नांदेड (दिगांबर वाघमारे)
संभाजीनगर हाउसिंग सोसायटी, तरोडा (नांदेड) यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक प्रबोधनकार व सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून कवी पंडित पाटील बेळीकर आणि हिमगिरी साहेब उपस्थित होते.
हिमगिरी साहेबांनी आपल्या भाषणात, “महामानवांचे विचार सर्वांना माहित असूनही ते व्यवहारात का उतरवले जात नाहीत?” असा प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
पंडित पाटील बेळीकर यांनी बसवेश्वरांच्या ‘श्रम म्हणजेच स्वर्ग’ या विचारावर भाष्य करत, अनुभव मंडप ही संकल्पना आजच्या लोकशाही व्यवस्थेची पूर्वपीठिका असल्याचे सांगितले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, जातीयता निर्मूलन आणि शिक्षणाचा हक्क या बाबींवर प्रकाश टाकला.अध्यक्षीय भाषणात दत्ता तुमवाड यांनी भारतातील आर्थिक, सामाजिक व धार्मिक विषमतेवर सखोल भाष्य केले. वर्णव्यवस्थेच्या विविध बंधनांमुळे बहुजन समाजाचे शोषण झाले असून, आजही मानसिक गुलामी कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. “संविधान पुरोगामी असले तरी समाजव्यवस्था प्रतिगामी आहे. त्यामुळे स्वराज्यानंतरही सुराज्यासाठीची लढाई सुरू ठेवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. संयुक्त जयंती हा परिवर्तनाच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे संचालन नागोराव नामवाड यांनी गीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे केले. सोसायटीचे सचिव एल. बी. इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे (सायन्स कॉलेज, नांदेड), जयवंतराव खंडगावकर, एन. जी. कांबळे, आर. सी. कांबळे, कामाजो जाधव, मुरलीधर कदम, सुदर्शन माने, शांताबाई देशमुख, यादवराव झंपलवाड, रामराव मुसळे, चंदापुरे सर, लक्ष्मण ढगे आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.
एकात्मता, समता आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा हा संयुक्त जयंतीचा उपक्रम उपस्थितांच्या मनात ठसा उमटवून गेला.

