आडीच वर्षापूर्वीच मोठं मन दाखवलं असत तर…….

  राजकारण हे मानवांची निर्मिती झाल्यापासूनच चालू झालं असेल. त्याकाळी ते त्याला कदाचीत राजकारण हे नाव दिले नसतील. आजच्या एवढे डावपेच ही त्या काळी प्रगत झाले नसतील; पण रामायण महाभारताच्या काळापासून मात्र राजकारण, राजकारणातील डावपेच राजकारणातील घडामोडीचे वर्णन बारकाईने दिसून येतात. रावनापासून बिभिषण याला बाजूला करणे हा एक राजकारणाचाच भाग होता किंवा असावा. कदाचीत त्याला त्याकाळी राजकारण न म्हणता स्वामी भक्ती, त्याचा प्रामाणिकपणा किंवा बंधू व्देष या किंवा दुसऱ्या अनेक शब्दांनी ओळखले असतील.

      तसेच महाभारतातील राजकारण हे रामायणातील राजकारणापेक्षा थोडे प्रगतच होते असे वाटते. येथे राजकारण, सत्ताकारण यासाठी कपटीपणा, कुटीलता, सूडाची भावना, राजकारणातील वेगवेगळे डावपेच, बुद्धी चातूर्य, बळाचा वापर व फोडाफोडीचे राजकारण हे सर्व दिसून येते.

   राजकारण हे फक्त देशातच चालते असे नव्हे तर देशातील प्रांतात जिल्हयात गावात कुटुम्बात ही चालते. देशादेशात ही राजकारण चालते. प्रत्येकांची राजकारण करण्याची पद्धती वेगळी. येथे कोणी शकुणीचे डावपेच खेळतो. तर कोणी धर्मराजाचा आव आणतो.कोणी कृष्णाची भूमिका स्पष्टपणे वटवतो तर कोणी कंसाची भूमिका पार पाडतो. येथे कोणी भिमाच्या भूमिकेत वावरतो तर कोणी अर्जुन होतो.

      महाराष्ट्रातही मागच्या वीस पंचविस दिवसापासून राजकारण व सत्ताकारण चालू आहे. सत्तेसाठी सर्वकाही करण्यास राजकारणी सज्ज झाले होते. आडीच वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा पासुन हे सरकार अस्थीर कसे होईल यासाठी शकूणी मामाचा बुद्धीबळाचा डाव मांडला गेला होता. प्यादे सरकत होती. सरळ चालणारे स्थिर होते. घोड्याची चाल चालू होती. तर कधी उंट तिरपी चाल चालत होतं. विरोधी पक्षातील राजकारणी या सरकारला तिन टांगी रिक्षा सुरवातीस संबोधले. हे सरकार लवकरच जाणार अशी भविष्यवाणी करत होते; पण हे सरकार जाणार यांची ही भविष्यवाणी खरी ठरायला आडीचवर्षे लागली.

         हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल असे नेहमी बोलले जात होते; पण अंतर्गत कलह कोण करणार? घाई गडबड केली तर जनता आपल्याला उद्या खलनायक ठरवतील ही भीती. मतदारसंघात फिरू देणार नाहीत. दुसऱ्यावेळी निवडून देणार नाहीत. म्हणून सर्व कसे शांत शांत राहीले. आम्ही फक्त तुमचे भक्त म्हणुन राहीले. आगदी सुखातीपासून सरकारमधील बंडखोर गटातील निवडक नेत्यांनी विरोधी पक्षाला माहिती पुरत राहीली. ज्या दिवशी ही माहिती विरोधी पक्षनेत्याकडे जात निश्चित त्याच दिवशी त्यांचाकडू भविष्यवाणी वर्तवली जात; पण सत्ताधारी नेते या भविष्यवाणीला फारसे गांभीर्याने घेतले नाहीत. ते गेंड्याची कातडी पांघरून सुस्तपणे ऐकत राहीले. पहात राहीले. काही नेते उगीच वल्गना करत राहीले पाचवर्ष हे सरकार टिकणारच म्हणून बडबडत राहीले. हे सरकार पडण्यात सत्ताधारीही कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे वागलेच नाहीत. ते नेहमीच परावलंबी दिसले. परिस्थितीने त्यांना वाकविलं होतं. त्यातच ते दबून गेले होते. सरकारमध्ये तीन पैकी फक्त एकाच पक्षाचा दबदबा होता असं सामान्य माणसाचं मत आहे.

     सरकार तीन पक्षांचं होतं. पण यांची भिस्त एकाच व्यक्तीवर अवलंबून होती. मुख्यमंत्री हे डावपेची नव्हते. सरळसोट स्वभावाच्या माणसाकडं डावपेच नसतातही. त्यांनी सहकारी मित्रांवर अति विश्वास टाकला. तीन पक्षांमध्ये एक पक्ष भलताच हुशार. त्याच्याकडे शकुणी मामाचे डावपेच होते. भिमासारखी शक्ती होती. अर्जुनाचा रथ हाकण्यासाठी कोणीतरी कृष्णाची भूमिका वटवत होते. जमेल तेवढी मदत स्वतःच्या आमदारांनाच करत होते. मुख्यमंत्री असुनही मुख्यमंत्री गप्पच बसलेले होते. आर्थिक नाडी एकाच पक्षांच्या हातात होती. यातील तिसऱ्या नंबरचा जो पक्ष होता त्याची दशा अतिशय वाईट होती. ना घरका ना घाटका अशी अवस्था त्या पक्षाची झालेली होती. आता थोडं मोकळं श्वास घेईल तो पक्ष. नाइलाजाने ते त्यांच्याबरोबर फरफटत जात होते. त्या पक्षातील आमदार, कार्यकर्तेही सत्ता असुन सत्ता नसलेल्या कार्यकर्त्यांप्रमाणे सैरभैर झालेले होते.

    आडीच वर्षापूर्वी शिवसेना व भाजपा जिवलग मित्र होते. कुटुम्ब प्रमुख दोन होते; पण दोघांची संस्कृती, विचारसरणी व रहनसहन एकच होती. जेव्हा भाजपा महाराष्ट्रात पाळण्यात खेळत होता तेव्हा शिवसेना ऐन तारुण्यात पदार्पण केलेली होती. मुंबई, पुणे, औरंगाबाद आशा मोठ्या शहरात यांची चलती होती. भाजप पाळण्यातून बाहेर आलं दुडूदुडू धावायला लागला तेव्हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं कौतूक केलं. भेदभाव न करता त्यांचं पालनपोषण केलं. हळूहळू भाजपा वयात आलं तेव्हा ठाकरे साहेबांनी त्यांना लहान बंधू म्हणून मान्यता दिली. हातात हिंदूत्वाचा झेंडा घेतला. व सुसाट वेगाने पुढे जात राहिले. भाजपाने वेग घेतला. त्या पक्षाने इतकी गती प्राप्त केली की ते महाराष्ट्रात लहान होते हा इतिहास ते विसरले. आता ते सर्वजण सांगू लागले की शिवसेना लहान भाऊ म्हणून महाराष्ट्रात रहावं व येथेच त्यांचं बिनसलं.

      दोघांत हळूहळू दरी निर्माण झाली. ही दरी इतकी मोठी झाली की पुढे त्यांना एकमेकांजवळ येताच आले नाही. सत्तेच्या राजकारणात कोणी कोणाचं नसते. भाजपनं ठरवून टाकलयं की शिवसेना रसातळाला गेली पाहिजे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले व आज त्यात ते यशस्वीही झालेले आहेत. राजकारण, प्रेम आणि युद्ध यात काहीही चालून जाते. यात वरील गोष्टीत न्याय अन्यायला महत्व नसते.

      महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलाय तो म्हणजे कालपरवापर्यंतच्या विरोधी पक्षाला, ही काल घडवलेली घटना आडीच वर्षापूर्वीच घडवता आली नसती का? शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांना करता आला नसता का? आजच्या आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आजच मोठे मन का केले असावे? आडीच वर्षापूर्वी जर त्यांनी मोठे मन केले असते शिवसेनेची सत्ता म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री केला असता तर हे बाराभाईचे कारस्थान कशाला घडले असते? सुरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास आमदारांना करावा लागला नसता. एवढा अफाट खर्चही करावा लागला नसता. जनतेच्या मनात तुम्हाला मान मिळाला असता. तेव्हाच आजच्यासारखे मोठे मन दाखवले असते तर आडीच वर्षानंतर म्हणजे आता भाजपचा मुख्यमंत्री राहीला असता. आडीच वर्ष शिवसेनेचे गेलेले आहेत. आडीच वर्ष बंडखोरी करणाऱ्याचा मुख्यमंत्री मग मोठ्या मनाचा फायदा काय? बाबा ही गेले व दशम्याही गेल्या. तेलही गेलं व तूपही गेलं तुमच्या हाती राहीलं काय?

     आता सर्वसामन्य लोकांनाही राजकारण थोडं थोडं कळायला लागलयं. भाजपाला या घडामोडी घडवून आणायच्या होत्या. त्या घडामोडी त्यांनी कधी बळाचा वापर करून कधी शकुनी मामाचा डाव टाकून तर कधी सरळ सरळ शाब्दिक हल्ला करून ठाकरे सरकारला जेरीस आणलं होतं. याचं मागचं एकच कारण शिवसेना हटाव.

    भाजपाला शिवसेना तोडायची होती. फोडायची होती. त्यासाठी त्यांना कोणता मार्ग आवलंबायचा होता ते अवलंबुन करून दाखवलेला आहे. हे फारसं गारंभीर्याने जनता घेणार नाही. कारण गैरमार्गाने त्याच्यापूर्वी ही सत्तापालट झालेले आहे.

   सत्तेत उलथापालत करणे हे पुरातन काळापासून चालत आलेले आहे. अधुनिक भारतातही ते चालू आहे. चालत राहणार आहे. मुस्लीम राजवटीत तर मुलगा बापाला जेलमध्ये टाकल्यांच इतिहास आहे. आगदी आलीकडचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आपण तपासला तरी आपणास हेच दिसेल. केंद्रात ज्या पक्षांची सत्ता तो पक्ष ज्या राज्यात विरोधी पक्षांचे सरकार आहे ते नेहमीच अस्थीर किंवा पाडण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. आदरणीय इंदिराजी गांधी पंतप्रधान असताना ही अशाच घडामोडी घडत होत्या. मुद्दाम घडविले जात होत्या. तेच आजचे केंद्रातील सरकार करत आहे. यासाठी भाजपाला यात दोषी ठरवता येणार नाही. ज्यांचा त्यांचा काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या जीवनात येतच असतो. नवनविन गोष्टी घडवत असतो. काळाचा हा महिमा आहे.

        सत्तेसाठी सर्व काही हे फार पूर्वी पासूनच चातल आलेलं आहे. हे कधीच थांबणार नाही. कोणी थांबवणारही नाही? फक्त वाईट यांचं वाटतं की कालच्या सरकार बदलामध्ये जे मोठे मन ज्यांनी कोणी दाखले ते जर आडीच वर्षापूर्वीच दाखविलं असतं तर भाजपाचं मोठेपणा समाजात अधिक गडद झाला असता तो वाढला असता. आता त्या मोठ्या मनाची मान उंचावली की खाली गेली हे येणारं काळचं ठरवेल.

©राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-६.
९९२२६५२४०७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *