कंधार: (दिगांबर वाघमारे )
मागील चार दिवसापासून सूर्य अक्षरशः आग ओकत असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उन्हामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना डोके दुखणे, मळमळ होणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे, उलट्या होणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ.माधवराव कुद्रे कंधारकर यांनी सांगितले आहे.
सध्या उन्हाळा सुरू असून, उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे उपाशी पोटी राहू नये. शक्यतो सकाळचे जेवण लवकर करावे. तसेच शेतीची कामे किंवा बाहेरची कामे असतील तर सकाळी लवकर सुरुवात करा, दुपारी बारापर्यंत घरी वापस या. आणि सावलीमध्ये राहा. लिंबू शरबत, गुळ, मठ्ठा, ताक, कैरीचे पन्हे आणि भरपूर पाणी याचा वारंवार वापर करा. उन्हातून घरी आल्याबरोबर ढसा ढसा पाणी पिऊ नका. थोडावेळ सावलीमध्ये शांत बसा आणि नंतर खाली बसून घोट घोट पाणी प्या. ए.सी. व कुलरच्या सानिध्यातून पटकन बाहेर उन्हामध्ये जाऊ नका. मळमळ डोके दुखत असेल, हाता- पायाला गोळे येत असतील व लिंबू शरबत, गूळ खाऊनही बरे वाटत नसेल किंवा अचानक ताप वाढला असेल तर त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय मदत घ्या. निष्काळजीपणा घातक होऊ शकतो. म्हणून स्वतःची व आजूबाजूच्या सर्वांची माणूस म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
शेतामध्ये चरायला जाणारे जनावरे, शेळ्या – मेंढ्या यांनासुद्धा पाण्यातून पीठ – मीठ आणि गूळ देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित शरीरातील क्षाराचे प्रमाण वाढू शकते व त्यांचेसुद्धा उन्हापासून संरक्षण होते. लहान मुलांना किराणा दुकानात मिळणाऱ्या संत्रा गोळ्या खायला दिल्या तर ते आवडीने खातात त्यामुळे त्यांना डीहायड्रेशन होत नाही.
विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात आपल्या घराच्या अवतीभोवती, गावात तसेच शेतामध्ये फळझाडे व सावलीसाठी झाडे लावण्याचा प्रयत्न करा व पारंपारिक पेयामध्ये कैरीचे पन्हे, लिंबू शरबत, ताक, मठ्ठा, गूळ याचा जेवणामध्ये वापर करावा, असे आवाहन डॉ.माधव कुद्रे कंधारकर यांनी केले आहे.

