वादाने अधोगती ,संवादाने प्रगती* विचारधन

 मानवी जीवन जगत असताना मानवाला अनेक अडथळे येतात.
जवळचेच लोक कधी कधी धोका देतात ;म्हणून मानवाने त्यांच्या वादामध्ये पडू नये. आपापल्या पद्धतीने आपले जीवन सुखी व समाधानी जगावे. जर वादाने – वाद वाढत गेले तर त्याचे रूपांतर भांडणात होते. म्हणून होता होईल तेवढे वाद टाळावे, श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवतगीता सांगितली. चांगल्या संवादने एकत्रित आले. ज्या ज्या वेळी अर्जुनाला अडचण येत होती त्या त्या वेळी चांगल्या संवादाने श्रीकृष्णाला विचारायचे? आणि श्रीकृष्ण तेवढ्याच चातुर्याने अर्जुनाला समर्पक उत्तर द्यायचे. यामुळे संवादाने प्रगतीच होत होती .परंतु दुसऱ्या बाजूने शकुनी मामाने दुर्योधनाला अनेक चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या मध्ये प्रगती झाली नाही, उलट अधोगती झाली. कर्णासारखा शूर मित्र सोबत असून सुद्धा शेवटी दुर्योधनाची कीर्ती लयाला गेली.कधीच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं नाही; समाजामध्ये निंदानालस्ती झाली. म्हणून संवादाने प्रगती करायची का? वादविवाद घालून कोणी ही व्यक्ती आज पर्यंत मोठा झाला नाही. आज समाजामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टीमुळे वाद होतात.बस मध्ये जागा धरण्यासाठी सुद्धा अनेक भांडण- तंटे निर्माण होतात. संवादाने जर घेतले तर तू काही काळ सीटवर बैस,मी काही काळ उभा राहतो असं जर संवाद झाले तर दोघांची प्रगती होते; परंतु मानवी जीवनामध्ये अहंकार वाढत आहे. त्यामुळे अनेक जणांची अधोगती होत चालली आहे; जर आपण थोडे कमी बोललं तर सुद्धा आपल्यावर येणारे संकटे टळतात; परंतु सध्याला *हम किसीसे कम नही* म्हणून अनेक लोक काही वेळातच भांडायला सुरू करतात. संवाद साधत नाहीत. आपली बाजू काहीजण ऐकूनच घेत नाहीत. त्यामुळे प्रगती न होता अधोगती होते हे आपल्याला सांगता येते.संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजातील अनेक लोकांनी नावे ठेवली. संन्याशाची पोर म्हणून हिणवले,तरी त्यांनी कधीच कोणालाही दुखावलं नाही, जे काही संवाद साधले ते प्रगतीकडे जाण्याचे होते ,त्यामुळे त्यांचे विचार अजरामर झाले ज्या लोकांनी त्यांना विरोध केला ,
त्यांची प्रगती अजिबात झालेली नाही. वर्षानुवर्षी त्यांची निंदानालस्ती होत जाणार आहे,म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली सारखं शांत डोकं ठेवून चांगले विचार करा. कारण *तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात* कंसाने कधीही आपल्या भाच्यांबद्दल चांगले विचार केले नाहीत,नेहमी नेहमी तुच्छतावाद बाळगले आणि त्याचा परिणाम एका दिवशी त्यांना जीव गमवावा लागला, तसेच अफजलखान, औरंगजेब ,शाहिस्तेखान हे सगळे चुकीच्या संवादामुळे लयाला गेले
,काही काळ अंदाधुंदी केली, परंतु समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवता आली नाही. म्हणून मी सांगू शकतो की; जीवन असं जगा की तुमच्या जगण्यावर अनेक जण विचार करून जगले पाहिजेत. वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले कर्म करीत राहावे, वाईट कचरा आपोआपच किनाऱ्याला जातो. जितके मन मोठे करून वागा, तेवढे जीवनात यशस्वी व्हाल ,जग काय म्हणेल? याचा विचार करीत बसू नका? आपणाला जे योग्य वाटते तेच करा ..लोक घोड्यावरही बसू देत नाहीत ,आणि पायी चालू देत नाहीत. म्हणून लोकांचं काही न ऐकता स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यावेत. *ऐकावे जनाचे करावे मनाचे* असे आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे. चांगल्या लोकांबद्दल ही काही लोक बोलतात, वाईटा बद्दलही बोलतात. सुख आणि दु:ख या बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जीवन जगणे होय . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसोबत युद्ध करण्यासाठी राजे सज्ज झाली. तेव्हा अतिशय चातुर्याने लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्याशी संवाद साधला” हे पहा तुम्ही पुरुष आहात? तुम्ही जर जिंकले तर लोक तुम्हाला म्हणतील एका महिलेसोबत काय युद्ध करतो. आणि जिंकतो. असं बोललं जाईल. आणि मी स्वतः तुमचा पराभव केलाच? तर लोक तुम्हाला म्हणतील एका महिलेने तुम्हाला सळो की पळो करून सोडले म्हणून हिणवतील,म्हणून विचार करा, माझ्यासोबत तुम्हाला युद्ध करायचे का नाही? यावर त्या राजांनी विचार करून त्यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी टाकले, हा संदर्भ आपल्याला बरेच काही देऊन जातो,म्हणून संवादाने प्रगतीच होते, चांगले संवाद केल्यास व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. त्यासाठी नेहमी सत्त्याच्या बाजूने चलावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून अतिशय उत्कृष्ट संदेश सर्वांना दिला. खंजिरी वाजून लोकांचे समाजप्रबोधन केले. लाखो लोकांशी संवाद साधले. त्यामुळे आज ग्रामगीता सर्वत्र वाचली जाते, समाजामध्ये जागृती होते. संत गाडगे महाराजांनी समाजातील लोकांना मायबाप हो म्हटले आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. कुठेही काही पूजा न करता स्वच्छतेला सुरुवात केली आणि ते जगभर प्रसिद्ध झाले. म्हणून आपण सर्वांनी मिळून चांगल्या गोष्टीची कास धरावी, कोणासोबतही कसल्या ही प्रकारे वाद घालून स्वतःचा वेळ वाया घालू नये वादा- वादामध्ये माणसं कोर्टापर्यंत पोहोचतात. एकमेकाबद्दल मनामध्ये ईर्षा निर्माण होते. एकमेकांमधला संवाद संपतो आणि दोन्हीही गटाची अधोगती चालू होते आणि याचे विपरीत परिणाम समाजावर ,प्रसारमाध्यमावर होतात. कधी कधी दोन चांगल्या व्यक्तीमध्ये शाब्दिक चकमकी होतात आणि लोक फार चवीने याची चर्चा करतात म्हणून कधीही आपण आपली चर्चा होणार नाही याची काळजी घ्यावी. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हे सुभाषित आपणाला बौद्धिक ऊर्जा देऊन जाते. चांगलं कृत्य करा. चांगली फळे मिळतात. त्यामुळे वाईट गुणांना थारा देऊ नका. संत तुकाराम महाराजांनी ढोंगी लोकांवर कोरडे ओढले. जीवनाचे सत्य सांगितले संसारिक पुरुष असून सुद्धा वंदनीय जगद्गुरु झाले. म्हणून सज्जनहो चांगले वागा.
स्वामी विवेकानंदानी अमेरिकेतील शिकागो परिषदेमध्ये *माझ्या बंधू आणि भगिनींनो* या संवादाने सर्वांची मने जिंकली, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.
अब्दुल कलाम यांनी देशासाठी दहा मिनिटे वेळ आहे का ?असे म्हणून तरुणांच्या मनामध्ये बौद्धिक परिवर्तन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य स्वराज्य निर्माण केले,आपल्याला या महापुरुषाचे उदाहरण का द्यावी लागतात. कारण त्यांनी संवादाने. पराक्रमाने लोकांची मने जिंकली परंतु कितीतरी लोक असे आहेत की त्यांनी वाद- विवाद घालून आपले आयुष्यात कोणतीच प्रगती केली नाही, त्यामुळे सर्वांनी आपल्या चांगल्या कार्याची पावती मिळवण्या साठी आनंदाने जीवन जगा व दुसऱ्यालाही जगू द्या. नातेवाईकांमध्ये प्रेम निर्माण करा. तरूणामध्ये कौशल्य निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे करा, तरच आपण महासत्तेच्या रांगेत उभे राहू नाही तर अधोगतीकडे आपली वाटचाल सुरू होईल.
*शब्दांकन*
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरका वाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *