“समाजाच्या सर्वात तळातल्या व्यक्तीला विकासाची संधी मिळणे म्हणजे सुशासन” -डॉ. एस. पी. गुट्टे

 

 

कंधार : प्रतिनिधी

दि. ०६/०३/२०२४ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत तंटामुक्ती अध्यक्ष भगवानराव कंधारे यांच्या अध्यक्षतेखाली, श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस. पी. गुट्टे यांनी ‘युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास, या विशेष शिबिरास उद्दबोधन करतांना वरील प्रतिपादन केले.

शासन म्हणजे जनहितासाठी नैतिकतेने कार्य करणारी संस्था आहे. ही एक व्यवस्थित संरचना असून ती जनहिताला प्राधान्य देते. प्रशासनाच्या अंतर्गत पारदर्शकता निर्माण करून नागरिकांना चांगले जीवन देण्याचा प्रयत्न करते, त्यांचे वर्तमान व उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न करते. समाजाच्या सर्वात तळातल्या व्यक्तीला विकासाची संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे, त्याचबरोबर त्याला ही संधी मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी ‘सुशासन’ आवश्यक आहे. सुशासन हे संस्थेची दिशा, परिणामकारकता, पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करते . सुशासन म्हणजे लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे, सुशासन म्हणजे पारदर्शकता, सुशासन म्हणजे भ्रष्टाचाराला आळा, सुशासन म्हणजे माहितीची उपलब्धता, सुशासन म्हणजे प्रभावी कुशल नेतृत्व, सुशासन म्हणजे शासन आणि नागरिक यातील सहकार्याची भावना, सुशासन म्हणजे लोक केंद्री विकासाला प्रोत्साहन देणे होय.

 

जेव्हा सरकारकडून चांगले शासन देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला धार्मिक रंग न देता, समाजात संघर्ष निर्माण न करता, समाजाची हानी न करता, प्रत्यक्षात त्यांना ‘सुशासन मिळणे, आवश्यक आहे. तरच देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विकास होतो, असे आपल्या मनोगतात प्रदर्शित केले.

या कार्यक्रमासाठी, गावकरी, बंधु भगिनी, महाविद्यालयातील स्वंयसेवक, कर्मचारी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. पी.एल. डोम्पले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहकार्यक्रमाधिकारी सुनिल आंबटवाड यांनी मानले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरवात वंदे -मातरम् गीताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *