:
आयुष्यातल्या अनिश्चित बेगडी अच्छादनाने खरचं आता श्वास गुदमरू लागला आहे… कशाची शाश्वतता वाटत नाही.. वर्षे होऊन गेला, आपण या संसर्गाच्या भयछायेत वावरत आहोत..जगात चाललेलं पहिल्या लाटेचं मृत्यूथैमान पाहून जीव धडकून गेला, आणि तोच कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत भारतात जणू मृत्यूतांडव करीत आहे, आपल्या देशातील स्मशानभूमीची स्थिती पाहून काळीज चिरत आहे,
आता आपल्यातल्याच लोकांचे असे अकाली जाणे, मनाला हदरुन टाकणारे आहे, कालपर्यंत जी माणसे प्रत्यक्ष, कधी फोनवरून, तर कधी इतर समाजमाध्यमातून आपल्याशी , जोडली गेली ती आज अचानक आपल्याला न सांगताच, निघून गेली….परत कधीच न येण्यासाठी….. कुठल्या अनंताच्या प्रवासाला…कोण जाणे…आपण त्यांच्या इतक्या आठवणी जाग्या करत आहोत….पुन्हा कुठेच हे चेहरे दिसणार नाहीत…. आपलं आधीचं बोलणं आठवेल, प्रसंग आठवतील, आणि आठवतील अनेक आठवणी….ज्या आज बनल्या आहेत केवळ स्मृतीत साठवण…आपल्या फ्रेंडलिस्टमधील न डिलीट झालेली ती दाद..एका प्रमाणपत्रासारखी कायम राहील… त्या फोनवरून आता फोन येणार नाही…व्हाट्सएपवर एक मॅसेज येणार नाही….शेवटी प्रत्येक नात्याला एक आयुष्य असतं हेच खरं…पण असा मृत्यू ज्यात आपण त्यांच्याप्रती असलेल्या भावना शेवटच्या दर्शनात साठवू शकलो नाही, ही सल मृत्यूची दाहकता अधिक मनाला पोखरून टाकत आहे.

कुणाची शेवटची भेट आठवूण ती शेवटचीच म्हणून जीव हळहळायला लागलाय हे नक्की. कित्येक कुटुंबातील सदस्यांना अंतिम संस्कार करता आले नाहीत त्यांच्या जिवलगाचे ..ही भावना त्या कुटुंबासाठी निश्चितच अकल्पित आहे. व्हाट्सएप, फेसबुक उघडलं, की निधनाची वार्ता, भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कोणत्या दिवशी आपला फोटो येईल ही हरिण काळजी मनाला लागली आहे, कुणाचा मिडियावर फोटो पाहिला तरी धस होतेय… मथळा वाचला मग अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत ..मग थोडा निश्वास सुटतो आहे… आपल्यातल्या बर्याच जणांची अशीच अवस्था होत आहे…स्मशानभूमीत काही दिवस तर कधीच न पाहिलेले दृश्य पहायला मिळाले… सगळीकडे वेटिंग लिस्ट आतापर्यंत पाहिली होती, फक्त स्मशानभूमीत पहायला मिळाली नव्हती…हे दिवस पहायला मिळाले…. इतकी आगतिकता कधीच पहायला मिळाली नव्हती. कदाचित ही भिती संसर्ग झालेल्या अनेकांना वाटत असावी, आणि मानसिक पातळीवर खच्चीकरण नक्कीच होत असेल, ऑक्सिजन….आयसियु… ..व्हेंटिलेटर अशा टप्याटप्याने रूग्ण भितीच्या अंधारात ढकलला जात आहे.. शेवटी आत्मविश्वास, जगण्याचं बळ अधिक धुसर होऊ लागलं आहे.
पराकोटीचं मृत्यूचं सावट असताना ही आपल्यापैकी अनेकजन बेजबाबदारपणे वागत आहेत, जीवनमृत्यूच्या या संकटात ही आम्हा भारतीयामध्ये असलेल्या प्रभावशाली अंध मानसिकतेतून आम्ही बाहेर येऊ शकलो नाही, आपल्या देशात चार बाबींचा पगडा प्रत्येक स्तरावरील व्यक्तीच्या मानसिकतेत आहे, त्यात राजकारण, क्रिकेट, धर्म, आणि सिनेमा यांचा समावेश होतो, आपल्या व्यवस्थेत ,प्रत्येक पातळ्यांवर अनेक त्रुटी आहेच, पण आजची स्थिती यावर चर्चा करण्यापेक्षा, यासंकटातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी संगठित प्रयत्नांची गरज आहे. कोरोनाच्या बाबतीत आज भारताची स्थिती जगात सर्वात चिंताजनक आणि गंभीर आहे तरी आम्ही नागरिक म्हणावे तितके जागरूक नाही, निवडणूका, विजयानंतरच्या मिरवणुका , धार्मिक कार्यक्रम, बाजारातली गर्दी, अंत्यविधीसाठी जमलेला मोठा जणसमुदाय,पुन्हा त्यातही होणारे विवाह, वाढदिवस असे अनेक कार्यक्रम यात बहुतांश लोकांच्या श्रीमुखावर नसलेले मास्क, आणि असतीलच तर ते योग्य पध्दतीने न लावलेले, शारीरिक अंतराचे तर काही देणघेणचं नाही, प्रशासकीय यंत्रणेवर, सरकारी निर्णय, आंतरराष्ट्रीय स्थिती यावर मत मांडणे, लसीकरण, आरोग्यव्यवस्था, एखाद्यावर टिका करण स़ोप असतं पण, आपली जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीव आपल्याला नक्कीच हवी आहे, उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणूकीच्या कामात सातशेहुन अधिक शिक्षक, इतर शासकीय आस्थापनातील कर्मचारी संक्रमित..आणि मृत्यू.. झाल्याचे वृत्त आहे, त्यांच्या कुटुंबीयांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे,


