सौ लक्ष्मीकांता रामचंद्र बिंगेवार-तानूरकर 39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त.

 

धर्माबाद येथील नामांकित हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा, धर्माबाद येथे सेवारत असलेल्या शिक्षिका सौ. लक्ष्मीकांता रामचंद्र बिंगेवार – तानुरकर नियत वयोमानानुसार 39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून दिनांक 31/07/2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या बाईंचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात दिनांक 21/07/1966 रोजी रत्नाळी या गावी झाला. तीन बहिणी व दोन भाऊ आई-वडील असा बाईंचा परिवार. बाई सर्वात मोठी मुलगी होत्या. वडिलांच्या रागीट स्वभावामुळे घरात कुणाचं फारसं चालत नव्हतं. बाई लहानपणापासूनच हुशार होत्या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय होती त्यामुळे रत्नाळी गावातच इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी धर्माबाद येथील नामांकित हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. तेलगू भाषिक कुटुंबात घरात कुणीच शिक्षण घेतलेले नसल्यामुळे बाईंना पुढील शिक्षणासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या. पण गावातच डी.एड कॉलेज असल्याने लहानपणापासूनच शिक्षक पेशा विषयी आवड असल्यामुळे गावातील शासकीय विद्यालयातून डी. एड. पदवी मिळवली. पुढे हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेत निवड अंती दिनांक 2/09/1985 रोजी रुजू झाल्या ते आजतागायत सेवा बजावली पूर्वी शिक्षण क्षेत्राबाबत फारसे समाजात जनजागृती नव्हती.

अशा अवस्थेत बाईंनी स्थानिक संस्थेत नोकरीला लागल्या पण पगार फार कमी असल्याने नोकरी करून राहिलेल्या वेळात खाजगी क्लास देखील घेत होत्या. परिस्थिती बदलत होती. जावई घर जावई असावा असा त्यांचा वडीलांचा बेत होता. पण समाजात फार काही शिकलेले मुले नसल्यामुळे अडचण निर्माण होत होती अशा परिस्थितीत श्री सदानंद तानूरकर या तानूर येथील होतकरू तरुणांशी बाईंचा विवाह झाला लग्नानंतर बाईंचं सासर तानुरहून धर्माबादला नोकरीसाठी येऊ लागल्या परंतु पुढे कौटुंबिक अडचणीं निर्माण होऊ लागल्या परिस्थितीला तोंड देणे अवघड झाले. सर्वांचा विरोध पत्करुन बाईंनी धर्माबादला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत पतीसदानंद तानूरकर यांनीही काम शोधण्यात यशस्वी झाले. प्रत्येक कामात श्री संगेवार मामा बाईंच्या अडीअडचणीत मदतीला धावून येत होते. पहिल्या अपत्यानंतर परिस्थितीत झपाट्याने सुधारणा झाली.

शाळेत बाईकडे पहिल्या वर्गाची जबाबदारी होती बाईंच्या शिकवण्याची पद्धत उत्कृष्ट होती. नेहमी वर्ग भरून असायचा. कमी काळात शाळेत बाई विद्यार्थीप्रिय शिक्षिका बनल्या. बाईंना शाळेत सर्वजण कांताबाई म्हणत. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, कब बुलबुल, वृक्षारोपण व संगोपन, रांगोळी स्पर्धा, स्वच्छता आभियान, साक्षरता अभियान, उत्कृष्ट कथाकथन, पुस्तक वाचन, सहल, मातीकाम, कागद काम असे विविध उपक्रम वर्षभर राबवत असत. शाळेत सर्वांसोबतचे काम फार चांगले असायचे. कोणत्याही उपक्रमात शाळेत बाईं नेहमी अग्रेसर राहत असत. कब बुलबुल विषयी सांगायचं झालं तर मॅडम बुलबुल च्या फ्लॉक लीडर होत्या. शाळेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय अनेक कॅम्प संपन्न झाल्या. त्यात प्रामुख्याने ठाणे, वर्धा नांदेड आदी ठिकाणी त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती बाई विशेषतः मुलींच्या मेकअप कडे आवर्जून लक्ष देत असत केशभूषा, वेशभूषा अगदी परफेक्टच असायची ! मुलींना काटापिन पासून बुचडी बांधणे, लुगडी नेसणे धोतर बांधणे, फेटा बांधणे, गंधबटू करणे अगदी अगदी घट्ट राहत असे तेही कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत. ती सर्व कामे अगदी शिस्तीमध्येच होत असत. मॅडम कॅम्प सोबत राहिल्या म्हणजे दोन बक्षिसे अधिक मिळवण्यात यशस्वी झालो समजा ! असे कॅम्पच नव्हे तर अशा अनेक हट्टी व जिद्दी मुलांना घडविण्यात खरंच बाईंचा सिंहाचा वाटा होता हे मात्र तितकेच खरे होय !

वर्गातील हुशार होतकरु मुलांना ड्रेस, वह्या पेन लगेच उपलब्ध करुन देत. बाईंची विध्यार्थीसाठी नेहमी धडपडत असत. बाईंना पुस्तके वाचण्याची भरपूर आवड होती. वाचन छंदातून पुढे त्यांनी अध्यात्मिक चळवळीत सहभागी झाल्या. ” *कर्मण्ये – वाधिकारस्-ते, मा फलेषु कदाचन ! मा कर्म- फल हेतूर्-

भूर्,-मा ते सडुगोस्त्व – कर्मणि!”* श्रीमद् भगवद्गीते सांगितल्याप्रमाणे तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. फळाविषयी कधीही नाही. कुठलाही विचार न करता आपले
कर्म सातत्याने करीत त्या स्वाध्याय परिवारातील सर्वांच्या लाडक्या ताई झाल्या. सोबत पतीची भक्कम साथ लाभली. भगवद्गीता मुखद्गत असलेल्या शिक्षिका भगिनी आज हजारो परिवारांशी नाळ जोडून आहेत व पती-पत्नी दोघेही आपले कार्य सोबतीने सातत्याने करीत आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.

नोकरी करीत असताना बाईनी एकदा नगरपालिकेची निवडणुक ही लढवली आहे. परंतु अपेक्षित यश मिळाले नाही पुढे निवडणुकीची संधी मिळाली पण राजकारणात जास्त वेळ त्या रमल्या नाहीत. बाईंना त्यांच्या पतीची भक्कम साथ असल्याने बाई नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहत. विविध शिबीर, विविध सण उत्सव साजरा करीत असत. शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान देत असत. स्वाध्याय परिवाराशी त्यांचे आपुलकीचे नाते जोडलेले आहे. पंचक्रोशीत त्यांचे काम चांगले आहे. गीतेवर बाईंची अनेक व्याख्याने झाली. केंद्रस्तरावर अनेक चिंतनिका ही घेत असत. गीता व ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ म्हणजे बाईंचे दैवतच होत. अलौकिक बुद्धिमत्ता, उत्तम नेतृत्वगुण असल्याने समोरच्या व्यक्तीवर बाईंचा प्रभाव पडत असत. मनमिळाऊ प्रेमळ स्वभाव साधी राहणी व नीटनेटकेपणा असे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.

माझ्याकडे वर्ग तिसरीचे अध्यापन वर्ग होते. तिसरीचे मराठी शिक्षक सेवानिवृत्त झाले. तेव्हा बाईकडे तिसरी मराठी विषयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे वर्ष संपण्याच्या अगोदरच कोरोणाचा शिरकाव झाला. शैक्षणिक व्यवस्था ठप्प झाली. पुढे परिस्थितीत सुधारणा झाली मुले शाळेत येत नव्हती. एकदा मॅडम म्हणाल्या चला गुरुजी मुलांचे पत्ते शोधा आपण घरी जाऊन मुलांना अभ्यास देऊ. मी लगेच हो म्हणालो ! पुढे या कामी तीन ते चार महिने वर्गातील एकशे पन्नास मुलांपर्यंत जाऊन त्यांचा पत्ता शोधून मराठी व गणित विषयाचे धडे देण्यात आम्ही यशस्वी झालो. एकदा दिलेले काम पूर्ण झाले की नाही हे पाहाण्यासाठीही आम्ही परत त्या विद्यार्थ्यांच्या घरी जात असत हे सगळं पाहून मनाला खूप आनंद वाटत असत. पुढे मोबाईल द्वारे ग्रुप वरती सगळे धडे देण्यात यशस्वी झालोत. हे केवळ मॅडम सोबत काम करीत असल्यामुळेच शक्य झाले. हीच बाईंची शिकवण होती. कामात सातत्य असत. शैक्षणिक
क्षेत्रातील सर्व चालू घडामोडी वर बाईंचे बारीक लक्ष असत शैक्षणिक क्षेत्रात एखादी नवीन संकल्पना आली की लगेच त्याची अमलबजावणी करण्यास भाग पाडत असत.

सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या बाईंनी कुटुंबाची कधी परवड होऊ दिली नाही. आपल्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार करीत दोन्ही मुलांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. बाईंचा मुलगा सुरज कुमार तानूरकर हा अत्यंत हुशार आसून सध्या पुण्यातील नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करीत आहे. तर त्यांची मुलगी सौ. पूजा बिंगेवार ही विवाहित असून इंजिनिअरिंग पूर्ण करीत सध्या प्राध्यापिका म्हणून शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, कराड.जि. सातारा येथे कार्यरत आहेत व त्यांचे जावई श्री पवनकुमार हे नेव्ही मध्ये कार्यरत आहेत.
नोकरीत सन 1985 ते 2024 पर्यंत च्या काळात अनेक
चढ-उतार पाहायला मिळाले पण बाईंच्या स्वभावात काही बदल झाला नाही. शैक्षणिक नव्हे तर स्वाध्याय परिवारात देखील काम करत असताना बाई प्रसिद्धीपासून चार हात दूर आहे भगवंतावर अपार श्रद्धा असलेल्या शैक्षणिक चळवळीत नेहमी अग्रेसर राहणारे सौ. लक्ष्मीकांता सदानंद तानूरकर यांच्या सेवानिवृत्तीस अंतकरणापासून शुभेच्छा व पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य संपदाश दीर्घ आयुष्य लाभो हीच कामना !

 

शब्दांकन

श्री विठ्ठल नागोबा हिमगिरे [सहशिक्षक] हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा, धर्माबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *