
मुखेड : (दादाराव आगलावे)
सामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी कायम एकरूप राहून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे, प्रशासनावर प्रभावी पकड असलेले आणि विकासाला नवे आयाम देणारे लोकनेते स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीपती पवार यांनी केले.
येथील शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयात स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी डॉ. वेदांत पुलागोर, डॉ. जी. रमणा रेड्डी, प्रा. देविदास वाडेकर, प्रा.डॉ. केशव पाटील तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष माधव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. श्रीपती पवार पुढे म्हणाले की, मा. अजितदादा पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली. प्रशासनातील शिस्त, निर्णयक्षम नेतृत्व आणि जनसामान्यांविषयी असलेली आत्मीयता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. गरजू व गोरगरीब नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकारी व कार्यकर्त्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा.डॉ. वेदांत पुलागोर यांनीही मा. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या समाजाभिमुख नेतृत्वाचे विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडून सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम. एस. सगरोळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. माधव मंडेवाड यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन डॉ. सोपान ढवळे यांनी केले. याप्रसंगी प्रा. माधव वाघमारे, डॉ. आश्विनी बारस्कर, डॉ. सुदाम फड, डॉ. स्वानंद मुखेडकर, प्रा. आण्णाराव मुंडे, प्रा. शिवाजी पाडदे, डॉ. महेश बच्चेवार, प्रा. उद्धव अंबुलगेकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सकनुरे, सी. जी. सागरे आणि व्यंकट पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.





