कंधार : (दिगांबर वाघमारे )
राज्यात खत विक्रीसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या प्रकारांवर महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा “लिंकिंग” पद्धतीस शासनाने स्पष्टपणे मनाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी कंधार, लोहा तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दि. 20 मे 2026 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार अनुदानित खतांच्या विक्रीसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, जैवउत्तेजके किंवा इतर कृषी निविष्ठांची सक्तीने विक्री (Tagging/Linking) करणे अयोग्य व शेतकरी हिताविरुद्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या निदर्शनास आले होते की काही उत्पादक व विक्रेते शेतकऱ्यांना “हे उत्पादन घेतल्याशिवाय खत मिळणार नाही” अशी अट घालत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून त्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे शासनाने अशा प्रकारांना तत्काळ आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत.
माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी सांगितले की,
“शेतकऱ्यांनी जागरूक राहावे. कोणताही दुकानदार लिंकिंगची सक्ती करत असेल, खत देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा इतर उत्पादने घेण्याची अट घालत असेल तर त्वरित कृषी विभागाशी अथवा माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.”
यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक 7389115038 जाहीर केला आहे. तसेच कृषी अधिकाऱ्यांनाही अशा तक्रारी गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खत विक्रीतील सक्तीच्या प्रकारांवर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

