मुखेड: (दादाराव आगलावे)
आम्ही शिक्षणापासून वंचित राहिलो तरी चालेल, पण आमच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, हा निर्धार मनाशी बाळगत सांगवी ता.जि. नांदेड येथील घिसाडी समाजातील प्रतिभा आणि बबन चव्हाण हे दांपत्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. गरिबी, आर्थिक अडचणी आणि साधनसामग्रीचा अभाव यांचा सामना करत त्यांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला चिकटून राहणे पसंत केले असून त्यातूनच आपल्या संसाराचा गाडा हाकत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत.
बबन दगडू चव्हाण यांचा पारंपरिक व्यवसाय लोखंडापासून शेतीसाठी लागणारी विविध अवजारे तयार करण्याचा आहे. विळा, खुरपे, कोयते, कुऱ्हाडी, टोपले, कढया तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापरातील अनेक साहित्य ते स्वतःच्या हाताने तयार करून विक्री करतात. बदलत्या काळात अनेक पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चव्हाण कुटुंब मात्र आपल्या पूर्वजांकडून मिळालेली ही कला जपून ठेवत आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अखंड परिश्रम करून हे दांपत्य आपला उदरनिर्वाह चालवते. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, त्यांच्या कष्टात कधीच खंड पडत नाही. दिवसभर भट्टीसमोर उभे राहून लोखंड तापवणे, त्याला आकार देणे आणि तयार साहित्य विक्रीसाठी बाजारात नेणे, ही त्यांची रोजची दिनचर्या आहे.
या कष्टातून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नावरच त्यांचा संपूर्ण संसार अवलंबून आहे. बबन दगडू चव्हाण यांचा विवाह किनवट येथील प्रतिभा काशिनाथ शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर प्रतिभा यांनीही पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून साथ दिली. संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी व्यवसायातही योगदान दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड करायची नाही, असा निश्चय या दांपत्याने केला आहे. त्यांची मुलगी पायल आणि मुलगा अभय हे सध्या प्राथमिक शिक्षण घेत आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात मानाचे स्थान मिळवावे, अशी या आई-वडिलांची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी शाळेची फी, पुस्तके, वह्या, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य यांचा खर्च भागवण्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अनेकदा स्वतःच्या गरजांना फाटा देऊन मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले जातात. घिसाडी समाजातील अनेक कुटुंबे आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत.
पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या या समाजाला आधुनिक रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शिक्षण हाच विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग असल्याची जाणीव चव्हाण दांपत्याला आहे. म्हणूनच ते आपल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या कुटुंबाची शासनाकडे एकच अपेक्षा आहे की, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी. शासकीय शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, निवासी सुविधा किंवा इतर योजनांचा लाभ मिळाल्यास मुलांचे शिक्षण अधिक सुलभ होऊ शकते. अशा मेहनती आणि संघर्षशील कुटुंबांना शासनाने विशेष मदत करणे गरजेचे असल्याची भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रतिभा आणि बबन चव्हाण यांचा जीवनप्रवास हा केवळ एका कुटुंबाचा संघर्ष नसून शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटणाऱ्या असंख्य कष्टकरी पालकांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. विपरीत परिस्थितीतही हार न मानता मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे हे दांपत्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बबन चव्हाण प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, आम्ही आयुष्यभर कष्ट केले, पण शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आम्हाला चांगले कळते.
माझा मुलगा अभय आणि मुलगी पायल यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी मी आणि माझी पत्नी प्रतिभा रोज सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करतो. वडिलोपार्जित लोहारकामाचा व्यवसाय करून संसार चालवत आहोत. आर्थिक अडचणी असल्या तरी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू देणार नाही. शासनाने आमच्यासारख्या गरीब व कष्टकरी कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी, एवढीच अपेक्षा आहे.

