कंधार : (दिगांबर वाघमारे )
राष्ट्रकूटकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कंधार शहरात देशभक्तीची नवी उंची गाठण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ५१ फूट उंच तिरंगी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, हा तिरंगा देशभक्तीचा दीपस्तंभ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कंधार शहरातील गांधी चौक, छत्रपती शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि नरवीर महाराणा प्रताप चौक हे परिसर आधीच शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. विशेष म्हणजे महाराणा प्रताप चौकात लवकरच मेवाडचे पराक्रमी राजा महाराणा प्रताप सिंह यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, त्यामुळे हा चौक शहराचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
कंधार व लोहा तालुक्याचा इतिहासही तितकाच प्रेरणादायी आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामात ५९ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली, तर हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्षात सहभाग घेतला. १३ ते १७ सप्टेंबर १९४८ दरम्यान झालेल्या पोलिस अॅक्शननंतर निजामशाहीचा अंत झाला. हा शौर्यपूर्ण इतिहास आजच्या तरुणाईला देशसेवेची प्रेरणा देणारा ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराणा प्रताप चौक परिसरातील उपलब्ध शासकीय जागेत ५१ फूट उंच तिरंगा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चौकाच्या चारही उपदिशांपैकी कोणत्याही योग्य ठिकाणी हा ध्वज उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त होत आहे.शाळा व शिकवणीसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा तिरंगा प्रेरणास्थान ठरेल. दररोज फडकणारा राष्ट्रध्वज पाहून त्यांच्यात देशप्रेमाची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अक्षरमित्र गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांना निवेदन देऊन गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.शहराला तरुण नेतृत्व लाभले असल्याने या मागणीचा सकारात्मक विचार होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत, कंधार शहरात उभारला जाणारा हा विशाल तिरंगा केवळ सौंदर्यवर्धन नव्हे, तर इतिहास, शौर्य आणि देशभक्तीचे जिवंत प्रतीक ठरणार आहे.

