मानवतावादी आणि बंधुत्ववादी विचारसरणीतून मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे, समान तत्वाचे मांडणी करणारे,आराध्य दैवत.. आपल्या भक्तिमार्गातून मातृ-पितृसेवा, व गुरु सेवा,स्त्री पुरुष समानता तसेच अंधश्रद्धे विरोधात समाज जागृती व खरी भक्ती,
मानवी जीवन कसे जगावे? याचे प्रबोधन करणारे महान योगी म्हणजेच संत रोहिदास महाराज म्हणत *कर्म हीच ईश्वर सेवा अशी त्यांची शिकवण| आपल्या जीवनामधून दिले त्यांनी भक्ति आणि कर्माचे दर्शन* || संत रोहिदासांच्या परमार्थिक विचारसरणी नुसार तर्क वितर्काच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानापेक्षा सत्याच्या अनुभूतीलाच परमार्थात प्राधान्य आहे.अंध भक्तीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या सर्व साधना व्यर्थ आहेत.जोपर्यंत एखादी नदी समुद्रात विलीन होत नाही, तो पर्यंत तिच्या ठिकाणी खळखळ पणा असतो.विलीन झाल्यावर ती शांत होते. श्री प्रभू राम आणि सत्य हे दोन्ही एकच आहेत. सत्याच्या प्राप्तीसाठी साधकांनी अहंकाराचे, अहंपणाचे पूर्ण विसर्जन करून एकांत निष्ठा धारण केली पाहिजे. राजस्थानातील थोर महिला संत मीराबाईने संत रविदास महाराजां कडून उपदेश घेतला.
व आपल्या गुरु साठी चित्तोडगडा वर कुंभश्यामाचे मंदिर बांधले होते.
संत मीराबाईनी एका चर्मकार समाजातील व्यक्तीला आपले गुरु मानने त्या काळातील म्हणावी तशी साधी सोपी गोष्ट नव्हती.हे येथे आवर्जून सांगावे वाटते.कोणालाही उच्च – नीच मानू नये. सर्वांनी समानतेने वागावे.भेदभाव केल्यामुळे समाजात तेढ निर्माण होते.आपले मन पवित्र व निर्मळ ठेवावे. नेहमी परिश्रम करून जीवन जगावे.सतत परिश्रम केल्यामुळे त्यात आपणाला परमेश्वर दिसतो.दीन- दुबळ्या रंजल्या- गांजल्या लोकांना नेहमी मदत करावी. सकारात्मक विचाराने पुढे जावे. आपल्या व्यवसायात लक्ष घालून कार्य केल्यास आपल्याला इतरत्र कुठेही फिरण्याची गरज नाही. संपूर्ण भारतभर भ्रमण करून पारमार्थिक कार्य त्यांनी संसारात राहून केले.सर्व काही आपल्याला आपल्या व्यवसायातून मिळते. *मन चंगा तो कठोती मे गंगा* असे ठामपणे सांगणारे महान विज्ञानवादी व परिवर्तनवादी व्यक्तिमत्व म्हणजे संत शिरोमणी रोहिदास महाराज होते. ज्यानीं आपल्या उपदेशाने आणि भक्तीने समाज कल्याणचा मार्ग आपल्याला दाखविला. अशा महान संतांच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी आपण आढावा घेत आहोत… संत रोहिदास महाराज यांचा जन्म काशी जवळील गोवर्धनपुर (मांडूर) येथे माघ पौर्णिमेच्या दिवशी झाला.त्यांच्या आईचे नाव कालसादेवी तर वडिलांचे नाव संतोरव दासजी होते आणि पत्नीचे नाव लोणादेवी व मुलाचे नाव विजय दास जी असे होते.
त्यांनी भक्तिमार्गाचा अवलंब करून श्रीरामाची भक्ती केली.ते संत रामानंदाचे शिष्य होते.श्री रामानंद हे पंधराव्या शतकातील पहिले मोठे भक्ती सांप्रदायातील संत होते.
त्यांची सामाजिक भूमिका त्यांच्या जाति पाती पुछे नही कोई|
हरे को भजे सो हरिका होई ||
जातपात विचारात घेण्याजोगी गोष्ट नाही.जो श्री हरीला भजतो,तो श्रीहरीचा होऊन जातो.असे ते मानत होते. त्या महान संतांचे ,रविदास महाराज हे शिष्य होते.एकूण बारा शिष्यामध्ये संत रविदास महाराजांचा समावेश होता. हे सगळे 12 शिष्य वेगवेगळ्या जाती-जमातीचे होते.
