निःपक्ष व निर्भीड पत्रकार : राजेश्‍वर कांबळे

पत्रकारिता तसा खूप जिकिरीचा विषय आहे. यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते. नेटकी व नेमकी भूमिका मांडावी लागते. विचारात सौंदर्य असावे लागते. कर्तव्य सन्मुख आणि अंतर्मुख बनविण्याची कला आत्मसात करावी लागते. तेव्हा कुठं वार्तापत्र किंवा वार्ता, बातमी किंवा घटना, सत्य आणि वास्तविकता योग्य वेळी, निटनेटक्या व योग्य शब्दात मांडता येतात.

कवी जसा जन्मावा लागतो. तसा पत्रकार आकाराला यावा लागतो. कवी आपल्या कवितेत कल्पनेने रंग भरतो. पण पत्रकाराला तसं बातमीमध्ये कल्पनेचं झालर लावता येत नाही. पत्रकाराला स्वतः बातमीत उतरावं लागतं. पत्रकार हा धक्का धक्कीचे साहित्य निर्माण करणारा वास्तववादी साहित्यिकच असतो. निःपक्ष व निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. याची जाणीव राजेश्‍वर कांबळे यांना झाली. म्हणतात ना, परिस्थितीनं तंगडे वर केले की, कोवळ्या वयातही शहाणपण सुचतंय. या जोखिम स्विकारलेल्या परिस्थितीमुळं आजुबाजुला घडणाऱ्या ताज्या घडामोडी व बातम्या समाजपटलावर पेरण्यासाठी वृत्तपत्रांची गरज असते. या जाणिवेतून पत्रकार मनाचा जन्म होऊन राजेश्‍वर कांबळे नावाच्या उमद्या पत्रकाराचा जन्म झाला.


पत्रकारितेचा प्रारंभ ६ जानेवारी १८३२ साली झाला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राने त्याची सुरुवात केली. हे महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र. यानंतर मुक समाजाच्या वेदना व विद्रोह मांडण्यासाठी दलित पत्रकारितेला सुरुवात झाली. दलित समाजातील पहिले पत्रकार गोपाळ बाबा वलंगकर हे आहेत. त्यांनी १८८८ साली विचार विध्वंस मधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र हे साप्ताहिक सुरू केले. सन १९१० मध्ये किसन फागू बंदसोडे यांनी निराश्रित हिंद नागरिक मधून समाजातील समस्या जगा समोर आणल्या. तर विदर्भामधून गणेश गवई यांनी सन १९१४ साली बहिष्कृत भारत सुरू केले. आणि मग या नंतर बाबासाहेबांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. हा पत्रकारितेचा वारसा राजेश्‍वर कांबळे यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच कांबळेची पत्रकारिता प्रयोजनमूलक, निःपक्ष आणि निर्भिड आहे.


राजेश्‍वर कांबळे यांनी अनेक संघटनामध्ये स्व:ताला झोकून देऊन काम केले आहे. प्रत्येक संघटनेत आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आंबेडकरी विचार मोर्चाचे तालुका संघटक म्हणून काम करीत असताना त्यांच्या संघटन कौशल्याचा प्रत्यय आला. प्रेस फोरम पत्रकार संघटनेचे सहसचिव म्हणून काम नीट आणि नेटकेपणाने पार पडले. आणि आपल्या कार्याचा वेगळा दरारा निर्माण केला. मराठी पत्रकार संघाचे सदस्य, कंधार तालुका पत्रकार संघाचे सल्लागार ही पदे सुध्दा त्यांनी भूषविलेली आहेत. तर जिल्हास्तरीय युवक नेतृत्व विकास शिबीर, अखिल भारतीय विद्यार्थी महासंमेलन, उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम, मराठी अर्थशास्त्र परिषद आणि मिट द प्रेस अशा विविध शिबीर व उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.


अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. तसेच विस्तृत श्रवण शक्ती, लेखन ज्ञान, ध्येयवाद, अभ्यासू , सत्यनिष्ठ, निर्भीडता, उच्चशिक्षित, जिज्ञासावृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, चारित्र्य संपन्न व प्रेरणादायी असे गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी दिसून येतात. कंधार सारख्या उजाड माळरान भागात ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या दिवस भराच्या घडामोडी संकलन करुन एवढ्या वरच गप्प न बसता, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय यासह इतर प्रशासकीय कार्यालयात, जनतेच्या आलेल्या तक्रारी संदर्भात, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बोलून तक्रारीचे, अडचणीचे निवारण करतात. सत्य शोधण्यासाठी बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार म्हणून राजेश्‍वर कांबळे यांची ख्याती आहे. अन्यायाविरुद्ध झुंज देणारा झुंजार पत्रकार असे त्यांना संबोधण्यात येते. कोविड काळात पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती केली. याची दखल प्रशासनाने घेतली. ते कोविड योध्दा ठरले. त्यांची पत्रकारिता निःपक्ष आणि निर्भीड आहे.


प्रशासन, पर्यावरण, शैक्षणिक, साहित्य विषयक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषय असो का कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून ते सतत अन्यायाविरुद्ध आवाज उठवितात. ते समाजभूषण आहेत. कृषीमित्र आहेत, धम्मधर आहेत, पक्षी मित्र आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेतली आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार, कोविड योध्दा पुरस्कार, पत्रकारिता सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. समाज माझाही आहे. समाज तुझाही आहे. फरक एवढाच की, तू बहिष्कृत आणि मी माझ्या समाजात आहे. ही समाज उन्नतीची भूमिका घेऊन समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या राजेश्‍वर कांबळेचा आज वाढदिवस त्या निमित्ताने. राजेश्‍वर तू जगावं हजारो वर्षे हीच माझी इच्छा, म्हणून तुला देतोय लाख लाख सदिच्छा…

  • अनुरत्न वाघमारे, नांदेड
    मो. ९६७३६४३२७६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *