खरंच आपण प्रगती केली ?

पृथ्वीतलावर सजीवसृष्टी निर्माण झाल्यापासून आजतागायत प्रत्येक सजीवांमध्ये मीपणाची चढाओढ लागली आहे. अता हेच बघाना जे सजीव आहेत ते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात. कोंबडीचे पिल्ले जन्मल्यानंतर चारदिवसांनी एकमेकांवर वरचढ ठरण्यासाठी खेळ खेळतात. मग तुम्ही बारकाईने पहा कुत्र्याची पिल्ले, डुक्कराची पिल्ले वाघां सिंहाची बछडे सतत एकमेकांवर जम बसविण्याचा प्रयत्न करत राहतात. आपल्या कुटुम्बात ही एक जण दादा असतो की नाही? एवढचं कशाला एकमोठे झाड दुसऱ्या झाडाला वाढू देत नाही. दुसऱ्याला वरचढ होवू न देण्याची प्रवृती ही सजीवात दिसून येते. ही प्रवृती कालानुरूप वाढतच गेली पण कमी कधीच झाली नाही. मग यातूनच हेवादावा, मत्सर, व्देष भावना, “मी” पणा वाढत गेला व यातूनच कदाचीत समाजाची वेगवेगळ्या गटात विभागणी झाली असेल. हीच भावना कुटुम्बात, गावात, समाजात, देशात फुट पाडण्यास कारणीभूत ठरली असणार, नाही का…..?

या पृथ्वीतलावर जेवढे जीव आहेत. त्या प्राणीमात्रात मानव इतरांपेक्षा वेगळा आहे. मनुष्य हा एक प्राणी आहे. पण तो चतूर आहे. शहणा आहे. इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे. हा भूतलावरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे (असे आपण समजतो). मनुष्य प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का? प्राणी बहुधा चालताना चार पायांचा उपयोग करतात. मानवाला ही चार पाय आहेत. पण आपण पुढील दोन पायांचा उपयोग चालण्यासाठी करत नाही म्हणून आपण सरळ ताठ चालतोत. त्या दोन पायांना आपण हात म्हणतो. व त्या हातांनी विविध काम करतो. चालताना आपलं डोकं सरळ वरच्या दिशेला असते. इतर बहुतेक सर्वच प्राणी चारी पायांचा उपयोग चालण्यासाठी करतात. माणुस दोन पायावर चालत असल्यामुळे मानव प्राण्याचे डोके नेहमीच त्यांचा पोटाच्या वर असते. तर इतर प्राण्यांचे डोके मात्र त्यांच्या पोटाच्या रेषेतच असते किंबहुना किंचीत डोके वर असते. मानवाचे डोके पोटाच्या वरच्या बाजुला असते म्हणुन मनुष्यप्राणी फक्त पोटाचाच विचार करत नाही. पोट भरण्यांचे साधन शोधत शोधत तो अनेक इतर गोष्टींचाही विचार करतो त्यातून मानवाने अनेक शोध लावले. ते शोध त्याचा सुखासाठीे लावण्यात आले व तो इतर प्राण्यामध्ये स्थीर जीवन जगू लागला. म्हणून मानव इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरला. इतर प्राण्यांचे पोट व डोके एकाच रेषेत असल्यामुळे ते फक्त त्यांचा पोट भरण्यापूर्तेच विचार करतात व विचार करत राहीले. थोडंबहूत ते एकमेकांवर कुरघोडी करत रहातात.

या चराचर सृष्टीत सुरवातीच्या काळात एकत्र चरणारा माणुस नंतर त्यांच्या प्रगत बुद्धीच्या जोरावर कळपा-कळपाने चरू लागाला. हळूहळू गट निर्माण झाले. वर्चस्वासाठी गटागटात हाणामारी सुरु झाली. हाणामारीतून पुढे “माझं तूझं” ही संकल्पना ही हळूहळू मानव प्राण्यांत रुजू झाली. माझं तुझं चे हे रोपटे येवढे जलद गतीने फोफावले व विकसित झाले की ते कुटुम्ब, गाव यात हळूहळू रुपांतरीत झाले. याच बरोबर वर्चस्व गाजवण्याची मनिषा, इर्षा मात्र कमी झाली नाही. ती वाढतच गेली. मग यातूनच गाव, वस्ती, तालूका, जिल्हा, राज्य, देश व खंड यांच्या सिमा आखाल्या गेल्या.

आता मात्र एकमेकांच्या पुढे जाण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली. मी मोठा की तू मोठा, मी श्रीमंत की तू श्रीमंत, मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, माझं ते सत्य तूझं ते असत्य असे अनेक माझे तुझे वाद निर्माण होत गेले व त्यातूनच पुरातन काळात रामायण व महाभारत घडले. मानवाने भूतकाळातील संहारक गोष्टीचा फारसा विचार करताना दिसला नाही. त्याचे परिणाम ही तपासून पाहिले नाही. तपासून पाहिले तरी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यापासून काहीही बोध घेतला नाही. वर्चस्व गाजवण्याची इर्षा ही प्रत्येक प्राण्यात जन्मजातच आहे. एका कुटुम्बाने दुसऱ्या कुटुम्बावर, एका गावाने दुसऱ्या गांवावर एका देशाने दुसऱ्या देशावर हुकमत गाजवण्यास सुरुवात केली. ती आजही चालू आहे. त्यातून अनेक छोटे मोठे युद्ध घडत गेले व घडत आहेत. त्यातून अपरिमीत हानी होत राहीली व होत आहे. पण वर्चस्व गाजवण्यापाई या हानीकडे कोणीही लक्ष दिले नाही. याची कोणालाही पर्वा राहिली नाही.

मानव जातीच्या मीपणापाई आगदी अधुनिक काळात दोन महायुद्ध झाले. यात दुसरे महायुद्ध हे अधिक संहारक ठरले. १ सप्टेबर १९३९ ला सुरु झालेले हे युद्ध १९४५ ला संपले. या महायुद्धात सहा कोटीपेक्षा जास्त माणसं, सैनिक मारली गेली. करोडो माणसं, सैनिक कायमचे अपंग झाले तर हिरोसिमा व नागासकी ही जपानी शहरं संपूर्ण उध्दवस्त झाली. आजही त्या भयान दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम ही दोन्ही शहरं भोगत आहेत.

शितयुद्धातील वरचढपणाच्या भावनेमुळे जग सरळ सरळ दोन गटात विभागलं गेलं. एकच देश पण त्या देशाचीही सरळ सरळ फाळणी झाली. मधून भींती बांधल्या गेल्या. या काळात अख्खं जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर, काठावर आलेलं होतं. हे सर्व कशामुळे घडले? तर एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची ईर्षा.आज मानव पृथ्वीतलावर सर्व प्राण्यात श्रेष्ठ समजला जातो व तो श्रेष्ठ आहेच यात वाद नाही. पण या हुशार प्राण्याने आपली बुद्धी कोठे वापरली? कशासाठी वापरली? याला संशोधनाची गरज नाही. आजचे देश व खंड हे इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ कसे आहोत हे सिद्ध करण्यासाठीच धडपड करत आहेत. या धडपडीतून काही काळ या जगात शितयुद्धाची काळी छाया पसरली होती. ही यम छाया ऐवढी भयान होती की क्षणात हे जग होत्याचे नव्हते झाले असते.

या प्रगत जगातील प्रत्येक देशाच्या राजकारण्याने, कारभा-यांने मग शासन प्रणाली लोकशाही असो की हुकूमशाही असो, साम्यवादी असो की भांडवलशाही असो येथे मी कसा श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी, दुसऱ्या देशांची जिरवण्यासाठी संहारक शस्त्र अस्त्र निर्माण केली. अमेरिका-रशिया (शितयुद्ध काळातील) कडे तर ही पृथ्वी किमान तिस वेळेस नष्ट करण्याइतकी विनाशक रासायनिक शस्त्र अस्त्रांची निर्मिती केलेली होती व केलेली आहे.

आजच्या घडीला चीनही या स्पर्धेत उतरला आहे. आता या देशांकडे पाहून इतर देशही रासायनिक शस्त्रांची निर्मिती केलेली आहे व करत आहेत. व या जोरावर लहान मोठे शेजारी देश आज एकमेकांवर गुरगुरत आहेत. एकमेकांना धमकावत आहेत. दुसऱ्यांवर हुकमत गाजवणयासाठी मानवाने प्रत्येक देशाच्या शासनाने, शास्त्रज्ञांने खूपच प्रगती केलेली आहे. विनाशासाठी ते एकमेकांवर टपलेले आहे. वेगवेगळ्या देशांनी एकमेकाला संपवण्यासाठी रासायनिक शस्त्रांचासाठा करून ठेवला पण मानवला वाचवण्यासाठी कोणी काय केले? याचे उत्तर मात्र खिन्न, उदास मनाने कोणी काहीही केलेले नाही असेच द्यावे लागेल, नाही का? मारण्याच्या उपाया पेक्षा मानव जातीला वाचण्याचे प्रयत्न केलेले दिसत नाही. नाही तर चीनचा ड्रॅगन कोरोना राक्षस जगात धुमाकूळ घातलचं नसतं.

अलीकडच्या काळात रासायनिक शस्त्रांचा उपयोग फारसा कामी येणार नाही हे प्रत्येक राष्ट्राच्या लक्षात आलंय. त्यातल्या त्यात विस्तारवादी चीनच्या लक्षात तर फारच आगोदर आल्याचं दिसतयं. आता प्रत्येक राष्ट्रांकडे रासायनिक अस्त्रांचा भांडार आहे हे प्रत्येक देशांच्या लक्षात आलयं. चीनसारख्या कोणे एकेकाळी “निद्रिस्त देश” म्हणून ओळखला जाणारा हा देश तर चक्क जैविक अस्त्रांचा वापर करताना दिसतोय. आज जगात बरेच देश आहेत की ज्याच्यांकडे विविध जैविक अस्त्रांचे भांडार आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील जीवनचक्र कोणताही गाजावाजा न करता संपुष्टात येऊ शकते.

मग प्रश्न पडतो की खरचं मानवाने प्रगती केली का? प्रगती केली तर कशात? हो मानवाने निश्चितच प्रगती केली ती प्रगती म्हणजे: जगातील प्रत्येक देशाने स्वतःचे वर्चस्व राखण्यासाठी स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या देशाला संपवण्यासाठी जमा केलेला शस्त्रसाठा. हा एकच प्रयत्न यातून दिसतोय. मग याला प्रगती म्हणायची का? भरमसाठ रासायनिक व जैविक अस्त्रांची निर्मिती करून संपूर्ण मानव जातीचाच संहार करण्यांचा प्रयत्न यातून दिसतोय.

आज संपूर्ण जगातील मानवजात स्वतःची प्रगती पाहून सुखी समाधानी आहे. स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. प्रगतीच्या गप्पा मारल्या जात आहेत. आजचा मानव आकाशाला गवसणी घालताना दिसतोय. चंद्रावर पाऊल ठेवतोय. त्यावर वस्ती करायची धडपड करतोय. कोणी चंद्रचं विकत घेतोय तर कोणी चंद्र भाड्याणे देण्यासाठी तयारी करतोय. कोणी मंगळवार स्वारी करून तेथे काय आहे याचा शोध घेतोय. थेट सूर्यावरही यान पाठवण्याचा मानव प्रयत्न करतोय. आपण एकमेकांला संपवण्यासाठी जंगी तयारी करून ठेवलेली आहे. मग यालाच आपण प्रगती म्हणायची का?

खरं तर मानव जातीला विविध रोगापासुन कायमचं मुक्त करण्यासाठी, शोषणमुक्त समाज बणविण्यासाठी, या मानव जातीला कायमचं वाचवण्यासाठी येथे पृथ्वीवर कोणीही काहीही केलेले नाही. जगातील प्रत्येक सरकार तहान लागली की विहीर खोदताना दिसत आहेत. त्यात थोडंबहूत पाणी लागलं की तहान भागवून हुरळून जात आहे. सध्या तहान भागली पूरे यातच समाधान मानत आहे. या जगातील सर्व शासनाने मानवाला म्हणजे स्वतःला मारण्यासाठी व अंत्यविधीसाठी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आपण सर्व मरणाचे अंत्यविधीचे कफन आणून ठेवलेले आहे. पण आज मानवजात जीवंत कशी राहील यासाठी कायमचा शोध लावताना. त्यासाठी काम करताना कोणीही दिसत नाही.

चीनसारखे दुष्ट राक्षसी राष्ट्र त्याच्या शस्त्रू राष्ट्रांना या भयान कोरोना सारख्या जैविक अस्त्रांनी घायाळ करत राहणार. एकएक जीव घेत सर्व जगाला मृत्यूच्या खाईत लोटत आहे व लोटत राहणार. मृत्यूच्या जबड्यात ढकलत राहणार आहे व दुसरे सगळे राष्ट्र हे गुपचूप सहन करून त्यावर तात्पुरता उपाय शोधत बसणार. तोपर्यंत शस्त्रू राष्ट्र आणखी नविन काहीतरी करणार नाही हे कसे कळणार?

जागातील सर्व राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येवून मानवजातीला संपविण्याचे, एकमेकांला संपविण्याचे रासायनिक व जैविक शस्त्र अस्त्र तयार करण्यापेक्षा संपूर्ण मानवजातीच्या हिताकरिता व त्याला वाचवण्यासाठी, त्याच्या सुख समाधानासाठी काम केले, संशोधन केले तर आजचे भयान दिवसं पुन्हा येणार नाहीत. नाही तरी मानवाने स्वतःच्या प्रगतीच्या नावाखाली स्वतःची कबर बांधून ठेवलेली आहे. त्या कबरीलाच आपण मानवाची प्रगती असे नाव देत आहोत?

राठोड मोतीराम रुपसिंग

“गोमती सावली” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड-६.
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *