माळाकोळी ; एकनाथ तिडके
अहमदपूर, उदगीर, पालम पाठोपाठ आता लातूर शहराला लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा घाट घातल्या जात आहे , यामुळे येथील भूमिपुत्र शेतकरी व सामान्य नागरिकांना लिंबोटी धरणाच्या पाण्याचा लाभ होणार नाही यामुळे लिंबोटी धरणाचे पाणी कदापिही लातूरला जाऊ देणार नाही यासाठी लवकरच व्यापक आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात विषय समोर आल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सदर इशारा दिला आहे.
लिंबोटी धरण हे लोहा विधानसभा क्षेत्रात असून येथील धरणातून यापूर्वी अहमदपूर, उदगीर ,पालम या तालुक्यांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे, यामुळेच येथील भूमिपुत्र शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोठा फटका बसला आहे, आता जर लातूर शहरा सारख्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा केला तर लोहा क्षेत्रातील शेतकरी व अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांना धरणात पाणीसाठा शिल्लक राहणार नाही यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणे म्हणजे भूमिपुत्र शेतकरी व सामान्य नागरिक यांच्यावर अन्याय करणे होय, यामुळे लातूर शहराला आम्ही पाणीपुरवठा करू देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी दिला आहे लवकरच या संदर्भाने व्यापक जनआंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोहा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना नाहीत या योजना अगोदर शासनाने पूर्ण कराव्यात व लोहा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवावे त्यानंतरच इतर योजनांचा विचार करावा असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासह माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, सदस्य केशव तिडके, प्रसाद जाधव ,मनोज भालेराव, केरबा धुळगुंड, सचिन पवार, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

