कंधार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरा (ता. कंधार) येथील पदोन्नती मुख्याध्यापक तानाजी देवराव कुट्टे यांनी तब्बल ३८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवेनंतर दि. ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त रविवारी त्यांच्या सपत्नीक भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या भावनिक वातावरणात हा सोहळा पार पडला.
येथील नगरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर होते, तर नगराध्यक्ष शहाजी नळगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी बोलताना आ. चिखलीकर यांनी कुट्टे गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. “कुट्टे गुरुजींनी ११ गाव-खेड्यांमध्ये ३८ वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन केले. त्यांनी कर्तव्याशी कधीही तडजोड केली नाही. आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार केले,” अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले.
कंधार तालुक्यातील नागलगाव या छोट्याशा गावात एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी कुट्टे यांनी संघर्षातून आपला जीवनप्रवास घडविला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची ताकद त्यांनी कृतीतून दाखवून दिली. संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे संस्कार जपत त्यांनी समाजाशी घट्ट नाळ कायम ठेवली.
मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या प्रगतीस नवे आयाम दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी घडले, शिक्षकांना प्रेरणा मिळाली आणि विविध शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाले. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, निर्णयक्षमतेत दूरदृष्टी आणि वागणुकीत माणुसकीचे दर्शन घडत असे.शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिवछत्रपती शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था, कंधारचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबविले.यावेळी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, अॅड. बी. के. पांचाळ, डॉ. संजय पवार, स्वप्निल पाटील लुंगारे, म. जफरोद्दीन, डॉ. दीपक बडवणे, भगवान राठोड, उत्तम चव्हाण, मधुकर डांगे, ओम नळगे, राजहंस शहापुरे,हणमंत जोगपेटे, मुनेश शिरसीकर, प्रदीप गित्ते, बालाजी गायकवाड, आनंद पांचाळ, माधव भालेराव, भाऊसाहेब शिंदे, इकबाल शेख, गोविंद वर्ताळे यांच्यासह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौसल्ये यांनी केले तर आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली.

