कंधार/प्रतिनिधी
बहाद्दरपुरा गावाचा फिडर बदलून पूर्ववत करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, नागरी वस्तीतील घरांवरून गेलेल्या धोकादायक विद्युत तारा तात्काळ हटवाव्यात, ग्रामीण भागातील अमानुष लोडशेडिंग बंद करावे, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध करून द्यावे तसेच विविध दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या एजन्सींच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बहाद्दरपुरा ग्रामस्थांनी २९ जूनपासून कंधार येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, १ जुलै रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विश्वनाथ मठपती व सहाय्यक अभियंता मुजीब पठाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ॲड. मुकेश्वरराव धोंडगे,माधवराव पेठकर,गुरुनाथ पेठकर,उत्तम भांगे,मनोहर पेठकर,सरपंच प्रतिनिधी शंकर खरात,ॲड. शिवचरण भांगे,व्यंकट पेठकर यांच्यासह बहाद्दरपुरा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

