भारत सरकारच्या जनगणना २०२७ अभियानांतर्गत जिल्ह्यात घर यादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्यास लवकरच सुरुवात होणार असून मुखेड तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी केले आहे.
जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया मानली जाते. शासनाच्या विविध योजना, निधीचे वाटप, शैक्षणिक, आरोग्य, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकासाच्या योजना आखताना जनगणनेतील आकडेवारीचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक हे प्रत्येक घराला भेट देणार असून नागरिकांनी त्यांना योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी. घरातील सदस्यांची संख्या, शैक्षणिक स्थिती, व्यवसाय, निवासाची माहिती, स्थलांतर, सामाजिक व आर्थिक बाबी यासंदर्भातील माहिती विचारली जाणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांना ओळखपत्र देण्यात आले असून नागरिकांनी खात्री करूनच माहिती द्यावी, असेही प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी सांगितले. तसेच जनगणनेदरम्यान गोळा करण्यात येणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर केवळ शासकीय उद्देशासाठीच केला जाईल, असे धुळे यांनी नमूद केले.जनगणना प्रक्रिया पारदर्शक व अचूक व्हावी यासाठी तालुका प्रशासनामार्फत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमातून माहिती संकलन, मोबाईल अॅपचा वापर तसेच ऑनलाइन पद्धतीने माहिती नोंदविण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या प्रगणक व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे तसेच सकाळ-सायंकाळच्या वेळेत अधिक कामकाज करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुखेड तालुक्यात जनगणना अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी केले आहे.