आकाशातील तळपता तारा होणे शक्य नसेल तर अंगणातील दिवा होऊन सभोवतालच्या ठिकाणाचा परिसर उजळावा. जोवर दिवा पेटत असतो. तोवर तो दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो. तसे आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षक हा समाज सुधारणा करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आत्मबल, आत्मश्रद्धा, आत्मजागृती यामुळे समाजामध्ये तो उठून दिसतो. समाजाचं काही तरी त्यांना देणं लागते. म्हणून समाजासाठी अहोरात्र तो झटत असतो. तेव्हाच त्याच्या कार्याचा सुगंध सर्वत्र पसरत असतो.शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे.” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा* असे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची व्याख्या विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे स्पष्ट सांगितले आहे.संत गाडगे महाराजांनी मोळी विका पण शिक्षण शिका.असे ठणकावून सांगितले. खरोखरच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.
तो पिणारा व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे आपण म्हणू शकतो. आज शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना देण्यासाठी प्रवृत्त केले आहे. टी,ई,टी पास असणाऱ्यांना नोकरीमध्ये राहता येईल, अन्यथा सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल असे म्हटले आहे. त्यासाठी काही संधी देण्यात येतील असे सांगून शिक्षका कडून टीईटी परीक्षा पास करून घेणे त्यांनी बंधनकारक केले आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य आहे. शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे. अनुभवाच्या जोरावर त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत.सुरुवातीला शिक्षक वेगवेगळ्या विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त डी,एड्, बी,एड्, एम. एड्,
एम.फील,पी,एचडी करून अहर्ता धारक होऊन एखाद्या शिक्षण संस्थेत किंवा सरकारी विद्यालयात हजर होतो. जेवढी अहर्ता शैक्षणिक संस्थेत मागवली जाते. तेवढी तो पात्र असतो. परंतु अलीकडे फक्त शिक्षकांचीच परीक्षा घ्यावी म्हणून कोणाच्यातरी सुपीक डोक्यातून या कल्पना बाहेर आल्या आणि शिक्षकालाच घेराव घालून त्याचीच अग्निपरीक्षा घ्यावी. असे अनेक यंत्रणेला वाटत आहे. शिक्षक हा शिस्त प्रिय असतो. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून ज्ञानदानाचा कार्य करून मोठमोठ्या पदावर पोहोचतो. परंतु आज त्याचीच परीक्षा घेऊन योग्यता तपासण्याचं काम चालू आहे.शालेय अध्यापना बरोबर शिक्षकांना अनेक कामे त्याच्यापुढे मांडून ठेवले आहेत. दीर्घ श्वास घ्यायला सुद्धा त्याला वेळ मिळत नाही. शालेयपोषणची खिचडी पासून श्वान मोजण्यापर्यंत त्यांना कामे लावून दिली आहेत. कोरोनाच्या काळात रोडवर थांबून ड्युटी करावी लागली. सांगायला वाईट वाटते, नको तिथे शिक्षकांना थांबवून त्यांच्याकडून कार्य करून घेण्यात आले. तरी सर्व शिक्षकांनी सहनशीलता, वक्तशीरपणा, स्त्री पुरुष समानता,सौजन्यशीलता हे सर्व गाभाभूत घटक दाखवून शिक्षकांनी भारत माझा देश आहे. म्हणून सर्व कामे तो शिस्तीत पार पाडत आहे. निवडणुकीची कामे शिक्षकांना देऊ नये. असे अनेक लोकांचे म्हणणे असले तरी आजपर्यंत शिक्षका शिवाय कोणतीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. शिक्षकाला सुरुवातीच्या काळात गुरु म्हटले जायचे. नंतर ते गुरुजी झाले. परत शिक्षण सेवक होऊन त्यांच्या पदाची चेष्टा केली जात आहे. 20% 40% 60 % असे अनुदान देऊन शिक्षकाच्या जीवनाशी खेळ खेळले जात आहेत. काही शिक्षकांना वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत पूर्ण वेतन मिळाले नाही.इतर क्षेत्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यांची परीक्षा न घेता फक्त शिक्षकांची परीक्षा घ्यावी हा जाणून बुजून का केले जात आहे. अशी मनात शंका येत आहे.
ज्यांची सेवेची पाच/ सहा वर्षे राहिलेत त्यांनी सुद्धा परीक्षा द्यावी तेव्हाच बढती मिळेल, अशी टांगती तलवार केसांना बांधलेली शिक्षकांवर लोंबकळतठेवली आहे. कधी ती डोक्यावर पडेल हे सांगता येत नाही.अनेक शिक्षक परीक्षेच्या धास्तीमुळे मधुमेह ग्रस्त झाले आहेत. मधुमेह वाढला की टेन्शन वाढते त्यातून अघटीत घटना घडतात. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत. शिक्षकांना इमारत गणना करायला लावले. त्यात अनेक शिक्षकांचा जीव गेला. कित्येकांना कुत्रे चावले. हे सर्व समाजानी उघड्या डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व राहिले नाही. शिक्षकाने मुख्यालयात राहावे.असे अनेक लोकांचे अप्रत्यक्ष मत आहे. बाकी इतर कर्मचारी कुठे राहिले तरी चालतात. परंतु शिक्षक हा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. असे म्हणून शिक्षकांना अप्रत्यक्ष अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.शिक्षकांना पगार जास्त झाला. असे सुद्धा अनेक लोकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला शिक्षकाला शिक्षण घेण्यासाठी 25 वर्ष वयाची पूर्ण करावी लागतात. तेव्हाच शिक्षक म्हणून आपणाला समाजात मानाचे स्थान मिळते. परंतु अलीकडे शिक्षकाबद्दल अनेक गैर समज,समज तयार झाले आहेत. शिक्षक हा समाजाचा आवडता घटक राहिला नाही. प्राचीन काळी शिक्षका शिवाय कोणतेही सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक कार्य पूर्ण होत नव्हते .कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीं सारखी त्यांची ओळख होती. परंतु अलीकडे समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकाची थोडी थट्टा मस्करी चालू झाली आहे. एखाद्या शिक्षकांनी अनावधानाने केलेली चूक संपूर्ण शिक्षक बांधवांना लागू होते काय? याचेआत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिक्षकांनी मुलांना सहलीला घेऊन जावे. त्यांना निसर्गा विषयी प्रेम निर्माण करावे. विद्यार्थी कितीही खोडकर असला तरी त्याला शिक्षा करू नये.अशा चौकटी करून दिल्यात की त्यामधून तो वर येत नाही. ही वास्तविक बाजू शिक्षकाची मांडायला आज किती व्यक्ती तयार आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. डॉक्टर वर हल्ला झाला तर अनेक डॉक्टर एकत्रित येऊन त्यांची बाजू मांडून हल्ला करणाऱ्याला दंड व शिक्षा दिली जाते. अनेक शिक्षक आमदार निवडून आले आणि गेले त्यांनी शिक्षकांचे तात्पुरते प्रश्न मांडले .पेन्शन योजना हा जीवनाचा अविभाज्य विषय आहे. वर्षानुवर्ष तेच प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत. टीईटीची परीक्षा शिक्षकांनी द्यावीच लागते. हे पालूपद सगळीकडे चालू आहे.आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचत आहे. परंतु इंग्रजीला महत्त्व देऊन मातृभूमीचा कडेलोट केल्या जात आहे. वाजवीपेक्षा इंग्रजी माध्यमांना जास्त महत्त्व देऊन आपल्या मराठी भाषेचा सन्मान राहिला नाही
. मराठी भाषा ही कमी लेखली जात आहे.शासकीय पातळीवरून प्रयत्न चालू असले तरी ते कमी पडत आहेत.याचाही विचार होणे आज गरजेचे आहे.खरोखरच टी ई टी ची परीक्षा घेतल्यामुळे शिक्षकाची गुणवत्ता सिद्ध होते काय ? टी, ई, टी ची परीक्षा दिल्या बरोबर एखादा शिक्षक सामाजिक दृष्ट्या तो विद्वान झाला असे म्हणता येईल काय ?
या सर्व गोष्टीचा आढावा घेणे या ठिकाणी गरजेचे आहे ? वयाची 55 वर्षे शिक्षण क्षेत्रात घालून आता सेवानिवृत्तीच्या काळात हातात पेन पॅड घेऊन परीक्षा द्यावी काय? अनेक ठिकाणी उठाव,आंदोलने, सभा चालू आहेत. शिक्षकाने स्वाभिमानाने अध्यापनाचे कार्य चालू ठेवावे. आपल्या मनाचा तोल थोडाही ढळू देऊ नये. विद्यार्थी हित जाणून अध्यापनाचे कार्य दिन रात केले की आपोआप समाजात शिक्षका विषयीचा गैरसमज दूर होईल. शासनाच्या लक्षात येत आहे की खरोखर आपण शिक्षकाकडून अशैक्षणिक अनेक कामे करून घेत आहोत.या गोष्टीला आता वाचा फुटली आहे. परत शिक्षकांना पूर्वीचा सन्मान मिळेल. अनेक शैक्षणिक कामापासून त्यांची मुक्तता केली जाईल. अशी अपेक्षा व्यक्त करू.. राष्ट्राची उन्नती करायची असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही. हे ही देश बांधवांनी समजून घ्यावे.
ही अपेक्षा….
*साहित्यिक विठ्ठल गणपत बरसमवाड मुखेड*

