मुखेड : (दादाराव आगलावे)
कै. सौ. भिमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती मातोश्री भिमाई व्याख्यानमाला तसेच गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शांतीनगर, मुखेड येथे करण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गारगोटी (कोल्हापूर) येथील युवराज पाटील यांचे ‘चला कुटुंब जपूया’ या विषयावर व्याख्यान होणार असून, त्याद्वारे व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प गुंफले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती सदगूरू नराशाम महाराज राहणार असून आमदार डॉ. तुषार राठोड, नगराध्यक्ष विजया देबडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शानदार सोहळ्यात ‘ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड, मुंबई’ येथील डॉ. संदीप बालनराव गोरे यांना ‘गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांच्या पुढाकारातून मातोश्री भिमाई व्याख्यानमाला सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व वैचारिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. यापूर्वी या व्याख्यानमालेत तेरा व्याख्यान पुष्पे यशस्वीपणे संपन्न झाली आहेत.
पहिल्या पुष्पात कवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई) यांनी ‘आई’ या विषयावर व्याख्यान दिले. दुसरे पुष्प प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांनी ‘सुंदर जगण्यासाठी’, तर तिसरे पुष्प डॉ. राजेंद्र पवार (सातारा) यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गुंफले. चौथे पुष्प प्रा. डॉ. तेज निवळीकर (पुणे) यांनी ‘२१व्या शतकासमोरील आव्हाने’ या विषयावर, पाचवे पुष्प डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’ या विषयावर सादर केले. सहावे पुष्प डॉ. अविनाश सावजी (अमरावती) यांनी ‘शतायुषी व्हा! पासवर्ड आरोग्याचा’, तर सातवे पुष्प डॉ. सचिन देशमुख (औरंगाबाद) यांनी ‘स्वभावालाही औषध असतं’ या विषयावर गुंफले. आठवे पुष्प जगन्नाथ दीक्षित (औरंगाबाद) यांनी ‘विनासायास वेट लॉस’, नववे पुष्प डॉ. श्रीराम राठोड (नांदेड) व माजी आयुक्त आर. के. गायकवाड (पुणे) यांनी ‘विपश्यना : परिचय व अनुभूती’ या विषयावर सादर केले. दहावे पुष्प प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ‘जीवन त्यांना कळले हो’, अकरावे पुष्प इंद्रजीत देशमुख (कराड) यांनी ‘पसायदान’ या विषयावर गुंफले. बारावे तपपूर्ती पुष्प डॉ. अनंत सूर्यवंशी (नांदेड) व डॉ. गौरव दिलीप पुंडे (मुखेड) यांनी ‘हृदयरोग जनजागरण अभियान’ या विषयावर सादर केले, तर तेरावे पुष्प प्रा. श्रीहरी वेदपाठक (लातूर) यांनी ‘ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफले.
याच परंपरेत मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात युवराज पाटील यांचे ‘चला कुटुंब जपूया’ हे व्याख्यान समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरणार आहे. आधुनिक जीवनशैलीत कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध व मूल्यांचे जतन कसे करावे, यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानपुष्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमाला संयोजन समितीचे प्रमुख मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे, डॉ. गौरव पुंडे, डॉ. तेजस्विनी पुंडे तसेच संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

