
कंधार :(दिगांबर वाघमारे )
आषाढी एकादशीचे औचित्य साधून कंधार येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समरसता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी मधुकर महाराज पांचाळ, मोहम्मद सिकंदर, विलास कांबळे, बालाजी कांबळे, प्रेमानंद गायकवाड,अड सागर डोंगरजकर ,माजी मुख्याध्यापिका सिंधुताई यन्नावार रापतवार तसेच मुख्याध्यापक सुभाष मुंडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समरसता, समाजातील एकोपा आणि वाचन संस्कृती याविषयी संदेश देणारे हस्तफलक हातात घेऊन शहरातून ग्रंथदिंडी काढली. टाळ, मृदंग आणि लेझीमच्या गजरात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी संप्रदायाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यावेळी गंगाप्रसाद यन्नावार यांनी ग्रंथदिंडी व ग्रंथपूजन या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगत, वाचनाची आवड जोपासणे, ज्ञानाचा प्रसार करणे आणि सर्वधर्म समभावाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
तसेच मोहम्मद सिकंदर व विलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत ज्ञान, संस्कार आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रोहिदास सूर्यवंशी, विश्वदीपान हणमंते, शेख यास्मिन, मंजुषा यन्नावार,तारकेश तपासे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ग्रंथदिंडीला विशेष रंगत आली. या उपक्रमातून शिक्षण, वाचन संस्कृती आणि सामाजिक सलोखा यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.





