डॉक्टर्स डे निमित्त अवयव दाते व अवयव प्राप्तकर्त्यांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
मुखेड: (दादाराव आगलावे)
मृत्यू अटळ आहे; मात्र मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या शरीरात आपल्या अवयवांच्या रूपाने जिवंत राहणे म्हणजेच खरे अमरत्व. अवयवदान हे केवळ दान नसून मानवतेची सर्वोच्च सेवा आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन डब्ल्यू.एच.ओ.चे सदस्य तथा मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी केले.
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय संस्था, आय.एम.ए., निमा व आय.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयव दाते व अवयव प्राप्तकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. आर्य वैश्य मंगल कार्यालय, मुखेड येथे झालेल्या या कार्यक्रमात अवयवदाते, त्यांचे कुटुंबीय आणि अवयव प्राप्तकर्त्यांचा सन्मान अत्यंत भावनिक वातावरणात करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य डॉ. संजय कदम, प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ व मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. विजय मैदपवाड, कृषी अभ्यासक गंगाधरराव दापकेकर, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, चंदा रावळकर, डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. कैलास पाटील चांडोळकर, डॉ. अमित मस्कले, डॉ. श्रीहरी बुडगेमवार, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. शिवासांब वडेर आणि डॉ. सतीश बच्चेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या ओघवत्या व प्रेरणादायी भाषणात डॉ. पुंडे म्हणाले, आजचा हा सोहळा केवळ सन्मानाचा नाही, तर माणुसकीचा उत्सव आहे.
अवयवदान करणाऱ्या कुटुंबांच्या वेदना आम्हाला समजतात; परंतु त्या दुःखावर मात करून त्यांनी दुसऱ्याला जीवनदान दिले, ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. ते पुढे म्हणाले, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. स्वतःच्या दुःखावर मात करून इतरांना जीवन देणाऱ्या मातांचे कार्य शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मृत्यूनंतरही कुणाच्या हृदयात, डोळ्यांत, यकृतात किंवा इतर अवयवांच्या रूपाने जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अवयवदान. अवयवदान चळवळीला प्रेरणा देणाऱ्या मोहन फाउंडेशनच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी हैदराबादमधील एका आईची हृदयद्रावक कथा सांगितली. अपघातात मेंदूमृत झालेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाचे अवयव दान करून तिने अनेकांना जीवन दिले आणि त्यानंतर संपूर्ण देशभर अवयवदान जनजागृतीचे कार्य सुरू केले. तिच्या या महान कार्याची दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तिचा राष्ट्रपती भवनात गौरव केला होता, असे त्यांनी सांगितले. डॉ. पुंडे यांनी रक्तदान आणि अवयवदान या दोन्ही चळवळींचा संबंध स्पष्ट करत सांगितले, झेंड्यांचे रंग वेगवेगळे असले तरी रक्ताचा रंग एकच असतो. त्याचप्रमाणे अवयवदानाला धर्म, जात, पंथ किंवा सीमा नसतात. माणुसकीचाच रंग म्हणजे अवयवदान. भारतीय संस्कृतीतील भगवान गणेशाच्या कथेतूनही त्यांनी अवयव प्रत्यारोपणाचा संदेश अधोरेखित केला. तसेच गंगाधरराव दापकेकर यांनी केलेल्या देहदान संकल्पाचे आणि चंदा रावळकर यांनी आपल्या भावाचे अवयवदान करून समाजासमोर ठेवलेल्या आदर्शाचे त्यांनी विशेष कौतुक केले. मुखेड आणि नांदेड परिसरात अवयवदान जनजागृतीचे कार्य अधिक व्यापक करण्याचे आवाहन करताना त्यांनी ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड येथे सुरू झालेल्या अवयव प्रत्यारोपण सेवांचा उल्लेख केला.
तसेच मुखेडमधील या उपक्रमाची माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, आय.एम.ए. व राष्ट्रीय स्तरावरील संस्थांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार यांनी केले. यावेळी डॉ. संजय कदम, डॉ. विजय मैदपवाड, गंगाधरराव दापकेकर, चंदा रावळकर आणि अरुणा दापकेकर यांनीही मनोगत व्यक्त करून अवयवदान चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
अवयव दात्यात कै. संतोष उद्धव मोरे, कै. सुधीर रावळकर, सौ.सुप्रिया बळवंतराव देशपांडे,बळवंतराव देशपांडे, संतोष पांडुरंग जोशी, डॉ.मयुरेश गव्हाणे,मिथुन कुमार व्यैंकटराव नागमवाड, व्यंकटराव बाबन्ना नागमवाड, श्रीमती महानंदा ऐकाळे, अमृत विठ्ठलराव पाटील, ॲड.राहुल संग्राम मोरे,डॉ.सचिन संग्राम मोरे, सौ.महानंदास्वामी वीरभद्र स्वामी, योगीराज वीरभद्र स्वामी,मनोहर नारायण श्रीराम, शंकर नारायण श्रीराम, सुजाता ज्ञानेश्वर दुय्येवाड, सौ.अरुणा सुभाषराव दापकेकर, सुनंदाबाई राजू पोतदार, सतीश पोतदार,प्रेमला शिवयाप्पा स्वामी, प्रियंका स्वामी, शीलाताई पाळेकर, अद्वैत पाळेकर, सुरेखा तानाजी वडेर, पंचफुलाबाई गंगाधर शिंदे यांच्यासह अवयव दाते व अनेक अवयव प्राप्तकर्त्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी केले, तर डॉ. शिवासांब वडेर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास अवयवदाते व त्यांचे कुटुंबीय, अवयव प्राप्तकर्ते, शहर व परिसरातील डॉक्टर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सुप्रभात मित्र मंडळ, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, संजीवनी सकाळचे सदस्य, माय मराठी परिवार, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले.

