गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः !
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः !!यावर्षीच्या गुरुपौर्णिमेची पूर्वसंध्या काळकुट्ट अंधार घेऊन आली. माझे सूत्रसंचलन क्षेत्रातले गुरु, ज्यांनी मला सूत्रसंचलनाच्या माध्यमाने मंचावर उभं राहण्याचं बळ दिलं ते आदरणीय प्राचार्य डॉ. निवृत्ती हणमंतराव पाटील कौसल्ये यांचे दिनांक ९/७/२०२५ रोजी बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आणि अखेर मंत्रमुग्ध करणारा, शब्दांना आकार देणारा आणि आकारात शब्द गुंफणारा आवाज थांबला!
फोनवर तासनतास बोलताना चर्चेला पूर्णविराम मिळतो की नाही, असा ऐकणाऱ्यालाच नाही, तर चर्चेलाच प्रश्न पडणाऱ्या ज्ञानाच्या भांडार असणाऱ्या ज्ञानकुबेराच्या जीवनाला पूर्णविराम मिळाला ही बातमीच मन स्वीकारत न्हवत. या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. पण नियतीने डाव साधला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुपौर्णिमा होती. मागील सलग पंधरा वर्षांपासून मी माझे गुरु पूज्य. तपोरत्न प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज व त्यांच्या शिवैक्यानंतर गेली चार वर्षे श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या माजलगाव येथे संपन्न होणाऱ्या भव्य गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी माजलगाव येथे जायचो. पण यावर्षी मात्र ही घटना घडली, आणि माझ्यासमोर धर्मसंकट उभे राहिले. एकीकडे माझी जीवनरूपी नौका योग्य दिशेने मार्गस्थ होण्याची शिकवण देणारे गुरु दिसत होते, तर दुसरीकडे ज्यांनी सूत्रसंचलनाचं मार्गदर्शन करून सांस्कृतिक रंगमंच असो, राजकीय मंच असो, गुराखीपीठ असो, की धर्मपीठ असो, यावर उभे राहून बोलण्याचं बळ दिलेले गुरु निवृत्ती कौसल्ये सर दिसत होते. त्यांचा आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंत्यविधी होता. आज ते कधीच न दिसण्यापल्याड जाणार होते. म्हणून रात्रीच जड अंतःकरणाने श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांची परवानगी घेऊन सरांच्या अंत्यविधीसाठी थांबलो.
अंत्यविधी समयी चिंचोली येथे संपन्न झालेल्या शोकसभेत सूत्रसंचलन करताना सरांबद्दल बोलावं असं वाटत होतं. पण सरांचे जोडलेले मित्र, अधिकारी वर्ग, राजकीय क्षेत्रातील मान्यवर हे सरांबद्दल बोलून आठवणींना उजाळा देत होते. जवळपास एक ते दीड तासाची शोकसभा संपन्न झाली. वातावरण पावसाचं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी मोजक्या शब्दांत सूत्रसंचलनाशिवाय काहीच बोलू शकलो नाही. म्हणून सरांबद्दल हे चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न!
सरांचं चिंचोली हे गाव कंधार तालुक्याच्या मन्याड खोऱ्यातले असल्यामुळे बालपणापासून डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या पुरोगामी, क्रांतिकारी विचाराने कौसल्ये सर भारलेले होते. लहानपणापासूनच भाईंची भाषणे ऐकून शेतकरी कामगार पक्षाबद्दल त्यांना ओढ होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, त्याकाळी भाईसाहेबांनी गुरुनाथरावजी कुरुडे साहेबांसारख्या असंख्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन, जनतेच्या सहकार्यातून स्थापन केलेल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या श्री शिवाजी कॉलेज, कंधार या महाविद्यालयात सरांनी सुरुवातीला ज्युनियर लेक्चरर व नंतर सीनियर लेक्चरर म्हणून ज्ञानदानाचे काम करताना समाजशास्त्र विषय शिकवायचे. सरांचा तास विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारा असायचा. त्यांनी समाजशास्त्र विषयाचा विभागप्रमुख म्हणून काम करताना महाविद्यालयात समाजशास्त्राचा पदव्युत्तर विभाग सुरू करण्यासाठी खूप कष्ट घेतले. दरवर्षी समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात आज याचं श्रेय कॉलेजबरोबर कौसल्ये सरांनाही जातं.
डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून 1991 पासून सुरू झालेले जागतिक गुराखी साहित्य संमेलनात सरांनी कित्येक वर्ष आपल्या सूत्रसंचलनातून साहेबांच्या विचारांना पुढं नेत रसिक श्रोत्यांच मन जिंकल.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव खंडेरायाची यात्रा या यात्रेत तमाशा कलावंतांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी आदरणीय कौसल्ये सरांनी १९८६ साली, कंधार पंचायत समितीचे तत्कालीन सभापती मा. व्यंकटरावजी मुकदम साहेब, जि.प. नांदेडचे कॅफो ( वित्त व लेखाधिकारी) माननीय एकनाथरावजी मोरे साहेब, गटविकास अधिकारी सुधाकररावजी शिंदे साहेब यांच्या मदतीने कलमहोत्सव सुरू केला. तिथून पुढे अनेक वर्ष या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचलनही केले. कलाकारांच्या व्यथा आपल्या बोलण्यातून मांडल्या. सर माईकमधून बोलू लागले की त्यांच्या बोलण्याला त्या काळचे रसिक खूप दाद द्यायचे. घडीतच खळखळून हसायचे, तर घडीतच गंभीर व्हायचे एवढी सरांच्या शब्दांत आणि त्यांच्या आवाजात ताकद होती. आपल्या सूत्रसंचलनातून रसिक राजांच्या हृदय सिंहासनावर सरांनी अनेक वर्ष अधिराज्य गाजवल. जेंव्हा सूत्रसंचलन सोडलं, त्यावर्षी तर रसिक मायबापांनी “कौसल्ये सर, कौसल्ये सर” म्हणून गोंधळ घातला.त्यांच्या सूत्रसंचलनाची मागणी होऊ लागली. ते शक्य नव्हतं, म्हणून शेवटी प्रशासनाला रसिक राजांची समजूत काढावी लागली. एवढी ताकद त्यांच्या शब्दात आणि आवाजात होती. सूत्रसंचलनातून प्रशासनावर ताशेरे ओढून झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्याचा तो आवाज आता शांत झाला !
माझ्या माहितीनुसार मागच्या दहा वर्षांपूर्वी, याच खंडेरायाच्या यात्रेत सरांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. दिलीप पा. बेटमोगरेकर यांच्याकाळात त्यांचे सहकारी डॉ. पुरुषोत्तमराव धोंडगे, दिलीपदादा धोंडगे, प्रवीण पा. चिखलीकर, संजय पा. बेळगे, बाबुराव पा. गिरे, संजय पा. कऱ्हाळे यांच्या सहकार्याने व जि प. व पंचायत समिती प्रशासनाच्या माध्यमातून लावणी महोत्सव सुरू केला. यासाठी सरांनी अनेक कलाकेंद्रांना भेटी दिल्या, अनेक दिग्गज लावणी कलावंतांना आमंत्रित केलं.दिग्गज कलावंतांना आमंत्रित करताना शाहीर प्रेमकुमार मस्के व अनुराधा नांदेडकर या आपल्या तालुक्यातल्या लोककलावंतांना आमंत्रण द्यायला सर विसरले नाहीत. खास लावणीचं निवेदन करणारे स्वर्गीय बच्चू पांडे यांना त्यांनी आमंत्रित केलं, आणि पारंपरिक लावणी महोत्सव चालू करून अस्खलित पारंपरिक लावण्यांची पर्वणी कंधार व लोहा तालुक्यातील रसिक मायबापांना दिली.
सरांबरोबर अनेक वेळा तमाशाच्या तंबूत जाण्याचा, लोकलावंताना भेटण्याचा योग आला. सरांना पाहिल्याबरोबर मास्टर रघुवीर खेडकर, मंदा राणी, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मालती इनामदार यांच्यासारखे दिग्गज कलाकार सरांचे चरण स्पर्श केलेले मी अनेक वेळा पाहिले. भेटल्यानंतर कलाकारांशी आत्मीयतेने बोलणं हे कौसल्ये सरांकडून शिकण्यासारखं होतं. तेव्हाच कळायचं या माणसाची या क्षेत्रातली उंची किती आहे… असो.
माझ्या आयुष्यात महात्मा बसवेश्वर दुर्गा नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून, माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून मीही दररोज वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे प्रयत्न केले. यासंदर्भात अनेक वेळा सरांचं मार्गदर्शन घेतलं. महोत्सवात अफाट गर्दी असायची. सरांना एक-दोन वेळा स्पर्धेच्या निमित्ताने बोलावून, नवरात्र महोत्सवाच्या वतीने सन्मानही केला. कार्यक्रम पाहून त्यांनी मंडळाचे व माझ्या सूत्रसंचलनाचे भरभरून कौतुकही केलं.
डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या प्रेरणेतून चार दिवस चालणाऱ्या छ.शिवाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती व द्वादशपूजा देवी यात्रा या संयुक्त महोत्सवात यावर्षी आमच्या मंडळाला प्रायोगिक तत्त्वावर लावणी महोत्सव घ्यायचा होता. काही तांत्रिक कारणामुळे यात्रा रद्द करावी लागली. या विषयावरही माझी व सरांची चर्चा झाली होती. सरांनी मला, “मी तुला मदत करणारच,” असं सांगितलं होतं. पण एक स्पष्ट सांगितलं होतं “माधव, तमाशा कलावंतांचं आयुष्य अठरा विश्व दारिद्र्य पचवून भाकरीचा चंद्र शोधण्यात जातं. कलावंतांचा दिवसाचा चेहरा वेगळा आणि रात्रीचा चेहरा वेगळा असतो. दिवसाच्या चेहऱ्या पाठीमागे दुःख दडलेलं असतं तर रात्रीचा आनंदी चेहरा त्याचं दिवस भराचं दुःख विसरून आमचं दिवस भराचं दुःख विसरायला लावतो आणि आपलं मनोरंजन करतो. म्हणून कलावंतांच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या चेहऱ्यातलं अंतर जो जाणतो, तोच कलावंतांचा मायबाप असतो. म्हणून कलावंतांच्या मानधन देण्याला हात आखडता घेऊ नकोस. आवश्यकता असेल तर मी स्वतः मुक्तेश्वर भाऊंना, पुरुषोत्तम भाऊंना बोलेन. आपल्याला यात्रा वाढवायची आहे. साहेबांनी सुरू केलेल्या परंपरा वैभवाने पुढे चालवणं हे आपलं कर्तव्य आहे,” असं ते म्हणाले.
एकदा सकाळीच माझ्या घरी आले होते. त्यांना पेपर वाचण्याचा मोठा छंद होता. माझ्याकडे पेपर घरी येत नसे. मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं सर मी पेपर कॉलेजला च वाचतो त्यावेळी त्यांनी माझा जाहीर निषेध केला. सर्व पेपर वाचल्याशिवाय त्यांचा दिवस जात नसे. अंत्यविधीच्या दिवशी सकाळी पुष्पहार अर्पण करायला गेलो , त्यावेळी अशीच चर्चा झाली. दिग्विजय म्हणत होता, “पप्पांना दवाखान्यातसुद्धा सर्व पेपर वाचायला हवे होते. दररोज पाव किलो वजनाचे पेपर जमा होत होते. सर्व पेपर पप्पा वाचत होते.” अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली.
फोनवर बोलण्याला महिना, पंधरा दिवस गेले की सरांचा फोन यायचाच. त्यांचा पहिला शब्द असायचा “माधव, लोकशाही लई दबरली. माणसं लोकशाहीचा लई फायदा घ्यायलेत!” यावर बराच वेळ हसणं व्हायचं. मग कुठे चर्चेच्या मुद्द्याला सुरुवात व्हायची.
अशा अनेक पावलोपावली आठवणी मागे ठेवून कौसल्ये सरांनी जगाचा निरोप घेतला. सरांच्या अचानक जाण्यानं सरांचं कुटुंब तर पोरकं झालंच, तसेच अनेक कलावंत ज्यांना त्यांनी शासन दरबारी मानमरतबा मिळवून दिला, तेही पोरके झाले. त्यांच्या जाण्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती आता भरून निघणार नाही.
कौसल्ये परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याची ईश्वर शक्ती देवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना व सरांना भावपूर्ण आदरांजली.
जय क्रांति !माधव माणिकराव पा. पेठकर,
माजी सरपंच, बहाद्दरपुरा तथा
उपाध्यक्ष, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता. कंधार जि. नांदेड
मो. 9975186883

