नांदेड : प्रतिनिधी
शंकर भंडारे या आश्रमशाळेत शिक्षक असलेल्या कार्यकर्त्याने लिहिलेले ’अंबूजवेल’ हे आत्मचरित्र म्हणजे मातंग चळवळीचा लेखाजोखा आहे. कुठल्याही समाजाने आपल्या उन्नतीसाठी केलेले काम इतरांच्या डोळ्यात खुपण्याचे कारण नाही. आपणाला ’अंबूजवेल’ जगभर घेऊन जायची आहे. त्यासाठी समाजबांधवांनी समाजासाठी कार्य करावे. कृतीशील राहावे.’असे उद्गार माजी आमदार तथा मातंग चळवळीचे नेते राम गुंडिले यांनी शंकर भंडारे यांनी लिहिलेल्या ’अंबूजवेल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना काढले. येथील विसावा हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधन समितीचे सदस्य सचिव शिवा कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सु.मा. कुलकर्णी, किनवटचे माजी नगराध्यक्ष के. मुर्ती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आरंभी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. निर्मल प्रकाशनाचे निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. ’अंबूजवेल’ या आत्मचरित्रातून लेखकाने प्रामाणिकपणे आपला शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रकाशनाने उपेक्षित, वंचित समाजातील लेखक, कवींना प्रकाशात आणण्याचे काम केले आहे, असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना डॉ. जगदीश कदम यांनी ’अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणेतून माझ्यासारखे अनेक लोक लिहिते झाले. त्यामुळे त्यांच्या लेखनाकडे विशिष्ट चष्म्यातून पाहू नये. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यावर शासनाने चित्रपट काढावा. त्यासाठी राम गुंडिले, शिवा कांबळे यांच्या सारख्या समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा,’ असे सांगितले. शिवा कांबळे यांनी भंडारे हे चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा विरूध्द केलेला संघर्ष महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केले.
के. मुर्ती यांनी शंकर भंडारे आणि आपण सामाजिक चळवळीसाठी महाराष्ट्रभर फिरलो असून त्यांनी लिहिलेली रोजनिशी म्हणजेच हे आत्मचरित्र आहे, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सु.मा. कुलकर्णी यांनी भंडारे हे उत्तम कवी आहेत, असे सांगून त्यांच्याकडून कवितासंग्रहाची अपेक्षा व्यक्त केली.
माजी आमदार राम गुंडिले यांनी कर्म सिध्दांत महत्त्वाचा असतो, असे सांगून शंकर भंडारे यांनी वयाचा विचार न करता समाजासाठी यापुढेही कार्य केले पाहिजे. ज्यांच्यामध्ये जी कला आहे ती विकसित केली पाहिजे. ऐंशीच्या दशकात अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची सुरुवात आपण केली, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले. आभार परमेश्वर बंडेवार यांनी मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ अनुवादक भीमराव राऊत, साहित्यिक नारायण शिंदे, रमेश मस्के, शिवाजी जोगदंड, तुकाराम पळसकर, कवी बोईचंद्र, सतीश काकडे, एन.जी. पोतरे, विजय रणखांब, लक्ष्मीबाई भंडारे, डॉ.माधव लोकडे,बा-हाळीकर, केशव शेकापूरकर, संजय मांजरमकर, धनाजी बसवंते, डी. एन. बडूर, नागोराव आंबटवार, जे.एस. खंडगावकर,नारायण एनलोड, आदी उपस्थित होते.

