आपण कुठं चुकतोय? खरंच आपलं काही चुकतंय का? केरळ स्टोरी

 

चुकत असेल तर काय ? आणि कुठे? केरळ स्टोरी पाहून , असंख्य विचारांचे गाठोडं डोक्यावर घेऊन मी सिनेमागृहात पडले.त्याचे ओझं इतकं झालं की मी रात्रभर निवांत झोपू शकले नाही..
बरं ते गाठोडं उचलून बाजूला टाकावं म्हटलं तरी जमेना.

आम्ही खरंच इतके हतबल झालो आहोत का? एकविसाव्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्न पाहणारा वैभवशाली देश इतका पोखरला गेलाय ? केरळचे विलक्षण सौंदर्य बघायला जाणाऱ्या आम्हाला ही बाजू कधी जाणवलीच नाही , असं का?

एकंदरीतच ,”ऑल इन वेल “म्हणत अज्ञानाची झापडे लाऊन जगणारे , शेजारी काय घडतंय ..घडू देत ना? आम्हाला काय त्याचे…
आमचे आम्ही मस्त आहोत ,
खाऊन पिऊन सुस्त आहोत..
अशी आपली अवस्था झाली आहे.

आजच्या धकाधकीत आपल्या घरात नेमकं काय चाललंय हे ही जाणून घ्यायला आपल्याला वेळ नाही आहे हे वास्तव आहे.

आपला इतिहास आपली संस्कृती यातून आपण काहीच शिकलो नाही..फक्त आपण आपल्या उणिवांची मोजतात करत त्यावर टिका करत राहिलो.

रामदास स्वामींनी औरंगजेबाच्या काळातलं केलेले वर्णन आजही आपल्या देशाला लागू होतंय हे आपलं दुर्दैव आहे.

शिवबा घडवणारी जिजामाता होणं प्रत्येकीला शक्य नाही..एकदम मान्य..पण तो स्वराज्य स्वधर्माचा संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोचवणे आपल्याला नाही जमलं हे वास्तव नाकारता येत नाही .

शामच्या आईने शाममध्ये रूजवलेल्या संवेदनशीलतेची आपण हेटाईच करत आलो..खरंच आहेना..संवेदनशील शाम या समाजात खंबीरपणे शेवटपर्यंत नाही राहू शकला..हे वास्तवही आपल्याला स्वीकारावे लागले , हेच सत्य नाही का?

रात्रभर उलटसुलट विचारांची जंत्री .

दहशत वात आतंकवाद , सत्तालोलुप वृत्ती..सत्तेसाठी , पैशासाठी , सुखोलोलुप जीवनासाठी वाटेल ते कोणत्याही थराला जाऊन ..या विचाराची पिढी ..पाहिली ..मन सुन्न झाले.

सहसंवेदना , संहवेदना ..अगदी प्रार्थमिक गोष्ट माणूस म्हणून जगणे हेच विसरत चाललोय..

कुठला बाप ?कुठली आई ?
कुठला भाऊ? कुठली ताई ?
आमचे आम्ही मस्त आहोत..
खाऊन पिऊन चुस्त आहोत..

आम्हाला घरात मोठी माणसंच नको आहेत..त्यांचे जुनाट संस्कार त्यांची “पुराणी” मतं आम्हाला काहीच नको आहे ..ही भावना, संस्कारा मूठमाती देणारी.

बरं याला दुसरी बाजूही आहेच हं..
इतकी वर्षे आम्ही कष्ट केले आता आम्हाला आमचं जगायचंय असे म्हणणारी ज्येष्ठ मंडळी..खरं सांगायच तर या मंडळींनी पिढी घडवायची,तिच मंडळी संध्याकाळी टिव्हीवर अचकट विचकट मालिका बघण्यात रमलेली..
घरातून संध्याकाळी रामरक्षा , शुभंकरोती ऐकू येणे कधीच बंद झालंय..
मालिकांची शीर्षक गीतांनी केव्हाच त्यांना हद्दपार केलंय.

आज्जी आजोबांना घरात नातवंडात रमण्यापेक्षा बाहेर मित्रमंडळीत हास्य क्लब , भीशी , पत्ते एक ना अनेक ग्रुप . यात रमणायात इंटरेस्ट.

आपण वेगळं राहून आपला आनंद शोधणारी ही जेष्ठ मंडळी ..आणि उत्तम जगता येण्यासाठी पैशाच्या मागे धावणारी तरूण मंडळी ..यात ..संस्कारक्षम वयाची पिढी भरकटली गेली आहे. एकटी पडलेली ही मुलं मग आपला आनंद बाहेर मित्रमंडळींबरोबर शोधतात.

याला उपाय काय ? दोघांचे म्हणणे बरोबर आहे.

शेवटी आज्जी आजोबा , आई बाबा ..नातवंडे .. घरात एकत्र सुखाने एकत्र नांदणे ही खरं आजच्या काळाची गरज आहे. या विचारापाशी मी येऊन थांबले.

“सातच्या आत घरात ” पाहिला आहे का? त्या सिनेमाची आठवण मला केरळ स्टोरी पाहताना झाली.

पूर्वापार चालत आलेली नियम बंधने , व्रत वैकल्ये , काही संस्कार ..हे पिढ्यान् पिढ्या जपणारी खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरे निर्माण होणे..ही आजची खरी गरज आहे.

.दारापुढे रेखलेली रांगोळी ..सारवलेला उंबरठा आता फ्लॅट संस्कृतीत जपता येणार नाही हे मान्य ..

कालोचित संस्कार जपून अनिष्ट गोष्टींना पायबंद घालणारा उंबरठा तर आपल्याला निर्माण करता येईल.

असा निर्माण झालेला उंबरठाच दाराशी आलेल्या “केरळ स्टोरी ” ला घरात येण्यापासून पायबंद घालू शकेल.

या विचाराशी मनातील आंदोलनं येऊन थांबली. मन शांत झाले.” जीवनात राम आहे..” मनात पक्कं केलं.

” परमेश्वर आहे नक्की,तो प्रत्येकाला आपला आपण शोधायला लागतो . कोणी दाखवू शकत नाही.” ह्या वाक्याचा अर्थही नव्याने जाणवला.

#धनश्री_जोशी ( साभार FB wall)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *