जीवन म्हणजे फक्त दिवसेंदिवसाची व्यग्रता, कामांची ओढाताण किंवा जबाबदाऱ्यांचा गोंधळ नाही… तर थांबून स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याची एक संधी आहे.
आपल्यापैकी प्रत्येक जण कुठे तरी उंचावर पोहोचायचं स्वप्न बाळगतो. पण खरी उंची ही कधीच पद पैसा कीर्ती या बाह्य गोष्टींनी ठरत नसते … ती ठरते आपल्या वागण्यातल्या साधेपणाने, आपल्या शब्दांतल्या मृदूपणाने आणि दुसऱ्यांच्या मनात आपण निर्माण केलेल्या स्थानाने.निसर्ग नेहमी आपल्याला शिकवतो की झाडं आकाशाला भिडतात, पण सावली दुसऱ्यांना देतात. फुलं उमलतात, पण सुगंध सगळीकडे पसरवतात.
पाणी वाहतं, पण तहान दुसऱ्यांची भागवतं. सूर्य स्वतः जळतो, पण जगभर प्रकाश पसरवतो.तसंच माणूसही… जर स्वतःपुरता न जगता दुसऱ्यांसाठी जगायला शिकला तरच त्याचे आयुष्य सार्थकी लागेल…
कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले, कुणाचा राग शांत केला, आणि सर्वांशी आदराने वागले, तर त्याचं आयुष्य खरंच सुंदर आणि उंच होत जातं. शब्दांत फार ताकद असते. कठोर शब्द हृदयाला जखम करतात, पण शांत व संयमी व मायेचे शब्द कुणाच्या मनातील जखमेवर मलमाचे काम करतं. म्हणूनच कोणाचाही राग आला तर त्याला रागाने उत्तर देणं ही कमजोरी आहे, पण शांततेने उत्तर देणं ही खरी ताकद आहे.म्हणूनच सुंदर जीवन म्हणजे काय? स्वतः आनंदी राहणं, पण दुसऱ्यांनाही आनंदी ठेवणं. कोणालाही त्रास न देता, प्रत्येकाशी आदराने वागणं. वादात शांती शोधणं आणि कटुत्वात स्नेहबंध निर्माण करणं.
लोक कधी तुमच्या पैशाला, पदाला दाद देतील… पण ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं असेल तर ते तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी, तुम्ही बोललेल्या शांत शब्दांसाठी आणि दिलेल्या आधारासाठीच ठेवतील.
शेवटी…
उंची ही दिसण्यात नाही, ती जाणवण्यात आहे. यश हे पदवीत नाही, ते माणुसकीत आहे आणि कमाई ही संपत्तीत नाही तर ती आठवणीत आहे.
म्हणूनच…
जगणं मोठं नसावं…
ते सुंदर असावं. कारण खरी शान ही दुसऱ्यांच्या मनात उमटलेल्या आपुलकीच्या ठशातच दडलेली असते.✍🏻 दिपाली सावंत
#सुंदरजगणं #खरीउंची #माणुसकी #सकारात्मकता #प्रेरणा #मनशांती #आदरआणिप्रेम #dipalisawant #education #जीवन #शिक्षण

