महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने जयपूर ‘सी-20’ परिषदेत आध्यात्मिक संशोधन सादर ! यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक ! – शॉन क्लार्क

 

‘सी-20 परिषदेच्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’या कार्यकारी गटामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद झाला; कारण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ हे वरील 3 सूत्रांचे प्रत्यक्ष मूर्तीमंत उदाहरण आहे. यशस्वी जीवनासाठी आपण सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे, तसेच आध्यात्मिक स्तरावरील नकारात्मकता दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. हे सूत्र सर्व संस्कृतींना लागू असून समाजामध्ये एकात्मता आणण्याच्या दृष्टीने सयुंक्तिक आहे’, *असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले.* नुकतेच राजस्थान राज्यातील जयपूर येथे झालेल्या ‘सी-20’ परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. यंदाच्या वर्षी भारताकडे जी-20 परिषदेचे यजमानपद आहे. ‘सी-20’ ही ‘जी-20’ परिषदेची नागरी शाखा आहे.

*पुढे श्री. शॉन क्लार्क यांनी* परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ऑरा आणि एनर्जी स्कॅनर आदी उपकरणे वापरून चालू असलेल्या अनोख्या आध्यात्मिक संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक ऊर्जा असणे हे तिला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समस्या निर्माण करते. हे समजावण्यासाठी दैनंदिन जीवनातील आहार, संगीत, चित्रपट, अलंकार इत्यादी सर्वसामान्य सूत्रे व्यक्तीच्या प्रभावळीवर कशाप्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात, यासंदर्भातील विविध आध्यात्मिक संशोधनात्मक प्रयोग त्यांनी सादर केले.

उदाहरणादाखल भयपट (हॉरर फिल्म) पहाण्याचा प्रेक्षकावर ऊर्जेच्या स्तरावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी 17 व्यक्तींवर प्रयोग करण्यात आला. चित्रपट पहाण्याआधी आणि नंतर त्यांच्या ऊर्जेच्या स्तरावरील स्थितीचा अभ्यास ‘युनिव्हर्सल ऑरा सकॅनर’ आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्वलायजेशन’ ही दोन वैज्ञानिक उपकरणे, तसेच सूक्ष्म परीक्षण यांद्वारे करण्यात आला. 17 पैकी ज्यांमध्ये चित्रपट पहाण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती ती चित्रपट पाहिल्यानंतर किमान 60 टक्के कमी झाली. काहींमध्ये तर पूर्णतः नष्ट झाली. सर्व पहाणार्‍यांमध्ये नकारात्मक ऊर्जा 107 टक्के वाढली आणि दुसर्‍या दिवशीही ती 55 टक्के एवढी मागे राहिली होती. यावरून भयपट पाहिल्याने आपल्या प्रभावळीवर कसा भयावह प्रतिकूल परिणाम होतो, हे स्पष्ट होते.

सध्यस्थितीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असे आध्यात्मिक स्तरावरील प्रदूषण वाढले आहे. यापासून आपले रक्षण करण्यासाठी काय सात्त्विक आहे आणि काय असात्त्विक आहे, हे जाणून घेऊन जिथे शक्य असेल तिथे असात्त्विक पर्याय टाळणे आवश्यक आहे; परंतु प्रत्येक वेळी हे शक्य असेलच असेही नाही. त्यामुळे आजच्या प्रामुख्याने असात्त्विक जगामध्ये आपले रक्षण व्हावे, तसेच आपल्याला यशस्वी आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी आपल्या धर्मानुसार सांगितलेला नामजप करणे, हा एक उत्तम उपाय आहे, *असे श्री. क्लार्क यांनी समारोप करतांना सांगितले.

 

आपला नम्र,
*श्री. आशिष सावंत,*
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 95615 74972)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *