बैलपोळा (निमित्त व्यक्त होण्याचे मोठे धाडस) दि. 22/8/2025 रोजी बळीराजाचा सर्वात मोठा समजला जाणारा सण बैलपोळा. आजही गावोगावी साजरा केला जातो ( विशेषतः परंपरा म्हणून साजरा केला जातो) आमच्या बालपणीच नव्हे तर मागील पाच-दहा वर्षापर्यंत या सणाला खूप महत्त्व होते. पोळा सण पुढे आहे म्हणून महिन्यापासूनच तयारी केली जायची बैलांसाठी लागणारे गोंडे, गळ्यातील विविध प्रकारचे कंठे, झुल, कपाळावर बांधण्यासाठी बाशिंग, आणि बरच काही काही, एवढेच नाही तर मंदिराभोवती फेऱ्या मारताना माझेच बैल बलदंड व भक्कम दिसावेत यासाठी शेतकऱ्यांचा अतोनात प्रयत्न.
कधी काळी आमच्याही घरी बैल जोडी असायची, गोठ्यात खंडीनं गायी म्हशी असायच्या , पण काळाच्या ओघात आज गोठा रिकामीच आहे हे सत्य ,प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आज शेती केली जाते.आज बैलजोडी सांभाळून शेती करणे सर्वांनाच परवडणारे नाही .भावकीत चारदोन बैल जोडी तर संपुर्ण गावात काही बैलजोड्या शिल्लक असल्याचे पहायला मिळते. मिरवणूकीच्या वेळी मंदिराजवळ एक मोठा सोहळाच भरायचा, (आजही भरतो ) पण पुर्वीची लज्जत ती नाहीच.
आज ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची बरीच कामे होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची बैलजोडी कमी झालेली. पर्यायाने पशुधनच कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते . आमच्याच भावकीत दहा ते बारा बैलजोडी होती. आजचे सत्य असे की एक ते दोन बैलजोडी असल्याचे पाहायला मिळते. हीच परिस्थिती आमच्या संपूर्ण गावात आहे. तसेच गावोगावी पण हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लाख ते दीड लाख मानधन देऊन ही कोणी काम करायला तयार नाही. शहराचे वाढते आकर्षण, शेती कामाचा कंटाळा, निसर्गाचा लहरीपणा अशी अनेक कारणे आहेत. शेतीकामाकडे लोकांचा ओढा कमी झालेला दिसून येतो. “मी आयुष्यभर शेतात राबलो पण माझा मुलगा शेतात न राबता साहेब झाल्याचं स्वप्न पाहणारा शेतकरी बाप” मग शिक्षणासाठी शहरात रमलेली तरुण पिढी. गावाकडे यायला नको वाटणारी किंवा थोडेफार शिक्षण घेऊन गावात आलेले तरूण. कुणी नेता आमचा उद्धार करेल या वेड्या भावनेने कुठल्यातरी पक्षाचा झेंडा घेऊन त्यांच्या फिरणारी, पण बैलाच्या मागे शेतात जायला नक्कीच संकोच करणार! मग शेती कशी फुलणार? आणि पशुधन कसे तरी कसे वाढणार? असे अनंत प्रश्न निर्माण झालेले. अन पिढ्यानपिढ्या परंपरा सांभाळणारा शेतकरी बाप अशा दोन पिढ्यातलं वाढत गेलेलं अंतर.
अशावेळी रानातल्या धुऱ्यापाई डोके फोड झाली तरी भावकीचेच बैल पुजावेत या विचारात असलेली माय आपल्या परंपरा सांभाळण्यासाठी असलेली तिची केविलवाणी धडपड आजही गावोगावी दिसते.तरी पण पारंपरिक सण साजरे होतात. त्यातला हा बैलपोळा साजरा करताना बैलजोडीची असलेली उणिव या कविते प्रमाणे कुणाला जाणवली तर कविता लिहीणे सार्थकी झाले.
बैल पोळा
बैल बारदाना
कधीचाच नामशेष झालाय
दावणीतून
अन्
बैल पोळ्याच्या दिवशी
लाचार नजरेनं
पहावं लागतंय
भावकीच्या गोठ्याकडे
त्यांचेच बैल
पुजावेत का?
या विचारात
कंगाल पणामुळे
बॅंकेच्या दारात
हेलपाट्या घालणारी
माणसे
शेतीवाडी गहाण
टाकून
उचापती करण्यात व्यस्त
जीवन स्वस्त
जींदगीचाच लिलाव
लावून
पाहताहेत जगाकडे.
— डॉ. रमाकांत गजलवार

