मुखेड: (दादाराव आगलावे)
आर्य वैश्य मंगल कार्यालय, मुखेड येथे सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रभात मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुखेड भूषण तथा जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. दिलीप पुंडे हे होते.
कार्यक्रमास सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवन कवटीकवार, कार्याध्यक्ष अशोकशेठ कोत्तावार, संघटक उत्तम कुलकर्णी, ज्येष्ठ सदस्य तथा नेपाळ दौरा आयोजक नंदकुमार मडगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहावी परीक्षेत कु. गौरी डॉ. शारदा व डॉ. वीरभद्र हिमगीरे यांनी ९०.२० टक्के, तर चि. हिमांशू डॉ. शारदा व डॉ. वीरभद्र हिमगीरे यांनी ९७.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तसेच बारावी परीक्षेत कु. गायत्री सुनंदा जीवन कवटीकवार यांनी ८२.१७ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचाही यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सुप्रभात मित्र मंडळाचे निवडक सदस्य पशुपतिनाथ, अयोध्या, काशी याचबरोबर विविध ठिकाणी भेटी देऊन सोळा दिवसानंतर नेपाळ यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या अशोक शेठ कोत्तावार, सौ. प्रयाग कोत्तावार, नंदकुमार मडगुलवार, सौ. संगीता मडगुलवार, बालाजी देबडवार, सौ. सविता देबडवार, लक्ष्मीकांत चौधरी, सौ. गीता चौधरी यांचाही सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री शंभू कवटीकवार आणि श्री बालाजी देबडवार यांना सदस्यत्व बहाल करून यांचा सुप्रभात मित्र मंडळात समावेश करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप पुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. गोरक्षण संस्था, मुखेड येथे भरीव योगदान दिल्याबद्दल मनोज जाजू आणि उत्तम कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी नवविवाहित ओंकार चौधरी व सौ. ऋतुजा ओंकार चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला. राहेर येथे धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या उत्तम कुलकर्णी व सौ. उषा कुलकर्णी तसेच तसेच यात्रा पूर्ण केलेल्या प्रवीण कवटीकवार व सौ. जयमाला कवटीकवार यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय गुण मिळवून यश संपादन केले आहे. जीवनात चांगले गुण आणि मार्क्स महत्त्वाचे असले तरी केवळ गुणवान विद्यार्थी बनून चालत नाही, तर चांगले संस्कार, सामाजिक जाणीव आणि माणुसकीची मूल्ये आत्मसात करून गुणवान व्यक्तिमत्त्व घडणे अधिक आवश्यक आहे.
शिक्षणाबरोबरच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने संवेदनशील नागरिक बनावे. सुप्रभात मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेताना डॉ. पुंडे यांनी सांगितले की, अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास (धोंड्याचा महिना) निमित्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट, पांगरा बोखारे संचलित ‘एक परिवार वृद्धाश्रम’, पळसगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ नागरिकांना पुरणपोळी, रसाळी आणि धोंडे या पारंपरिक पदार्थांची प्रेमळ मेजवानी दिली. तसेच गणाचार्य मठसंस्थान, मुखेड येथे पौरोहित्य शिक्षण घेणाऱ्या १५१ जंगम बटूंना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी रस्त्यांवरील मुक्या प्राण्यांसाठी पाण्याचे हौद उभारून मंडळाने समाजापुढे सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास सुप्रभात मित्र मंडळाचे सर्व सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर दिनेश चौधरी यांनी आभार मानले. यावेळी सुप्रभातचे ज्येष्ठ सदस्य नारायणराव बिलोलीकर, डॉ. एम. जे. इंगोले, डॉ. आर. जी. स्वामी, गोपाळ पत्तेवार, डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ. महेश पत्तेवार, बालाजी वट्टमवार, मनोज जाजू, बाळू सीतानगरे, सौ. माला पुंडे, डॉ. शारदा हिमगिरे, अनुजा कोत्तावार, प्रज्वलशेठ कोत्तावार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

