महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ‘कृषी कोहिनूर’ वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मंगळवारी गोलेगाव पाटी येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कृषी, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक योगदानाला मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे म्हणाले की, संस्थेच्या वतीने गेल्या ५० वर्षा पासून वसंतराव नाईक यांची जयंती सातत्याने साजरी केली जाते. वसंतराव नाईक यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभेत मांडलेल्या वाडी-तांड्यांवरील शिक्षणाच्या प्रश्नांची दखल घेत वसंतराव नाईक यांनी अनेक वाडी-तांड्यांवर शाळा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दारे खुली झाली.ॲड.मुक्तेश्वर धोंडगे यांनी गोलेगाव पाटी येथे वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही केली. प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या भाषणात डॉ. भाई केशवराव धोंडगे आणि वसंतराव नाईक यांच्यातील अतूट ऋणानुबंध अधोरेखित केले. समाजहितासाठी दोन्ही नेत्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब, वाडी-तांड्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात वसंतराव नाईक यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले. माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव केला, तर माधवराव पेठकर यांनी त्यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक गवते यांनी केले. अध्यक्षीय समारोपात व्ही. जी. चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजसेवा, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य सुनील आंबटवाड, संस्थेचे सदस्य मारोतराव जायभाये, गुरुनाथराव पेठकर, उत्तम भांगे तसेच संस्थेच्या विविध शाखांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.