संत रविदासांनी भारतीय आध्यात्मिक जीवनाला दिलेली देणगी म्हणजे त्यांच्या शिकवणूकी तील सामाजिक,आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन होते. त्यांनी साधू संता कडून अध्यात्म ऐकले.आणि ईश्वरभक्ती वर पदे रचण्याची त्यांना स्फूर्ती मिळाली. गुजरात व राज्यस्थान राज्यामध्ये आजही
त्यांचे पदे मोठ्या भक्ती भावाने गायली जातात.संत कबीर आणि संत रोहिदास हे समकालीन संत आहेत.दोघांची विचारसरणी मानवतावादी होती.त्यांचे विचार प्रबोधनात्मक व समाजोपयोगी होते.
समाजासाठी झटणारे हे दोन्ही महान विभूती आज आदरणीय, पूजनीय आहेत. समाजातील पीडित,अनाथ लोकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे.अनवाणी पायाने फिरणाऱ्या लोकांना संत रोहिदासांनी मोफत पायातील बूट(जोडे) पुरविले.या गोष्टी वरून त्यांच्या आई- वडिलां सोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला.तरीही त्यांनी मानवतावादी विचार कधीच सोडले नाहीत.
सदैव त्यांनी मदतीचा हात गोरगरिबांना दिला.वारकऱ्यांचे जोडे मोफत मध्ये शिवून देत असत. त्यांनी समाजाला संयम,शुद्ध चारित्र्य व परिश्रम यांची शिकवण दिली. परिश्रामाला त्यांनी ईश्वर म्हटले आहे.
म्हणून तर ते संत शिरोमणी पदाला पोहोचले.शीख धर्मीयांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहेबांमध्ये त्यांच्या ४० पदे काव्यरचना आहेत. त्यामुळे त्यांची भक्ती उच्च दर्जाची होती.कोणत्याही पद्धतीचा ढोंगीपणा, वेडगळ समजूती, अंधश्रद्धा त्यांच्याकडे नव्हती. संपूर्ण भारतभर फिरवून त्यांनी निर्गुण भक्तीचा मार्ग दाखवला. एकजुटीने समाजाने राहावे. जातीला अजिबात महत्त्व देऊ नये. सर्व मानव समान आहेत.असे ते नेहमी म्हणत असत.उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,
राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्यांना पुढील नावाने भाविक भक्त ओळखतात.
गुरु रैदास,संत रविदास,आणि संत रोहिदास असेही त्यांना म्हटले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना *दि अनटचेबल* या ग्रंथात अतिशय मानाचे स्थान दिले आहे. संत तुकाराम महाराजांनी *चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीरांच्या मागे शेले विणे ,उच्च नीच काही नेणे भगवंत*.अशा शब्दांत त्यांच्या पवित्र कार्याची पावती समाजाला करून दिली आहे. संत हे कोणत्या जाती किंवा धर्मात जन्मले, याला अजिबात महत्व नाही. तर त्यांच्या कार्यकर्तृत्वावरून त्यांना महत्त्व प्राप्त होते.संत रविदास हे तेजस्वी पुरुष होते.अनेक वेळेस त्यांनी वादविवादा मध्ये बुद्धिमान व्यक्तींना पराभूत केले आहे. त्यांच्या निरूपणातून ते लोकांना *जन्म जात मत पूछिए,का जात और पात, रैदास पुत सम प्रभू के,कोई नही जात कुजात*. मध्ययुगीन काळामध्ये एवढे सडेतोडपणाने बोलणारे एकमेव संत ती होती. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अस्पृश्य जातीत जन्माला येऊन उच्चवर्णीयांना उद्देशून सांगणे. ही गोष्ट कठीण होती. तरी ते मानवता वादी संत होते. समतेचे तत्व त्यांनी मांडले म्हणून त्यांना महान योगी संत अशीही म्हणतात.मानवतेचे प्रचारक म्हणून ते कार्य केले त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक आहे.
त्यांच्या जीवनामध्ये काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
त्या सर्वत्र सांगितल्या जातात. त्यांच्या जन्मतारखेबद्दल सुद्धा विद्वानांमध्ये मतमतांतरे आहेत.
आज समाजात सर्वत्र जातीयता निर्माण झालेली दिसून येत आहे. अनेक जणांच्या हातात अनेक रंगाचे झेंडे आलेले आहेत.त्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडलेले काही प्रमाणात दिसत आहे.असे होऊ द्यायचे नसेल तर मानवतावादी विचारसरणीतून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांची समाजाला आज खरोखर गरज आहे. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी अंगी बाळगावे, तेव्हा त्यांना खरी विनम्र अभिवादन. केल्याचे समाधान होईल.अशा या मानवी कल्याण करणाऱ्या संत विभूतीस विठू माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन..*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष:विठू माऊली प्रतिष्ठान* *खैरकावाडी*
*ता.मुखेड जि.नांदेड*

