रक्तदान करून भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन ; शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार

नांदेड – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरूनही बरेच प्रयत्न सुरू आहेत. तसेच रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही कोरोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज भासत आहे. त्यासाठी आंबेडकरी युवकांनी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा व रक्तदान शिबीरे आयोजित करून भीमजयंती साजरी करावी असे आवाहन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. ते शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील नेते रमेशभाऊ गोडबोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले, सुभाष लोखंडे यांची उपस्थिती होती. 


         देगाव चाळ भीम जयंती मंडळाच्या वतीने साहित्यिक गंगाधर ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भीमशब्द क्रांतीचा’ या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. बुद्ध वंदनेनंतर ढवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यभरात पुन्हा एकदा रक्ताची गरज वाढली असल्याचे पुढे येत आहे. महाराष्ट्रभर एकीकडे वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात रक्ताची गरज वाढली असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्याला आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे समजते. तेव्हा येथील युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करावे असे आवाहन त्यांनी केले.

                    येथील  सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने देगाव चाळ भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विकी सावंत, विनोद खाडे, तथागत ढेपे, माधव गायकवाड, यशोदीप गोडबोले, राजू गोडबोले,  राजू गच्चे, राहुल दुधमल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भैय्यासाहेब गोडबोले, अनुरत्न वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.  रोहित हिंगोले, लखन नरवाडे, शोभाबाई गोडबोले, गयाबाई नरवाडे, श्यामाबाई नरवाडे, बंटी लांडगे,  किरण पंडित,  प्रकाश दिपके,  प्रकाश हटकर, माधव निखाते, शाखा नरवाडे, गौरव पंडित, प्रथमेश कापुरे, संकेत नरवाडे, रोहन नरवाडे, प्रशांत नवघडे, आकाश कदम, लखन वारकर, आनंद हटकर, विनायक भोळे, संदिप राजभोज, शेखर हिंगोले, सुमेध कोकरे, मोहित गोडबोले, सोनू नवघडे,अजय हटकर, विनय हिंगोले,  बंटी हटकर, बंटी शेळके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक सुभाष लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *