श्रावण मास विशेष ; फुलवळ येथील महादेव जाज्वल्य देवस्थान …

कोविड मुळे दोनवर्षापासून मंदावली भाविकांची गर्दी..

फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील मन्याड खो-याच्या शेजारी असलेल्या फुलवळ येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मांदियाळी श्रावण महिन्यात दरसोमवार बरोबरच दररोजच दिसत असते , परंतु गेली दोन वर्षांपासून या मांदियाळीला मात्र मर्यादा आल्याचे दिसून येते. या श्रावण महिन्यानिमित्ताने महादेव देवस्थान ची सर्वदुर असलेल्या प्रचितीची थोडक्यात महती अशी…

हे देवस्थान भक्तांच्या नवसाला पावणारे असल्याचे अनेकाकडून बोलून दाखवले जाते. तर मुळात या देवस्थान चा नावलौकिक असा की , एकेकाळी फुलवळ येथीलच गिरजाबाई डांगे नावाच्या मुलीची अपार श्रद्धा या महादेवावर असल्याने ती वर्षाचे बारा महिने , ३६५ दिवस नचुकता रात्रीच्या वेळी पंचारती घेऊन या मंदिरात जात असत व आरती करुन देवदर्शन घेऊन घरी परत येत असे. अशी माहिती कांही जुन्या जानत्या व्यक्तिकडून सांगितली जाते.

कालांतराने गिरजाबाई चे लग्न झाले, तीला कंधार तालुक्यातील मरशिवणी गावात दिले गेले.ती सासरी गेली. पण तीची महादेवावरची अपार श्रद्धा कांही कमी झालीच नाही. म्हणुनच की काय ती कांही दिवसांनी पुन्हा फुलवळ च्या महादेवाकडे दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेऊन आपल्या मरशिवणी गावाहुन दररोज संध्याकाळी पानशेवडी मार्गे फुलवळ येथील महादेवाला पंचआरती घेऊन येऊ लागली. पुजा करुन रात्रीच ती मरशिवणी ला परत जात असे.

हा तीचा कार्यक्रम नित्यनेमाणे सुरुच होता, यातच अनेक दिवसांचा , वर्षांचा कालावधी चालू राहिला . आपली धर्मपत्नी दररोजच रात्रीच्या वेळी नेमके कुठे जातेय याबद्दल तीच्या पतीला काही चाहूल लागेना , पतीच्या मनात विविध विचारांचं काहूर खेळायला लागलं.

मग एके दिवशी गिरजाबाईच्या नव-याने तीचा पाठलाग करण्याचे ठरवले. नित्यनेमाप्रमाणे त्या दिवशी गिरजाबाई आपापल्या नेमाणे पंचआरती घेऊन पानशेवडी मार्गे फुलवळ च्या महादेव मंदिराकडे दर्शनासाठी निघाली. तीच्या नव-याने याची खबर ठेऊन कांही अंतराने तिच्या पाठीमागे पाठलाग करत निघाला. याची गिरजाबाई ला कसलीच कल्पना नव्हती .

ती महादेव मंदिरात आली पुजा , आरती केली केली आणी परत मरशिवणी च्या वाटेने निघणार एवढ्यातच तिच्या कानी एक आवाज पडला की, तुझा नवरा तुझा पाठलाग करत आहे. तेंव्हा तु आलेल्या मार्गाने न जाता घागरद-याकडून जा. असा आवाज कानी पडताच ती आश्चर्यचकित झाली. तीने मागे वळून पाहिले पण कोणीच दिसेना , तो आवाज मंदिरातुनच महादेवाचा असल्याची खात्री तीला झाली.

त्यावरून ती त्या आवाजातुन सांगितल्याप्रमाणे तेथूनच त्याच घागरद-याच्या घनदाट जंगलातुन मार्ग काढत जात होती . पायी पायी जात असताना अंधारी रात्र आणि घागरद-याच्या जंगलातील घनदाट अरण्य , त्यातच तीला एका वाघाची डरकाळी कानी पडली. वेळ रात्रीची काळोख अंधार. मागे वळून पाहिले तेवढ्यात मागे पाहताक्षणी तीला महादेवाचे दर्शन झाले. आणि तात्काळ महादेव गुप्त झाले. महादेव कोण्या कड्याकपा-यात लुप्त झाले हे तिला समजलेच नाही. पण माझा महादेव याच कड्या कपारीत आहे असे तीचे मन तीला ग्वाही देऊ लागले आणि तसेच घडले.

तेंव्हापासूनच घागरदरा येथील महादेवाला कड्याचा महादेव असे संबोधले जाते आणी तसेच अस्तित्वात आल्याचेही जुन्या लोकांतून बोलले जाते.

दरवर्षी आमली बारस निमित्त फुलवळ येथे माळेगाव यात्रेच्या नंतरची दुसऱ्या क्रमांकावर ची महादेवाची खुप मोठ्याप्रमाणात यात्रा भरते , श्रावण महिन्यात कड्याच्या महादेव मंदिर येथे ही भक्तांची तोबा गर्दी असते . फुलवळ सह कंधार तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक या यात्रेत सहभागी होतातच परंतु हे दोन्ही देवस्थान नवसाला पावणारे असल्याचे भाविक बोलुन दाखवतात तर श्रावण महिण्यात महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या भागातुन भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोविड ने थैमान घातले असल्याने सध्या भाविकांची मांदियाळीच खूपच कमी प्रमाणात पहायला मिळत आहे.

याच फुलवळ येथील श्री क्षेत्र महादेव देवस्थानला तीर्थक्षेत्र चा दर्जा मिळाला पाहिजे अशी गावकऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी असून मधल्या काळात ती मिळाली असल्याचे ही बोलल्या जात होते परंतु तीर्थक्षेत्र विकास आरखड्याच्या माध्यमातून व्हावा तसा आणखी येथे विकास झाला नसून केवळ एक दोन लोकप्रतिनिधीनी येथे विकास निधी मंजूर करून दिल्याने येथे दोन सभागृह बांधकाम झाले असून लोकसहभागातून येथे गट्टू फरशी व इतर काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *