसवंते, संभाजी डोम्पले, कृष्णा भंडारे, अनिल गायकवाड, महेबुब साठापुरे, पंढरी वाघमारे, विलास भंडारे, प्रतीक गायकवाड, मारोती भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. प्रकाश डोम्पले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बहादरपुरा येथील क्रांतिभुवन परिसरात माजी खासदार तथा आमदार डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन ६ नोव्हेंबर १९९३ रोजी माजी आमदार गुरूनाथराव कुरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. हा पुतळा अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा जिवंत वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांचे लेखन कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या संघर्षाला आवाज देणारे आहे. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे,” हा त्यांचा विज्ञानवादी आणि श्रमप्रतिष्ठेचा विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.
ग्रामीण जीवन, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, अन्याय आणि शोषण यांचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लावण्यांमधून प्रभावीपणे मांडले. ‘फकिरा’ ही त्यांची गाजलेली कादंबरी सामाजिक संघर्षाचे ज्वलंत दर्शन घडवते. त्यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनासाठी आजही मोठा प्रभाव असून, त्यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

