सामाजिक सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य शारीरिक रचना नसून, मानवी परस्परसंबंध, मूल्ये, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि समाजातील एकता यांमधील सकारात्मकता होय. हे सामाजिक वर्तणुकीत दिसणारे सौंदर्य आहे, जे दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे, हास्य खुलवणे आणि समाजाच्या एकूण आरोग्य आणि सुसंस्कृततेत भर घालते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कंधारचे लोकप्रिय पत्रकार राजेश्वर कांबळे. सर्वसामान्यांच्या मनाचा वेध घेणारे, सत्य, निर्भीड आणि समाजभान जपणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीबरोबर मैत्री करणारे पत्रकार म्हणून राजेश्वर कांबळेंची ओळख आहे.
माझी व राजेश्वर कांबळे यांची ओळख एका हाँटेलमध्ये झाली. मला माझ्या गावचे पत्रकार माधव गोटमवाड यांनी सांगितले होते. राजेश्वर कांबळे म्हणाजे साहित्याची जाण व विचारांची खाण असलेले पत्रकार आहेत. त्यांना भेटा, तुम्हाला साहित्य क्षेत्रात फायदा होईल. मला त्यांचा मोबाईल नंबरही दिला होता. माझे व कांबळे सरांचे मोबाईलवर बोलूनही झालं होतं. पण प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. त्यांची व माझी भेट होण्याचा योग आला. मी सकाळी नांदेडला ऑफिसला जाण्यासाठी निघालो होतो. कंधार बसस्थानकाच्या जवळ असलेल्या कोहीनूर हाँटेलमध्ये पाहुण्यांना घेऊन चहा घेण्यासाठी गेलो. तिथे ज्येष्ठ पत्रकार बाबूखाॅ पठाण व राजेश्वर कांबळे हे चहा घेत गप्पा करत बसले होते. माझा व पठाण सरांचा परिचय तसा वीस वर्षापासूनचा. तसे त्यांना मी ते पतसंस्थेत कर्तव्यावर असताना पासून ओळखतो. मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्या बरोबर राजेश्वर कांबळेंना पण नमस्कार केला. बऱ्याच जुन्या, नव्या आठवणींना उजाळा मिळाला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विषय निघाला, कवितांचा विषय रंगला. अन् राजेश्वर कांबळे व माझ्या मैत्रीचा जन्म झाला. मैत्री हे कुटुंबाबाहेरचे एक निवडक आणि घट्ट नाते आहे, जे आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्यास शिकवते. चांगले मित्र आयुष्यात आनंदाचा आणि सकारात्मकतेचा प्रवाह निर्माण करतात, ज्यामुळे जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यांच्या मैत्रीमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. बऱ्याच साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांचा, कवींचा, लेखकांचा परिचय त्यांच्यामुळेच झाला. मी लिहिलेल्या कथा, कविता वेगवेगळ्या दैनिकात प्रकाशित होऊ लागल्या. त्यांच्यामुळे माझी ओळख निर्माण झाली. आमची मैत्री आनखीनच घट्ट झाली. मित्र म्हणून त्यांनी माझ्या हृदयात स्थान निर्माण केले. मैत्री निखळ, प्रेमळ, वाहत्या झरा पाण्यासारखी निर्मळ आहे. मैत्रीमध्ये बंधूभाव आहे. त्यांच्यामुळे शब्दवेध प्रकाशनाचे संचालक वैजनाथ वाघमारे बाचोटीकर यांच्याशी माझा संपर्क झाला. त्यामुळे आज माझा अवकाळी पाऊस कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. राजेश्वरमुळे माझा व आनंदराव गोडबोले यांचा संपर्क झाला. जे आकाशवाणी नांदेड केंद्रावर कर्मचारी आहेत. गोडबोले साहेबांच्या व राजेश्वर भाऊंच्या मार्गदर्शनातून मला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून काव्यवाचन करता आले. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे पत्रकार राजेश्वर कांबळे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
समाज प्रबोधनासाठी शिक्षण हे एक मुख्य माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून एका प्रबुद्ध आणि आधुनिक समाजाची निर्मिती करता येते.

