किनवट येथे आदिवासी समाजातील 410 मुलींची टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत निवड

पालकांच्या डोळ्यात आनंदही आणि अश्रुही !

• पालकांनी मुलींना धैर्य द्यावे – आमदार भीमराव केराम
• आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद – किर्तीकिरण पुजार

नांदेड :- एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट कार्यालयामार्फत आदिवासी जमातीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. यात प्रामुख्याने निवासी आश्रमशाळा व मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला गेला आहे. या मुलींना आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यादृष्टिने प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी वेगळा विचार केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून या मुलींना विकासाच्या प्रवाहात घेता येईल का याची चाचपणी केली. कंपनीच्या मानव संसाधन विभागाने याला तात्काळ प्रतिसाद देत किनवट येथे आपली स्वतंत्र टिम पाठवून दोन दिवस निवड शिबीर घेतले. या शिबिरात तब्बल 410 मुलींना नौकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आदिवासी समाजातील मुलींसाठी किनवट येथे दिनांक 6 व 7 सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिर घेतले होते. यात 600 मुली सहभागी झाल्या. यवतमाळ, धारणी येथील केंद्रांना कल्पना देऊन तेथील मुलींनाही निमंत्रित केले होते. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या पथकाने मुलींशी संवाद साधत यातील तब्बल 410 मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बेंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून 50 किमी अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे.

पुढील शिक्षणापेक्षा कायदानुसार वय पूर्ण झाले की मुलींचे लग्न लावून देण्याची आदिवासी पालकांची मानसिकता या मुलींच्या भविष्याला मर्यादा घालणारी होती. आजही फार कमी प्रमाणात आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांचे पालक तयार होत नाहीत. यात काही परिवर्तन करता येईल का या विचारातून प्रकल्प संचालक किर्तीकिरण पुजार यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी बोलणे केले. सामाजिक कृतज्ञता आणि तत्परता यासाठी आदर्श मापदंड निर्माण करणाऱ्या टाटा कंपनीने यावर तात्काळ प्रतिसाद देत मुलींच्या निवडीसाठी सरळ किनवट गाठले हे विशेष.

तलाईगुडापाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्याची पत्नी अत्यंत भाऊक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार यांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बेंगळूरूला जाते ती सुद्धा नौकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली. याच भावना इतर पालकांच्या नसतील तर नवलच !

पालकांनी मुलींना धैर्य द्यावे
– आमदार भीमराव केराम
आदिवासी भागातील मुलींना शासनाच्या विविध योजनांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. मुलींच्या पालकांनीही थोडे धैर्य दाखवून शिक्षणासाठी त्यांना बाहेर वसतीगृहात ठेवण्यास अनुमती दिली. हे जरी खरे असले तरी शिक्षण घेतल्यानंतर मुलींना जेंव्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते तेंव्हा पालकांनी वेगळा विचार न करता धैर्याने त्यांच्या सोबत उभे राहून मुलींना हिंमत द्यावी असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट व प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच पुजार यांनी हाती घेतलेल्या या विशेष उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. टाटा सारखी कंपनी किनवटच्या आदिवासी भागात येते हे आम्हा सर्वांसाठी भूषणाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा
सर्वोच्च आनंद – किर्तीकिरण पुजार
आपली शासकीय कर्तव्य बजावताना वास्तविक पाहता प्रत्येकाला समाज ऋण फेडण्याची, समाजाप्रती कृतज्ञता जपण्याची संधी मिळत असते. आदिवासी प्रकल्पातील काम हे मानवी मुल्यांना, मागास असलेल्या घरांना नवा प्रकाश देणारे असते. शासनानी ज्याही काही योजना हाती घेतलेल्या आहेत त्या या घटकातील प्रत्येकांना प्रकाश वाटा दाखविणाऱ्या आहेत. मी फक्त यांच्या रोजगारा संदर्भात टाटा कंपनीसमवेत बोललो व याला यश आल्याची भावना आदिवासी प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *