filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: h; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (200, -1); aec_lux: 328.38928; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
काळाच्या ओघात गाव बदलले, देश बदलला, तशी माणसं ही बदलली आपली म्हणता येणारी माणसं फोन आणि इ-मेल मुळे हाकेच्या (क्लिकच्या) अंतरावर जरी असली तरी काही सण,समारंभ एकत्र येऊन साजरे करता येत नाहीत. मग अश्या वेळी मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणींचे मोरपीस बाहेर काढते आणि मनाशीच म्हणते “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”.
यंदाच्या गणेशोत्सवात ढगफुटी पावसाने अवतीभवती पाणीच पाणी केलं असलं तरी गणेश उत्साहाचे वातावरण अगदी पुर्ववत आहे.राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाल्यानंतर ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन करण्यात येते. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते. या गणपती आवाहनात गौराईचे आवाहन म्हणजे मंगल पर्वाचा आनंद द्विगुणित करणारा असतो. जेष्ठा गौराई मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येणं होय.
राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. तीन दिवस गौराईची स्थापना, महापूजा आणि शेवटी विसर्जन असा तीन दिवसांच्या उत्सवात दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. गौराई घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावरून तिच्या विविध रूपांचा उल्लेख होतो. त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश होतो. या आठ पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, व्यवसायातील प्रगती आदि कामनांचा उल्लेख करतात.काही कुटुंबांमध्ये पारंपारिकपणे जलाशयातून पाच, सात किंवा अकरा खडे वा दगड घेऊन त्यांना गौरीस्वरुप मानून पूजा करतात. काही ठिकाणी भांड्यांची उतरंडी मांडून त्यावर गौरीचे मुखवटा लावला जातो. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्याच्या राशी साचून लक्ष्मी रुपी धान्यांची पुजा केली जाते. याचबरोबर गौराईचे चित्रे किंवा पत्रके लावून त्यांची मनोभावे श्रद्धेने पूजा केली जाते.
आपल्या खाद्य संस्कृतीच्या परंपरेनुसार नैवेद्याला फुलोरा, पुराणाचा स्वयंपाक, १६ भाज्या तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाच्या १६ दिव्यांनी आरती करून संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. सर्व जन यानिमित्ताने एकत्र येतात हा उत्सव साजरा करतात आणि मग एकमेकांचा निरोप घेतात. म्हणूनच मी म्हणते सण हा नात्यांचा उत्सव असतो. हा असा गौराईचा सण सर्वत्र साजरा होत असला तरी तो सण साजरा करण्यामागील काही आख्यायिका आणि काही मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत.
घरात वावरत असलेल्या सगळ्याच गौराई या महालक्ष्मीचेच सुंदर असे रूप आहे. मखरात न बसलेल्या फक्त दोन तीन दिवसासाठीच नाही, तर वर्षानुवर्षे आपल्या संसारात खरोखर ” उभ्या “असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी, बहिणी, मुली,सुन,वहिनी,आत्या,काकू आणि आई, आपल्या सारख्या सगळ्या गौरीईना माझा नमस्कार आणि गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!
रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211

