मुखेड: (दादाराव आगलावे)
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.प्रभाकरराव सीतानगरे यांचे दि. ७ डिसेंबर, २०२५ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. या अगोदर दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ सुधाकरराव कोडगीरे गेले. अवघ्या वीस दिवसांत काळाने या दोन ज्येष्ठ धन्वंतरींना हिरावून नेले. या दोन डॉक्टरांचे जाणे ही मुखेड वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी हानी व पोकळी आणि मनाला हुरहुर लावणारी बाब असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे,अशी प्रतिक्रिया जेष्ठ धन्वंतरी तथा डब्ल्यू.एच.ओ.चे सदस्य तथा मुखेडभूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, डॉ प्रभाकरराव सितानगरे आणि माझा मागील ३८ वर्षांपासूनचा प्रदीर्घ सहवास. सुप्रभात मित्रमंडळ आणि वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून सातत्याने आमची भेट होत असते.१९९९ साली सुप्रभात मित्रमंडळाची स्थापना कै. अनिल कोत्तावार यांच्या माध्यमातून झाली. यात डॉक्टर्स, व्यापारी, शिक्षक, पत्रकार आदि विविध क्षेत्रांतील मान्यवर आहेत. सुप्रभात मित्रमंडळ म्हणजे मैत्र जीवांचे. मागील २६ वर्षांपासून रोज सकाळी आम्ही भेटतो. विविध राष्ट्रीय, सामाजिक, अध्यात्मिक, साहित्यिक विषयावर चर्चा होत असते. डॉ. सितानगरे सर म्हणजे अत्यंत मितभाषी आणि साहित्याची आवड असलेलं व्यक्तिमत्व. त्यांचे वाचन अफाट होते. चारोळी हा त्यांचा आवडीचा विषय आणि विविध चारोळ्या सांगणे हा त्यांचा छंद. जणू शब्दप्रभूचं. असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी आमची भेट आणि चर्चा झाली नाही.
डॉ सितानगरे म्हणजे अत्यंत संयमी व्यक्तिमत्व. संयम हा त्यांचा संस्कारच होता. मागील ५२-५३ वर्षे त्यांनी मुखेड आणि परिसरातील जनतेस अत्यंत प्रामाणिक वैद्यकीय सेवा दिली. रुग्ण हा त्यांच्या सेवेचा सदैव केंद्रबिंदू राहिला. आपले ज्ञान आणि अनुभवानुसार त्यांनी लाखो रुग्णांना वेदनामुक्त केले. संयम, प्रामाणिकता, मितभाषी आणि नेमकेपणा ही त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये. वैद्यकीय संस्था मुखेड आणि सुप्रभात मित्रमंडळ मुखेडच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आपत्ती व्यवस्थापन, धार्मिक आदि कार्यांसाठी त्यांनी तन,मन आणि धनाने भरभरून योगदान दिले.
डॉ. सीतानगरे, डॉ. स्वामी आणि डॉ. इंगोले यांची मागील पन्नास वर्षांपासूनची घट्ट मैत्री या भागात सदैव चर्चेचा विषय राहिला .त्यांचे प्रत्येक कार्य ते एकमेकांच्या सल्ल्याशिवाय करीत नसत. कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्यापैकी दोघे आले तर तिसरा कुठे ? विचारणा होई व तिसर्याच्या आगमणापर्यंत जागा राखून ठेवली जाई, इतकं सख्य. आता ही पोकळी कायमचीच….. त्याग, समंजसपणा आणि सहनशीलता हा त्यांच्या मैत्रीचा घट्ट पाया होय. त्यांची ही मैत्री टिकवण्यात त्यांच्या कुटुंबियांचे योगदान अत्यंत मोलाचे. ही मैत्री पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
‘दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ।
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा |’
आरोग्य, साथीदार , संतती ,संपत्ती आणि प्रतिष्ठा ही पाचही सुख भगवंतांने त्यांच्या पदरात भरभरून टाकली. त्यांच्या अंत्ययात्रेस हजारोंची उपस्थिती होती .
असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या डाव्या मुठीएवढा असतो पण सामाजिकदृष्ट्या त्यांच्या अंत्यविधीस आलेल्या जनसंख्येवर तो ठरतो. डॉ सीतानगरे यांनी दिलेली सेवा, संकटकाळी अनेकांना केलेली मदत, त्यांचा जनसंपर्क आणि जगण्यातला प्रामाणिकपणा ही त्यांच्या आयुष्याची ओळख. सुप्रभातचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप पुंडे, अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवन कवटिकवार, कार्याध्यक्ष अशोक कोत्तावार, संघटक उत्तमराव कुलकर्णी, डॉ. एम.जे. इंगोले, डॉ. आर. जी. स्वामी, डॉ. वीरभद्र हिमगिरे,नारायणराव बिलोलीकर,नंदकुमार मडगुलवार, शिवाजी कोनापूरे, बालाजी वट्टमवार, मनोज जाजू, लक्ष्मीकांत चौधरी, दादाराव आगलावे, दिनेश चौधरी, प्रवीण कवटीकवार, बालाजी देबडवार, संभू कवटीकवार यांच्यासह सुप्रभातच्या सदस्यांना ते दिलखुलास गप्पा मारायचे.गदिमांच्या गीत रामायणातील ओळी …..
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा |
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. || हेच अंतिम सत्य.
डॉ. प्रभाकरराव सीतानगरे सदैव स्मरणात राहतील.हे दुःख पेलण्यासाठी भगवंत त्यांच्या कुटुंबीयांना आत्मबल देवो ही प्रार्थना .
ओम शांती |ओम शांती || ओम शांती.||