राजेश्वर कांबळे यांचे शिक्षण एम.ए, बी.एड, बीजे, एम.जे असे झाले असून त्यांना कोणताही वारसा नसताना एक आदर्श पत्रकार म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. एखाद्या खानितल्या हिऱ्याला जसे पैलू पाडले जातात, तसेच राजेश्वर कांबळे यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू लाभत गेले आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली बावीस वर्षांपासून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे. परिस्थिती कशीही असो त्यावर कसा विजय मिळवायचा हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे. त्यांना शैक्षणिक व पत्रकारितेचा कोणताही वारसा नसताना ते परिस्थितीनुसार घडत गेले. एकमेकांशी जुळत गेले. कोणत्याही क्षेत्रातला एखादा व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला की तो त्यांचा कायमचा होऊन जातो. संपर्कात आलेल्या व्यक्तींची नाळ राजेश्वर भाऊंनी कधी तोडलेली नाही. त्यांच्या लेखनातील शब्दांची प्रखरता प्रामुख्याने समाजाभिमुख असते. सर्वसामान्यांना न्याय देणारी असते. वंचित, उपेक्षित, पिढीत, अन्याय, अत्याचार, सामाजिक प्रबोधन यावर प्रकाश टाकणारी असते. राजकीय बातम्यांच्या लेखनाच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे राजकीय बातम्यांचे लेखन अतिशय उत्कृष्टपणे व निर्भीडपणे मांडणी केलेली असते. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी व धार्मिक कार्यक्रमांच्या बातम्यांही वाचना सारख्या असतात. त्यांच्या अनेक बातम्यांची प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यांच्या पत्रकारितेची आणि बातम्यांची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यांच्या बातम्यांत प्रामुख्याने समाज प्रबोधनाचा प्रभाव दिसून येतो. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा एवढा सुळसुळाट असतानाही प्रिंट मीडियामध्ये ते आजतागायत तग धरून आहेत. पत्रकारिता म्हणजे केवळ उपजीविकेसाठीचा, चार पैसे कमावण्याचा व्यवसाय नाही, ते वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, शोषित, दुर्लक्षित अशा घटकांचा आवाज बनण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. या व्यापक सामाजिक भूमिकेला प्रभावीपणे न्याय देण्याचे काम राजेश्वर कांबळेंच्या एकंदर बातम्यांच्या लेखनातून दिसते. कांबळेंनी व्यासंगी, निर्भीड आणि परिवर्तनवादी पत्रकारितेचा आदर्श आपल्या कारकीर्दीतून उभा केला आहे.
मन्याडच्या काठावर असणाऱ्या बोरी खुर्द या गावातून त्यांचा प्रवास हा शहराकडे झाला. तसं बोरी म्हटल्यानंतर काही जणांच्या लक्षात येणार नाही. बोरी खुर्द या गावाला उमरज-बोरी या नावाने सर्वच संबोधतात. मन्याड नदीच्या काठच्या पलीकडच्या बाजूला संत नामदेव महाराज मठ संस्थान असलेले उमरज हे गाव. उमरजच्या आजूबाजूला नदीच्या पलीकडे व अलीकडे असणारी सर्व गाव खेडी ही संत नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत. मन्याडच्या कुशीमध्ये गाव खेड्यात वाढलेले राजेश्वर कांबळे यांना शेती नसतानांही व भूमिहीन असतानाही गावगाड्यातील समस्या, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, उपेक्षित, वंचित, पाणीटंचाई, आरोग्य, रस्ते, वीज, शिक्षण, पाणी या मूलभूत समस्यांची जाण असल्याने त्यांनी सातत्याने लेखणीच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. शहरकेंद्री पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातील वास्तव मांडणे ही त्यांच्या पत्रकारितेची महत्त्वाची ओळख आहे. ग्रामीण भागात होणारे सण, सोहळे, उत्सव, यात्रा, धार्मिक कार्यक्रम यांचे वृत्तांकन करून प्रभावीपणे दैनिकात मांडण्याचे काम सातत्याने राजेश्वर कांबळे हे करत असतात. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न हे धोरणकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे व प्रामाणिकपणे ते सातत्याने करताना दिसतात. त्यांच्या बाबतीत महत्त्वाचे म्हणजे ते आत एक व बाहेर एक असे कधी वागत नाहीत. त्यांच्या पोटात जे असते तेच ओठात येते आणि लेखणीच्या माध्यमातून ते कागदावर प्रगट होते. ते पत्रकारिते बरोबरच समाजसेवेचेही काम करतात. पोलीस स्टेशन, दवाखाना, पंचायत समिती, तहसील या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक समाजातील गोरगरीब, वंचित, दलित, उपेक्षित लोकांना अडीअडचणी नुसार सर्वतोपरी सातत्याने मदत करतात. ग्रामीण पत्रकारिता हा गावगाड्याच्या समस्या, शेती, विकास आणि सामाजिक प्रश्न मांडणारा लोकशाहीचा कणा आहे. शहरी मीडियाच्या पलीकडे जाऊन गावाची खरी परिस्थिती, स्थानिकांचे प्रश्न आणि प्रगती समाजासमोर आणण्याचे काम राजेश्वर कांबळे यांनी केले आहे. ग्रामीण पत्रकारिता ही फक्त बातम्या देण्याचे काम करत नाही, तर ती लोकशाहीमध्ये ग्रामीण समाजाचे सक्षमीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, हे त्यांच्याकडे पाहिले की लक्षात येते.
राजकीय क्षेत्रातील सत्तेचा गैरवापर लोकशाहीची पायमल्ली यावर ते प्रखडपणे व प्रखर शब्दात आपले मत मांडत असतात. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व समस्यांची सोडवणूक त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने केल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या लेखणी मधून दिसून येतो. अल्पावधीतच त्यांनी पत्रकारितेमध्ये आपले नावलौकिक केले असून त्यांच्या सर्वंकष पत्रकारितेला माझा सलाम आहे. त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्टये अनेक विचारवंतानी प्रामुख्याने अधोरेखित केले आहेत. आज माझे मित्र राजेश्वर कांबळे यांचा वाढदिवस आहे. राजेश्वर कांबळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या लेखणीला बळ यावे, तसेच पत्रकारितेत उत्तरोत्तर प्रगती व्हावी. पुढील आयुष्य आपले सुखाचे समाधानाचे भरभराटी जावो, अशी मी प्रार्थना करतो व माझ्या मित्रास मनःपूर्वक शुभेच्छा देतो.– भास्कर गीते,
(साहित्यिक तथा कवी, कंधार)
संवाद: ९८६०८६३६८४

