कंधार : दि. 12 ता. प्र.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेऊन जातीयवादी गावगुंडाकडून बौद्ध युवक अक्षय भालेराव यांची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली.त्या हत्येच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करून या हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा,हत्या करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे व समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार कंधार यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे.
अक्षय भालेरावच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांच्या नेतृत्वात कंधार तहसील कार्यालयासमोर सोमवार दि.12 जून रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली.त्यानंतर अक्षय भालेराव यांच्या पिडीत कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरीत सामावून घ्यावे,त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपयाची मदत करावी, अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.या प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले आहे.या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या आंदोलनाला लोहा कंधार युवानेते सचिन भाऊ जरीकोटे, कंधार नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,नांदेड दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड,माजी नगरसेविका अनिताताई कदम,वंचितचे शहर महासचिव बबन जोंधळे,महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना एंगडे,भास्कर कदम,युवा जिल्हा उपाध्यक्ष विहान कदम,भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस एन.एन.कांबळे,राष्ट्रवादीचे नेते उत्तम सोनकांबळे,मुस्लिम नेते हबुभाई शेख,रब्बानी शेख,सचिन पट्टेकर,कपिल जोंधळे,नाना गायकवाड,आर.एन.गायकवाड,मारोती गायकवाड,भीम शाहीर विलास ढवळे,रमाताई कठारे आदींसह समस्त बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.