
मुखेड : राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांप्रमाणेच १० अश्वशक्ती कृषीपंपधारक शेतकऱ्यांनाही वीजबिल व थकबाकी माफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करीत करसल्लागार ॲड. सुभाषराव विठ्ठलराव इंगळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांची वीजबिल व थकबाकी माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र १० अश्वशक्ती कृषीपंपधारक शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय होत असून, भारतीय राज्यघटनेतील कायद्यापुढे सर्व समान व समान संरक्षणाच्या तत्त्वाला बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. १० अश्वशक्ती कृषीपंपधारक शेतकऱ्यांची संख्या केवळ सुमारे १० टक्के असल्याने त्यांनाही या योजनेत समाविष्ट केल्यास शासनावर फारसा अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. उलट, अशा शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल व राज्यातील सर्व कृषीपंपधारकांना समान लाभ मिळू शकेल, असे ॲड. इंगळे यांनी नमूद केले आहे. तसेच, ७.५ अश्वशक्ती व १० अश्वशक्ती कृषीपंपधारक शेतकऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व कृषीपंपधारकांना समान निकषांवर वीजबिल व थकबाकी माफी लागू करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री (ऊर्जा), ऊर्जामंत्री, कृषिमंत्री, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.





