मानवाने आपले जीवन जगताना नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा.रुढी,परंपरा व अंधविश्वास यांना बळी न पडता आपले जीवन सद्सद्विवेक बुद्धीने जगावे. पूर्वग्रह रहित विचारसरणी असावी.
आणि वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे मूल्यमापन करावे.अधिष्ठित पुराव्यांच्या मदतीने काढलेल्या अनुमानावरून नव्या पुराव्याने बदलण्यास अनुमती देण्यास शुद्ध असणारा निष्कर्ष आचरणाचा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय. म्हणून नेहमी मानवाने आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कास धरावी व आपल्या बुद्धीला पटेल असेच विचार आत्मसात करावेत. अंधविश्वास व बुवाबाजी याचा प्रतिकार करून आपले जीवन निर्मळ जगावे. परंपरेने आलेल्या रुढी, धार्मिक विधी विचारपूर्वक समजून घेऊन वागावे. कर्मकांडा मागील वैज्ञानिक तत्वे शोधावे. नैसर्गिक घटना मागील कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करावा. निसर्गचक्र व जीवसृष्टी या मागील वैज्ञानिक नियम जाणून घेऊन नंतर श्रद्धा आहे की अंधश्रद्धा याचा विचार करावा.नाहीतर उगाच उठसूट कशालाही नाव ठेवू नये. घटनांचे व वस्तूचे सतत निरीक्षण करून त्यातून चिकित्सक अन्वयार्थ काढावा. तेव्हाच आपल्याला विज्ञान कळाले. असे म्हणता येईल. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. कारण सर्व क्षेत्रातील प्रगतीचा पाया विज्ञान आहे. विज्ञानाशिवाय आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकत नाही. विज्ञानाचा अभ्यास करून शेती करता येते. व्यापार,व्यवसाय जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात नवे परिवर्तन घडून येण्यास ही वैज्ञानिक प्रगती कारणीभूत ठरत आहे. म्हणून विज्ञान हे माणसाचे परिवर्तन करणारे शास्त्र आहे. देशातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाला विज्ञानाची जाण व त्यातील उपयोजन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. समाज जागृत होण्यासाठी शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा अंतर्भाव करणे स्वाभाविक झालेला आहे.म्हणून गाभाभूत घटकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला आहे.भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सांगितले आहे.हे आपण विसरता कामा नये. विज्ञान प्रदर्शन, तंत्र संस्था या विज्ञानाशी संबंधित असतात.विज्ञान दिना मधून पर्यावरण दिन, वृक्षदिंडी, व्यसनमुक्ती , वेगवेगळ्या फेरीचे आयोजन करून वैज्ञानिक दृष्टिकोन सांगता येतो. विज्ञानावरील ग्रंथ वाचन करून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून घेता येतो. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेलं लेखन, मासिके, वर्तमानपत्रातून विज्ञानाची गोडी लावता येते. म्हणून विज्ञानामुळे माणूस प्रगत होतो. वेगवेगळ्या नाटीका, पथनाट्य याच्यातून विज्ञानाविषयीचे जनजागृती करता येते. 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन पाळला जातो. त्यामुळेच विज्ञानाची आपल्याला कशासाठी आवश्यकता आहे .हे कळते म्हणून विज्ञानवादी व्हा… नशीब वादी होऊ नका?
असे या ठिकाणी सांगता येते. वैज्ञानिक दृष्टिकोळामुळे माणूस आशावादी बनतो. त्याला नवनवीन शोध लागतात.वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वाईट रूढी, परंपरा, वेडगळ समजुती बाजूला काढता येतात.म्हणून आजच्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्य कारावे.अज्ञानामुळे आपली अधोगती होते.आपला अमूल्य वेळ वाया जातो.आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष निघून जातात.वैज्ञानिक दृष्टिकोना मुळे देश विकसित होतो.म्हणून चला,जय विज्ञान.जय भारत
साहित्यिक : विठ्ठल बरसमवाड
भिंगार, अहिल्यानगर

