अज्ञात वाहनाची छत्रपती शिवाजी महाराज चबूतऱ्याला धडक..;मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळे रखडला सर्व्हिस रोड , सुदैवाने जीवितहानी टळली

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जात असून येथील बसस्थानक शेजारी नियमाने मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड मंजूर असतांना ही काही मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे एका बाजूचा रस्ता तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून रखडला असल्याने निर्माण झालेल्या धोकादायक वळणावर अधूनमधून छोटे मोठे अपघात होतच आहेत परंतु ता. ७ ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे एका अज्ञात वाहनाने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारलेल्या चाबूतऱ्याला जोराची धडक देऊन चकनाचूर केले , सुदैवाने त्यावेळी सदर रस्त्यावर लोकांची वर्दळ नव्हती म्हणून जीवितहानी टळली.

 

नांदेड ते उस्मानागर , फुलवळ मार्गे उदगीर जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे काम गेली दोन ते अडीच वर्षांपासून चालू असून अद्यापही तो रस्ता पूर्णत्वास आला नसल्याने अनेक ठिकाणी काम अर्धवटच आहे. सदर रस्त्याचे काम करणारी के. सी.एल. कंपनी होती. ठिकठिकाणी अर्धवट कामे सोडून फुलवळ च्या शेजारी टाकलेला प्लान्ट बंद करून त्या कंपनीने पळ काढला आहे.

 

प्रशासनाच्या बाजूने सदर रस्त्याचे काम पाहण्यासाठी किंवा ज्यांच्या अधिपत्याखाली हे काम चालू होते व आहे त्या अधिकाऱ्यांना , संबंधित ठेकेदाराला व राष्ट्रीय महामार्ग च्या कार्यालयाला तसेच या भागातील लोकप्रतिनिधींना अनेक वेळा वारंवार सदर अर्धवट कामाबद्दल व फुलवळ येथील सोडून दिलेल्या एक बाजूच्या सर्व्हिस रोड बद्दल कल्पना देऊन ते अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी फुलवळ ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी लेखी , तोंडी विनंती ही केली. परंतु मींया बीबी राजी तो क्या करेगा काजी या उक्ती प्रमाणे संबंधित ठेकेदाराला हाताशी धरून त्या अधिकाऱ्यांनी आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हरा आधा हमारा असे करत आपापली पोळी भाजून घेतली आणि आपल्या मुजोरपणात मनमानी करत सदर काम हे आहे तसेच अर्धवटच सोडून दिले.

 

फुलवळ ची जनता तशी जागरूक आहे प्रत्येकाने जमेल तशा पध्दतीने सदर अर्धवट काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले , एवढेच नाही तर विविध वर्तमानपत्रातून वारंवार यासंदर्भात बातम्याही छापून आल्या. परंतु मुजोरीचा कळस गाठलेल्या अधिकारी व ठेकेदाराला याचा कसलाच प्रभाव पडला नसून अशा कितीही बातम्या छापून आल्या तरीही आम्ही आमचाच मनमानी कारभार करणार याची प्रचिती दिली. परंतु या गंभीर बाबीकडे ना कोणते वरिष्ठ लक्ष घालतात ना ही या भागातील लोकप्रतिनिधी यासंदर्भात कोणाला जाब विचारतात.

 

 

नुकतीच फुलवळ येथे घडलेली भयानक घटना पाहता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुदैवाने या घटनेच्या वेळी येथे रस्त्यावर माणसांची वर्दळ नव्हती म्हणून जीवितहानी टळली पण भविष्यात कधीही अशी भयानक घडू शकते आणि जीवितहानी होऊ शकते तेंव्हा प्रशासनाने वेळीच जागे होऊन सदर रस्त्याचे अर्धवट राहिलेले आणि फुलवळ येथील एका बाजूने राहिलेल्या सर्व्हिस रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *